अंधश्रद्धेचा बाजार थांबवा
कोणतेही
संकट आले की आपल्याकडे देवाला साकडे घालण्याची परंपरा आहे. पण देवाला
घातलेेले साकडे हे फक्त त्या संकटातून तरण्याची, संकटाशी सामना करण्याची
ताकद मिळावी यासाठी असते. देव तुमचे कोणतेही संकट दूर करत नसतो. संकटाशी
मुकाबला हा करावाच लागतो. जे भोग आहेत ते भोगण्याशिवाय कोणताही पर्याय
नसतो. पण कोरोनाच्या निमित्ताने आता देशात अंधश्रद्धा पसरवली जात आहे. काही
हौशे गवशे नवशे याचा गैरफायदा घेत आहेत. महाराष्ट्रात त्याचा फारसा
परिणाम होणार नाही कारण महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. पण
सध्या आलेल्या कोरोनाच्या संकटात अन्य राज्यात अंधश्रद्धेचे स्तोम माजत
चालले आहे. विशेषत: उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि आसाम यांसारख्या
राज्यांमधील महिलांनी तर कोरोनाला देवीचे रूप मानले आहे. कोरोनामातेचा कोप
झाला आहे आणि तो दूर करण्यासाठी तिची पूजा केली जात आहे. यावरून आपल्याला
देशात जागरूकता किती आहे, हे सहज लक्षात येईल. कोरोनामातेची पूजा केली तर
देवीचा कोप संपुष्टात येईल आणि ती आपल्यातून निघून जाईल, अशी जी भावना तयार
झाली आहे आणि त्यातून कोरोनामातेचे जी पूजाअर्चा सुरू आहे, हे फार घातक
आहे. कोणतीही अंधश्रद्धा पसरत जाणे हे घातक असते. आपल्याकडे याचा प्रसार
फार वेगाने होतो. म्हणजे रोगापेक्षा आणि साथीपेक्षाही प्रचंड वेग अशा
घटनांना असतो.
खरं तर कोरोनाला हरवायचे असेल, तर वैज्ञानिक दृष्टिकोन
ठेवणे आवश्यक आहे. त्याऐवजी अंधश्रद्धा पसरवली जाणार असेल, तर संकट दूर कसे
होईल? कोरोनापासून बचाव करण्यासाठी मन पक्के असणे हा लढाईचा एक पैलू आहे.
ईश्वराची आराधना केल्यास मानसिक बळ मिळते, ही आपली श्रद्धा आहे. त्यामुळे
या श्रद्धेचे पालन करून मानसिक बळ वाढविणे यात चूक काहीच नाही. पण,
कोरोनाला देवीचे रूप मानून, ती कोपली आहे असे समजून जी अंधश्रद्धा पसरवली
जात आहे, तिला कुठेतरी आळा घातला जाणे गरजेचे आहे. कोणताही देव किंवा देवी
ही माणसाचे गैर कसे काय करेल? असे करत असेल तर त्यांना देव कसे म्हटले
जाईल? देव संकट दूर करत असता तर राम कृष्णांना संघर्ष करावा लागला नसता.
संकटांशी आपणच लढा द्यायचा असतो हे राम कृष्ण यांनी दाखवून दिले आहे. ते तर
ईश्वराचे अवतार असूनही त्यांना संघर्ष करावा लागला आहे, आपण तर सामान्य
माणसे आहोत. त्यामुळे हा लढा आपल्याला द्यायचा आहे. कसल्याही अंधश्रद्धा न
बाळगता काम करणे गरजेचे आहे. पण यूपी, बिहारसारखी मागास राज्ये, अविकसीत
राज्ये हा प्रकार करत आहेत आणि त्याचा प्रसार देशभर होण्याची भिती आहे.
आपल्यापैकी
प्रत्येकाने पावलोपावली सतर्क राहणे आणि आणि इतरांना सतर्क करणे गरजेचे
असताना अंधश्रद्धेला खतपाणी घातले जाते, हे समाजविघातक कृत्य मानले पाहिजे.
सरकारच्या पातळीवरून जागरूकता अभियान जोरात सुरू आहे. विविध सामाजिक
संघटनाही आघाडीवर आहेत. वर्तमानपत्रांमधूनही बातम्या दिल्या जात आहेत,
टीव्हीवर तर उपायांचे प्रात्यक्षिकच बघायला मिळते आहे. असे असतानाही उपाय
प्रभावी का ठरत नाहीत, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. जागरूकता
निर्माण करण्यासाठी जे अभियान प्रशासनाकडून राबविले जात आहे, इतरांकडून
राबविले जात आहे, त्यात काही त्रुटी तर नाहीत ना, याचाही शोध तातडीने घेतला
पाहिजे आणि प्रभावी उपाय अंमलात आणले पाहिजेत. ज्या गतीने कोरोनाच्या
रुग्णांची संख्या भारतात वाढत आहे, ती चिंता वाढविणारी आहे. काय होणार,
परिस्थिती कधी सुधारणार, सुधारणार की आणखी बिघडणार, रोजगाराचे काय होणार,
मुलांच्या शिक्षणाचे काय होणार... असे अनेक प्रश्न सतावू लागले आहेत. पण
त्यासाठी वाट पाहणे, काम करणे हेच आपल्या हाती आहे. कोणाही बुवा, बाबाला
साकडे घालून हा प्रश्न सुटणार नाही.
आता कोरोना व्हायरस किती घातक आहे,
कसा संक्रामक आहे, संक्रमण होते कसे, मनुष्यावर हा व्हायरस कसा आक्रमण
करतो, याबाबत देशातील बहुसंख्य लोक अजूनही अज्ञानी आहेत, हे सगळ्यात मोठे
दुर्दैव आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वेळोवेळी जनतेला माहिती देण्याचा
आटोकाट प्रयत्न केला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय काय उपाययोजना
केल्या पाहिजेत, याबाबत मार्गदर्शन केले. असे असतानाही लोकांना संकटाचे
गांभीर्य कळू नये, हे अनाकलनीय आहे. कोरोनामुळे देशात प्राणहानी होऊ नये
यासाठी अब्जावधी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करून केंद्र सरकारने लॉकडाऊन
घोषित केले. या लॉकडाऊनच्या काळात उद्योग-व्यवसाय ठप्प होते. मजुरांच्या
हाताला काम नव्हते. कारखाने बंद असल्याने अनेक ठिकाणी कामगार कपात झाली,
अजूनही सुरू आहे. शाळा-महाविद्यालये बंद आहेत. सगळीकडून प्रचंड नुकसान होते
आहे. अशा स्थितीत नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे कठोरपणे पालन करणे
अपेक्षित होते. कोरोनापासून स्वत:चा आणि इतरांचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती
काळजी घेणे अपेक्षित होते. परंतु, या आघाडीवर नागरिक अपयशी ठरले असल्याचे
दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी
कोरोनाला थोपविण्यासाठी जे जे म्हणून प्रयत्न केलेत, त्यावर आपणच पाणी
फेरले आहे. कोरोना नियंत्रित ठेवण्यात भारताने मोठे यश मिळविल्याबद्दल
संपूर्ण जगाने भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुरुवातीला कौतुक
केले होते. पण, आज कौतुक करण्यासारखी परिस्थिती राहिली आहे काय, याचा
नागरिकांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. प्रश्न असा पडतो की, लोकांना
कोरोना व्हायरस किती घातक आहे याचीच नीट माहिती अजूनही नसेल, तर त्यांनी
काळजी घ्यायचीच कशी? सुरक्षेचे कोणते उपाय केले पाहिजेत, याबाबत सरकार
दिवसरात्र नागरिकांना समजावून सांगत आहे. पण, त्याचा उपयोग होताना दिसत
नाही. मास्क लावूनच घराबाहेर पडावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, काम नसेल
तर घरीच सुरक्षित राहावे, हात साबणाने सतत धुवावेत, सॅनिटायझरचा वापर
करावा, अन्न शिजविताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत सगळी तपशीलवार माहिती
सरकारकडून दिली जात असतानाही नागरिक त्या माहितीचा उपयोग करताना दिसत
नाहीत, याला काय म्हणायचे? हे सगळं बाजूला ठेवून जर कोणी अंधश्रद्धा पसरवत
असेल तर ते फार घातक आहे. अंधश्रध्देचा हा बाजार चीनी बाजारापेक्षा घातक
असेल. म्हणून अंधश्रद्धांना रोखण्याचे काम केले पाहिजे. कोरोना हा
कोणत्याही कोपाने निर्माण झालेला रोग नाही तर तो चीनच्या पापाने झालेला आहे
त्यावर उपाय म्हणजे चीनी मालावर बहिष्कार टाकणे हाच आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा