आज आषाढस्य प्रथम दिवस. कवी, साहित्यिकांना हा दिवस म्हणजे महत्वाचा दिवस असतो. आज कालीदास जयंतीही असते. या दिवसानिमित्ताने साहित्याचा विचार केला जातो. धो धो पावसात कोसळणार्या धारांप्रमाणे साहित्याची विचारधारा असली पाहिजे. आमची पंढरीची वारी ही साहित्याची दिंडीही घेउन येत असते. म्हणूनच साहित्य संमेलनाची सुरवातही मग ते कोणतेही असो अगदी अखिल भारतीय असो वा गावपातळीवरील असो त्यात साहित्य दिंडी काढली जाते. साहित्याचा आणि आमच्या पंढरीच्या वारीचा संबंध हा अतूट असतो. आमच्या संतांनी केलेले अभंग, ओव्या हे साहित्याचे फार मोठे योगदान आहे. लोकसाहित्याचे ते प्रकार आहेत. म्हणूनच आषाढ महिन्याची सुरूवात आणि पंढरीकडे जाण्याची वाट जवळ आल्यावर संत साहित्याचाही विचार या वारीत होत असतो. म्हणून या वारीला सर्वसमावेशक म्हटले आहे. फक्त भक्तीभाव नाही तर विचार आहे. शक्ती, भक्ती यांचा संगम म्हणजे आमची पंढरीची वारी.
एकादशीच्या आधी सुमारे वीस दिवस आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी बरोबर चालत पंढरपूरला नेतात. या दिंडीत सहभागी होणा-यांना वारकरी म्हटले जाते. विठ्ठलाचे भक्तीत दंग झालेले वारकरी एकतारी व टाळ, झांजांच्या तालावर तुकोबा, ज्ञानेश्वरांचे अभंग गात ही पालखी खांद्यावरून पंढरपूर पर्यंत चालत नेतात. हे आमचे संत साहित्य असते. म्हणजे आपल्याकडे संत साहित्य संमेलन भरवले जाते. पण वारीत ते कळत नकळत वर्षानुवर्षे होत असते. इथेही वेगवेगळी व्यासपिठे असतात. प्रत्येकाला कसलाही भेदभाव न करता या वारीत संधी मिळते. इथे आमचा एकच अध्यक्ष असतो तो म्हणजे आमचा विठोबा. बाकी सगळे आम्ही त्याचे भोई. त्या पंढरीच्या साहित्याचे हे भोई म्हणजेच संत साहित्य. संत साहित्य हे अभंग आहे. अतूट आहे. अविट आहे. भागवत संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून दरवर्षी ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्या अनुक्रमे आळंदी व देहू येथून निघून पंढरपूरला जातात. आषाढी एकादशीला - म्हणजेच आषाढ शुध्द एकादशीला सर्व भक्तगण पंढरपूरला विठोबा-रखुमाईचे दर्शन घेतात आणि द्वादशीला आपापल्या गावी परततात. या दोन महत्त्वाच्या पालख्यांबरोबरच संत ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ संत सोपानदेव यांची पालखीही सासवड येथून निघून पंढरपूरकडे रवाना होते. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोचलेला हा सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा फक्त भक्तीपंथेची जावे असे न सांगता विचारांच्या, विवेकाच्या मार्गाने जावे असेही शिकवत असतो. भक्ती असावी, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी हे शिकवणारा हा मार्ग आहे. म्हणूनच इथे तयार होणारे सगळे लोकसाहित्य हे विवेकावर आधारीत असते. एकनाथांची भारूडे तर अशा अंधश्रद्धांवर आसूड ओढणारी आहेत. तुकाराम महाराजांचे अभंगही बंडखोरी करून वाईट चालीवर प्रहार करतात. वारकरी हा भक्तीत गुंग, सदाचारी, निर्व्यसनी असतो अशी श्रध्दा आहे. विशेषत: गळयात तुळशी माळा घालून कपाळी गंधाचा टिळा लावून, मद्य किंवा मांसाहार करणे अत्यंत निशिध्द मानले गेल्यामुळे ‘माळकरी’ वारकरी सात्विक आहे हा पक्का समज असतो. त्यामुळे त्याच्या अभंगातून अत्यंत स्पष्टता आणि भीडभाड न ठेवणारी वृत्ती दिसून येते. पंढरपूरच्या वारीत काही शतकांपूर्वी जातीय व्यवस्थेवर आधारित असे भक्तांचे समूह केले जात आणि त्यांना विशिष्ट क्रमांक दिले जात. त्या समूहांना ‘दिंडी’ असे म्हणतात. या सोहळयात सहभागी होणारे भक्तजन आपापल्या दिंडीत एकत्र राहून पंढरपूरपर्यंत पायीपायी चालत जातात. आता मात्र नव्या दिंडया जातीय व्यवस्थेवर आधारित नाहीत. प्रत्येक दिंडीचा प्रमुख एक ‘वीणेकरी’ असतो. वीणेकरी म्हणजे ज्याच्या गळयात वीणा असते तो. एका दिंडीला एकच वीणेकरी असतो. वीणेक-यानंतर टाळकरींचा मान असतो. प्रत्येक दिंडीचे 5 ते 10 पर्यंत ध्वज असतात. ते ध्वज कावेने रंगविलेले असतात. दिंडीमध्ये प्रामुख्याने बहुजन समाज, शेतकरी वर्ग आणि आजकाल सुखवस्तू पांढरपेषा लोकही थोडयाबहुत संख्येने सामील होतात. स्त्री-पुरुष , काहीवेळा अख्खे कुटुंबच्या कुटुंबही दिंडीत सहभागी होते. साधारणत: धोतर किंवा पायजमा, सदरा,गांधी टोपी असा पुरुषांचा तर नऊवारी साडया असा स्त्रीयांचा पोषाख असतो. ज्या स्त्रिया काही नवस बोललेल्या असतात त्या नवस फेडण्यासाठी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालत जातात. कपाळी बुक्का किंवा चंदनाचा टिळा, हातात झांजा किंवा एकतारी, गळयात तुळशीच्या माळा, मुखी विठ्ठलाचे नाम, ज्ञानेश्वरांच्या ओव्या किंवा तुकारामांचे अभंग, भक्तीरसात न्हालेले मन आणि ऊन-पाऊस-वादळ-वारा यांना न जुमानता विठुरायाच्या ओढीने पायी अंतर पार करण्यासाठी आसुसलेली पावले असे हे जनताजनार्दनाचे रुपडे असते. हा जनता जनार्दन आपल्या संत साहित्याची, अभंगाची उजळणी, अभ्यास करत असतो. त्यावर विवेचन करतो. हरी चा अर्थ समजून घेतो. अहंकार त्यागण्यासाठी नेमके काय करायचे असते याचा अर्थ त्याला समजलेला असतो. ही सत्ता आहे अशी माज करणार्या राजकारणी, समाजधुरीणांच्या वागणुकीकडे अत्यंत दुरून हा वारकरी पाहतो. कारण त्याला दांभिकपणाची ओळख पटलेली असते. याचे कारण त्यांच्या कानावर संत साहित्य पडलेेले असते. संताचे विचार अंगी बाणवलेले असतात. ‘चाले हे शरीर कोणाचिये सत्ते, कोण बोलविते हरीविण, देखवी दाखवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका’ या समर्पक ओवीच्या आविर्भावात चेह-यावर प्रवासाचा शीण जराही उमटू न देता वारकरी दिंडीबरोबर चालत रहातात. या कालावधीत संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या देवस्थानांतर्फे ‘अभंग गाथा’ आणि ‘ज्ञानेश्वरी’ यांच्या प्रती अत्यल्प दरात विकल्या जातात. हजारो लोक हे धार्मिक ग्रंथ या वेळी विकत घेतात. ही साहित्यिक उलाढालही फार मोठी असते. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस.आषाढ हा महाराष्ट्रातील पावसाच्या आगमनाचा महिना. पावसाच्या सरी येत जात असतात. पाउस असो उन असो दिवसा लवकर उठून शूचिर्भूत होऊन अभंग म्हणत म्हणत चालू लागायचे, मध्यान्हीला पोटपूजा आटोपून रस्त्याच्या कडेच्या वृक्षांखाली थोडी विश्रांती घ्यावयाची व पुन्हा चालणे सुरू करायचे. अंधार पडला की जवळपासच्या गावी किंवा वस्तीवर मुक्काम करायचा असे वारक-यांच्या प्रवासाचे स्वरूप असते. काही काळानंतर त्याला एकसुरीपणा येतो. तो एकसुरीपणा घालविण्यासाठी आणि मनोरंजनासाठी ‘रिंगण’ नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा सोहळा पालखीबरोबर पार पाडला जातो. एखाद्या मोकळया मैदानाच्या जागी भक्तगण गोळा होतात. आणि उभे किंवा वर्तुळाकार रिंगण तयार केले जाते. म्हणजे पालखी, ध्वज हे मध्यभागी ठेवून भक्तगण त्याभोवती वर्तुळाकारात उभे रहातात किंवा दोन समांतर ओळीत उभे रहातात. रिंगणात रांगोळयांच्या पायघडया घातल्या जातात. मानाचे दोन अश्व हे प्रशिक्षित असतात. यापैकी एका अश्वावर कुणीच आरूढ होत नाहीत . त्याला ‘माऊलीचा’ अश्व म्हणतात. दुस-या अश्वावर एक कानडी घोडेस्वार आरूढ होतो. माऊलीचा अश्व सुमारे एक कि. मी. वरून पळत येऊन रथात असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना मान टेकवून नमस्कार करतो, रथाला प्रदक्षिणा घालतो आणि चोपदाराने आदेश दिला की पुन्हा पळत जातो. हा क्षण पहाण्यासाठी लाखो वारकरी डोळयात प्राण आणून वाट पहात असतात. ठराविक संकेतानंतर हे अश्व गोलगोल फे-या घालून रिंगण घालतात किंवा समांतर उभ्या राहिलेल्या वारक-यांमधून एका टोकाकडून दुस-या टोकाकडे धावतात. अश्वाला स्पर्श करण्यासाठी वारकरी आसुसलेले असतात. मानाच्या अश्वाची रिंगणे झाली की वारकरी त्या रिंगणात उतरून झिम्मा-फुगडी, विविध प्रकारच्या उडया, लेझिम, भारुडे असे सामुदायिक खेळ खेळतात. खेळात भाग न घेतलेले वारकरी बाहेरच्या गोलात उभे राहून हा मनोरंजनाचा कार्यक्रम पहातात. पालखीच्या मुक्कामात गावोगावी अशी रिंगणे होतात. भगव्या रंगाचे झेंडे आषाढाच्या मेघाच्छादित ‘सावळया’ आकाशाच्या पार्श्वभूमीवर फार उठावदार दिसतात. भडक गुलाबी किंवा केशरी रंगाची पागोटी आणि हिरव्या, जांभळया किंवा लाल रंगाची लुगडी नेसलेल्या स्त्रिया पावसाळी हवेतील जराशा अंधारलेल्या वातावरणात रंगत आणतात. जमिनींवर पाणी पिऊन हिरवी लव उगवायला लागलेली असते. अबीर-बुक्क्याची उधळण चालू असते. टाळ,चिपळया, मृदुंग, हरिनामाचा घोष, सामुदायिक अभंगपठण या नादांची मेघांच्या गर्जनांशी स्पर्धा चालू असते. पावसाच्या सरी कधी सुखद अशा रिमझिमत्या पावसाच्या सरींनी वारक-यांना शूचिर्भूत करतात तर कधी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढतात. अशा सरीवर सरी घेत आषाढातील पावसात वारी पुढे सोलापूर जिल्ह्याच्या दिशेने चालू लागते. प्रफुल्ल फडके/ 9152448055
|
रविवार, २१ जून, २०२०
चाले हे शरिर कोणाचिये सत्ते/
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा