लॉकडाउनचा चौथा टप्पा जरी 18 तारखेपासून सुरू झाला असला तरी त्याची नवी नियमावली उद्यापासून सुरू होत आहे. त्यामुळे 22 मे पासूनचे नवे जग कसे असेल हा प्रश्न आहे. आता अर्थव्यवस्थेला थोडी चालना मिळेल हे नक्की. पण यातून प्रत्येक माणसाची, राज्याची, देशाची आणि जगाची आर्थिक स्थिती भविष्य काय असेल हे आपल्याला पहावे लागेल.कोरोना व्हायरसने आज संपूर्ण जगभर धुमाकूळ घातला आहे. जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. मनुष्याने ओढवून आणलेले किंबहुना चीनने लादलेले हे संकट दिवसेंदिवस गंभीर होते आहे. आज जगभरात वर्चस्वाची जी स्पर्धा लागली आहे, त्या स्पर्धेतूनच कोरोनाचा जन्म झाला आणि हे पाप विस्तारवादी, साम्राज्यवादी चीनने केले आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अगदी उघडपणे म्हटले आहे. त्यांनी तर कोरोनाला ‘चिनी व्हायरस’ असेही म्हटले आहे. चीनला सुपरपॉवर होण्याची घाई झाली आहे आणि या घाईतूनच चीनने या व्हायरसची निर्मिती केली, असा आरोपही केला जात आहे, जो चीनचा स्वभाव लक्षात घेता खरा मानला पाहिजे. एखादा देश किंवा एखादी व्यक्ती आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकते, हे कोरोनाच्या प्रसाराने दाखवून दिले आहे. याला साक्ष आहे ती चीनमधल्या प्रसाराची. चीनमधला बाधितांचा आणि मृतांचा आकडा अत्यंत अल्प आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनने आपला आकडा मर्यादीत ठेवत संपूर्ण जगाला वेठीस धरले. संपूर्ण जग गेले चार महिने बंद पाडून त्यांच्या अर्थव्यवस्थेला खिळ घातली आहे. मात्र यातून चीन नामानिराळा राहु पहात आहे. कोरोना व्हायरस हे एकप्रकारचे जैविक अस्त्रच आहे, ज्याने जगभर थैमान घातले आहे. असंख्य अर्थव्यवस्था कोसळण्याच्या स्थितीत असताना, जिथे चीन जगभरच्या कंपन्या विकत घ्यायला निघाला आहे, तिथे अनेक विदेशी कंपन्या चीनमधून बाहेर पडू पाहात आहेत. अनेक कंपन्यांनी चीनमधील आपला गाशा गुंडाळायलाही सुरुवात केली आहे. जगभरातल्या गळेकापू स्पर्धेतून या व्हायरसचा जन्म झाला असावा, असे मानण्यास आजतरी जागा आहे. आज आपल्याजवळ जेवढे आहे, त्यापेक्षा अधिक कमवा, असे आजचे अर्थशास्त्र शिकविते. यातून अधिकाधिक कमावण्यासाठी अनैतिक स्पर्धा सुरू होते आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतात, हे लक्षात घेतले पाहिजे. अधिकाधिक पैसा कमवायचा, त्यातून स्वत:ची ताकद वाढवायची आणि वाढलेल्या ताकदीतून विस्तार करायचा, हा प्रकार भांडवलवाद जन्माला घालून खतपाणी देणाराच म्हटला पाहिजे. यामध्ये एक प्रकारचे आंतरराष्ट्रीय षडयंत्रही असल्याचा कधीकधी भास होतो. म्हणजे सामान्य माणसांना लागणारी नियमीत औषधेही औषध दुकानातून मिळत नाहीत. आपले नेहमीचे डॉक्टर, कन्सल्टंट हे किरकोळ ताप, सर्दी असल्या आजारांवर औषधे देण्यास तयार नाहीत. त्यामुळे दुखणी अंगावर काढणे भाग पडते आहे. विकोरीयल, अॅनासीन, अॅक्शन 500, विक्स असल्या गोळ्याही मेडीकल स्टोअरमधून दिल्या जात नाहीत. तशी मागणी केली तर लगेच कोरोनाची शक्यता आहे म्हणून पिटाळले जाते. त्यामुळे हा एकप्रकारचा छळ आहे. कारण ताप येणे, सर्दी पडसे होणे हा एक सवयीचा, शरीरधर्माचा भाग असतो. तो अधूनमधून येत असतो. त्यासाठी किरकोळ औषधे आयुर्वेदीक, अॅलोपथी घेउून आराम मिळतो. त्रिभुवन किर्ती, अडुळसा ही औषधे आपल्या घरच्या बटव्यातील औषधे आहेत. असे असताना ती दिली जात नाहीत आणि सामान्य नागरिंकाचे आजार वाढवले जातात. हे सगळे काही औषध कंपन्या, फार्मास्युटीकल कंपन्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी आहे का? अशा अनेक शंका आज निर्माण होत आहेत.त्याचप्रमाणे रूग्णांची, बाधितांची जी संख्या दिली जात आहे, ती पण खूप संशयास्पद आहे. एखाद्या घरातील एक़ा व्यक्तीला लागण झाली तर त्या घरातील पाचही व्यक्तींना अॅडमीट केले जाते. त्यांच्या संपर्कातीला पाच पंचवीसच लोकांना पकडले जाते. हा एकत्रित आकडा फुगत जातो , तो प्रसारमाध्यमे जाहीर करतात आणि घाबरवून सोडतात. त्यामुळे यात काही षडयंत्र आहे काय असाही प्रश्न निर्माण होतो. पण एकुणच जागतिक वर्चस्वाच्या या लढाईतून, स्पर्धेतून अनेक देशांनी महासंहारक शस्त्रास्त्रे निर्माण केली आहेत. या महासंहारक शस्त्रांचा वापर वर्चस्वाच्या लढाईत एकमेकांविरुद्ध झाला, तर संपूर्ण जग त्यात उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आज जगातल्या अनेक देशांकडे मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रे आणि हायड्रोजन बॉम्ब आहेत. यांचा दुरुपयोग झाला तर मनुष्यजातीसह या धरतीवरील सगळे पशू, पक्षी आणि प्राणी नष्ट होतील. तोच प्रकार कोरानाच्या संसर्गाने झालेला आहे. काही ठिकाणी वन्य पशूंना वाघांनाही हा रोग झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. तर काही ठिकाणी माकडांना झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. म्हणजे हे नक्की काय चालले आहे आहे? यातून कधी बाहेर पडायचेच नाही काय? आता भविष्यातील नुकसान टाळायचे असेल, तर आजच त्यावर विचार होणे गरजेचे आहे. आपली अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे, तिचे स्वरूप कसे असावे, यावर मंथन सुरू झाले पाहिजे. आज आपण ज्याला अर्थव्यवस्थेचा सिद्धांत असे म्हणतो, त्याचा आधार एकमेव आहे आणि तो म्हणजे भौतिकवाद. अर्थशास्त्राच्या प्रत्येक मूळ कल्पनेचा आधार हाच आहे. हाच त्याचा दृष्टिकोनही आहे. अर्थशास्त्राच्या दृष्टीने मानवाचे जे व्यवहार आहेत, ते उत्पादक वा अनुत्पादक असू शकतात. मनुष्याच्या ज्या व्यवहारामुळे काही ना काही प्रमाणात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीत्या भौतिक गरजा पूर्ण होतात, त्याला उत्पादक व्यवहार असे आपण म्हणू शकतो. अर्थशास्त्राचे हे स्वरूप समजून घेणे तसे कठीणच आहे. पण, ते आपल्याला समजून घ्यावे लागेल. मनुष्यजातीचे अस्तित्व सुरक्षित करायचे असेल, तर वर्चस्वासाठीच्या लढाईला पूर्णविराम कसा देता येईल, याचा विचार करावा लागेल. आपल्या गरजा किती आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी नेमकी कशाची आवश्यकता आहे, याचा विचार करून जगभरातील देशांना आपली धोरणे सुनिश्चित करावी लागतील. अन्यथा, यापूर्वी झाले नसेल एवढे प्रचंड नुकसान भविष्यात होईल, हे कायमचे लक्षात ठेवावे लागेल. जगाचं जे काय व्हायचं ते होत राहील. आपण भारताच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. जगातल्या अनेक देशांमध्ये आर्थिक मंदी आली असतानाही आणि अमेरिकेसारख्या देशाने गतकाळात आर्थिक निर्बंध लादले असतानाही आपली अर्थव्यवस्था तग धरून राहिली होती. भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यांमुळेच हे शक्य झाले. आपली अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवरच आधारित आहे. लॉकडाऊन चारची घोषणा करताना पंतप्रधान मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ ही नवी कल्पना देशवासीयांपुढे मांडली आणि ती सगळ्यांना आवडलीही. प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर कसे होता येईल आणि स्वावलंबी बनून देश मजबूत कसा करता येईल, याचा विचार मांडताना मोदींनी काळाची पावलं ओळखली आहेत, हेही तेवढेच खरे! अमेरिकेसारख्या देशाला औषधांचा पुरवठा करून भारताने जगाला आपली ताकद आणि क्षमता यांचा परिचय करून दिला आहे. तरी अजूनही बरेच काही करण्याची गरज आहे. सरकारच्या पातळीवर जे प्रयत्न व्हायचे, ते सुरू आहेत आणि राहतीलच. पण, या देशाचा एक सतर्क आणि कर्तव्यदक्ष नागरिक या नात्याने आपल्यापैकी प्रत्येकाने स्वदेशीचा अंगीकार करायला शिकले पाहिजे. चीन आणि सर्वच परकीय वस्तूंवर बहिष्कार टाकून आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा निर्धार हेच या युद्धाचे मुख्य हत्यार असणार आहे.आज संपूर्ण जग कोरोनामुळे भयग्रस्त झाले आहे. मनुष्यजात स्वत:ला घरात कोंडून बसली आहे, नव्हे, कोरोनाने माणसाला घरात बसण्यास बाध्य केले आहे. पण ही मरगळ झटकण्याची हीच वेळ आहे.
सोमवार, १ जून, २०२०
या संघर्षात स्वदेशीचे महत्व पटेल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा