रविवार, २१ जून, २०२०

या जेजारणीनं केलं, मला पंढरीला नेलं....

 खरं तर आमच्या वारीकडे कोणाची वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही. या वारीत सगळे संत असतात. संतांकडे वाईट दृष्टीने कोणीच पाहू शकत नाही. त्यामुळेच त्या कोरोनाला तरी ते कसे शक्य होईल? आमचा रक्षणकर्ता पांडुरंग आहे तिथे ही भावना प्रत्येकाच्या मनात असते. या भावनेनेच तर प्रत्येकजण वारीला निघतो. वारी सुरू होते तो काळ पावसाचा असतो. अगदी मृगाचा पाउस, आषाढातल्या पहिल्या दिवसाचा पाउस असे सगळे धोधो धुणारे पाउस असतात. पण आमची वारी त्या पावसाला दाद देत नाही की घाबरत नाही. त्या पावसातही ती आनंदाने पुढे सरकत असते. दशकानुदशकेच नाही तर शतकानुशतके ही वारी पावसातच निघते. पावसाळ्यात अनेक साथी येत असतात. त्या साथी आम्हाला थोपवू शकत नाहीत. रोगराई ही काही आजची नाही. यापूर्वीही कॉलरा, मलेरिया, तापसरी अशा अनेक साथी आलेल्या आहेत. मग आम्ही कोरोनालाच का इतके घाबरलो आहोत? या वारीत शुद्ध भाव आहे. शुद्ध अंत:करण आहे. सर्व शुद्धता निर्माण करणार्‍या अनेक वस्तू आमच्याकडे आहेत. मनाची शुद्धी करणारे भगवंताचे नाम आहे. मग आम्हाला कसली भिती आहे? आज लौकीकअर्थाने जरी ही वारी थांबवली असली तरी आम्ही पारमार्थीक अर्थाने आणि मनाने या दिंडीत पोहोचलो आहोत. कारण कोरोनाच काय असे कित्येक रोग आले तरी त्यांचा नाश करण्याची ताकद आमच्या पांडुरंगात आहे हा भाव महत्वाचा आहे. या वारीला जाणार्‍या प्रत्येकाच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. म्हणून या वारकर्‍यांना माळकरीही म्हटले जाते. ज्याच्या गळ्यात ही माळ आहे तो सर्व अशुद्ध गोष्टींपासून, वाईट गोष्टींपासून लांब असतो. माळकरी आहे मी हे अभिमानाने तो सांगतो. याचा अर्थ तो निर्व्यसनी आहे. तो निरोगी आहे. त्याचे अंत:करण शुद्ध आहे. त्यामुळे या शुद्ध मनाला कोण विटाळू शकेल? कोणता रोग त्याला बाधा आणू शकत नाही हा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे.आमचा हा वारकरी, माळकरी ’स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा.नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा. संतांचे ग्रंथ वाचावेत. देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. भजन-कीर्तनात सहभाग घ्यावा. पंढरपूरवारी करावी तसेच एकादशीव्रत करावे यातच गुंतलेला आहे. त्याच्या मनात एकच भाव आहे. तो म्हणजे कपाळी केशरी गंध, विठूरे मला तुझा छंद॥   आमच्या या वारकर्‍याचे आचरणही अत्यंत शुद्ध आहे.सात्त्विक आहार, सत्त्वाचरण करावे. परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे’ असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे. त्याला रोखण्याचे सामर्थ्य कोणात आहे? वारी दरवर्षी असेल. सततची असेल. कोरोनासारखे कितीतरी आले गेले पण ती थांबलेली नाही. कारण वारीचे ध्येय पांडुरंगाची प्राप्ती हे आहे.वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम । पंढरीनाथ महाराज की जय! असा जयघोष केला जातो. स्थानपरत्वे या जयघोषात पंढरीनाथ ’भगवान’ की जय असा भेद आढळतो. अनेक ठिकाणी माउली ज्ञानेश्वर महाराजकी जय , जगद्गुरु तुकाराम महाराजकी जय, शान्तिब्रह्म एकनाथ महाराज की जय अशी विविधता आढळते. या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते. या वाक्याचा घोष करत वारी पुणे जिल्ह्यातून सासवडच्या घाटातून निरा नदीच्या दिशेने सातारा जिल्ह्यात प्रवेश करते. पुणे ते सोलापूर सातारा जिल्हामार्गे जाणे हा पालखीचा मार्ग आहे. दररोज सरारसी पंधरा ते वीस किलोमिटर चालत ही पालखी पुढे पुढे सरकत असते. त्यावेळी लाखो वारकर्‍यांच्या तोंडातून येणारा हरीनामाचा जप वातावरण प्रसन्न आणि शुद्ध करून जात असतो. त्याच्या हातातील टाळेचा नाद हा प्रत्येकाची ब्रम्हानंदी टाळी लावणार असतो. त्या परब्रम्हाशिवाय त्याला काहीच दिसत नाही. आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे त्याला कोण स्पर्श करणार आहे? वारकर्‍याला आत्मज्ञान झालेले असते. भगवंतांनी भगवत गीतेत दिलेले तत्वज्ञान त्याला समजलेले असते. आत्म्याला कोणताही स्पर्श होत नाही. ना अग्नी जाळू शकतो ना वारा वाहून घेउन जाउ शकतो. आत्मा हा  स्थिर असतो. त्यातून तो पांडरूंगाच्या परमात्म्याशी संवाद साधत असतो. तिथे कोरोना काय या वारकर्‍यांचे वाकडे करू शकणार आहे? त्यांनी आपले सर्वस्व विठ्ठल मानले आहे. सगळे काही पंढरपूर आहे. माझे माहेर पंढरी आहे भीवरीच्या तिरी असे म्हणत या पंढरपुरात माहेरी जाणार्‍या म्हणजे आपल्या मूळ आत्म्याकडे, परमात्म्याला भेटायला जाणार्‍याला कसलीच चिंता नसते. त्यामुळे ही वारी आज निघालेली आहे. त्या परमात्मा पांडरंगाच्या भेटीला चालली आहे. अशी ही भव्य वारी सासवडच्या घाटात येते आणि घाटातील वळणावळणात लांबवर ती वारीची रांग दिसते तेंव्हा त्याचे चित्र अनुपम असे असते. भक्तीचा सागर असतो तो. सागराचा जसा अंत आणि आरंभ दिसत नाही तसेच त्या वारीच्या पालखीच्या रांगेचा ना आरंभ दिसतो ना अंत दिसतो. संपूर्ण सासवडचा तो घाट, दिवा घाट हा वारीमय होउन पावन होत असतो. प्रत्येक पावलापावलात विठोब्बा असतो. पावलागणिक ज्ञानोब्बा, तुकोब्बा असतात. मनाने हे वारकरी केव्हाच विठ्ठलापर्यंत पोहोचलेले असतात. हा भाव सच्चा भाव असतो. यामध्ये एकुणच उदार भाव असतो. या वारीत कोणी नियमीत जातो. कोणी एकदा तरी करावी म्हणून जातो. कोणी कुणाच्या आग्रहाखातर जातो. या वारीचा आनंद, विठ्ठल भेटीचा आनंद प्रत्येकाला मिळावा म्हणून आनंद वाटणारे अनेक वारकरी या वारीत दरवर्षी नवनवीन लोकांना जोडत असतात. कारण आपला आनंद सर्वाना वाटावा हा भाव प्रत्येकाच्या मनात असतो. आग्रहाने कोणी येणारे असतात. त्यात एखादा श्रद्धा नसलेलाही असतो. गम्मत पहायची म्हणून आलेला असतो. आपला देवावर विश्वास नाही, पण वर्षानुवर्षे ही लोक काय वेड्यासारखी चालली आहेत हे पाहण्यासाठी येणारे अनेकजण असतात. पण ईश्वरभेटीचे वेड लागले तरच ईश्वराची प्राप्ती होत असते. एखाद्या गोष्टीचे वेड लागणे हेच त्याचा खरा ध्यास असलेले लक्षण असते. पण असे गम्मत म्हणून येणारे नंतर त्यांना जेंव्हा या वारीत अनुभूती येते. या वारीचे दर्शन घडते. वारीतील आत्मा, परमात्मा भेटतो. विठ्ठलाचे दर्शन झाल्याचा साक्षात्कार घडतो तेंव्हा तेही विठ्ठलमय होउन जातात. या वारीत सर्वजण शुद्ध होउन जातात. परिस जसा कोणत्याही लोखंडाला लागला तरी त्याचे सोनेच होते. अग्नी कशालाही लागला तरी त्याचे दहन होते. पाणी कशालाही लागले तरी ती जागा स्वच्छ होते, ओली होते तसेच वारीचा स्पर्श ज्याला लागला त्यात हौशे, गवशे, नवशे कोणीही आले तरी ते त्यात शुद्ध होउन जातात. म्हणून हा वारीचा प्रवाह, हा वारीचा मार्ग वर्षानुवर्ष टिकून आहे. मग कळत न कळत घडलेल्या या वारीचे वर्णन तो नवा जोडलेलाही भक्तीभावाने करतो. ते म्हणजे, एवढं एवढं एवढं शेजारणीनं केलं, मला पंढरीला नेलं या भजनाने तो या वारीचा महिमा गातो.बळेबळे नेले असले तरी मला त्या पंढरीचा महिमा कळला हे सांगताना तो वारकरी, नवा वारकरी, नवा वारकरी भारावून जातो आणि शेजारणीमुळं आपल्या जीवनाचं सार्थक झाले याबाबत कृतज्ञता मानतो.प्रफुल्ल फडके/9152448055..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: