बुधवार, ८ जानेवारी, २०२५

खरंच याची गरज आहे का?


काही काही गोष्टी माणसे अनावश्यकपणे करत असतात. त्या अनावश्यक किंवा गरज नसताना केलेल्या गोष्टींमुळे माणसे अडचणीत सापडतात. लोकलमध्ये होणारी मोबाइल चोरी, साखळी चोरी, बॅग लंपास करणे, पाकीटमारी हे यातलेच प्रकार असतात. आपण थोड्याशा खबरदारीने हे प्रकार टाळू शकतो, म्हणजे लोकलचा प्रवास अवघड, धोकादायक, असुरक्षित म्हणून टीका करणे खूप सोपे आहे, पण हा धोकादायक, अवघड प्रवास करताना आपण किती हातभार लावलेला असतो आणि त्या धोक्यांना आमंत्रण देत असतो याचाही विचार केला पाहिजे. लोकलमध्ये, ट्रेनमधून प्रवास करताना महिलांचे मंगळसूत्र खेचले, साखळी खेचली असे प्रकार आपण नेहमी ऐकतो. मोबाइल लंपास केला, लॅपटॉप पळवला हे ऐकतो, परंतु हे प्रकार आपल्याला टाळता आले असते याचा आपण थोडा विचार केला पाहिजे. काळाच्या बदलत्या परिणामानुसार पाकीटमारी बंद झाली आहे. कारण आता गुगलपे, पेटीएम आणि यूपीआय अंगवळणी पडल्यामुळे कोणाच्याच पाकिटात पैसे नसतात. असतो तो पास, एटीएम कार्ड, डेबिट-क्रेडिट कार्ड, व्हिजिटिंग कार्ड, वगैरे वगैरे. त्यामुळे एकेकाळी पाकिटमारीचे मोठे मार्केट असलेली मुंबई आणि लोकल आता पाकीटमारीमुक्त झालेली आहे, पण त्यांनीही काळाच्या ओघात आपला मोर्चा अन्य बाबींकडे वळवला आहे. त्यामध्ये मोबाइल, मंगळसूत्र, सोनसाखळी वगैरे, वगैरे.


लोकलमधून प्रवास करताना ती उद्घोषणा करणारी बाई तीन-तीन मिनिटांनी प्रत्येक स्टेशन जवळ आल्यावर सांगत असते की, कृपया आपला मोबाइल व मौल्यवान वस्तू सांभाळा. रेल्वे प्रशासन आपल्याला सतत सावध करत असते. तरीही आपल्या हातून चुका होतात आणि चोरीचा फटका बसतो. इतकी गर्दी लोकलला असताना कुठे खाजवायलाही वेळ नसतो. मग या गर्दीत फोनवर बोलण्याचा अट्टाहास लोक का करतात? मुंबई लोकलमध्ये फटका गँग सतत कार्यरत असते. बेसावधपणे फोनवर बोलणाºयाला फटका देऊन केव्हा मोबाइल उडवतात हे समजतही नसते. गर्दीत इकडे-तिकडे बघेपर्यंत मोबाइल कुठल्या कुठे पोहोचलेला असतो. गाडी सुटलेली असते, तेव्हा विचार केला पाहिजे की, खरंच गरज होती का लोकलमध्ये मोठमोठ्याने फोनवर बोलायची? फोन कट केला, एरोप्लेन मोडवर टाकला किंवा बंद करून ठेवला आणि लोकलमधून उतरल्यावर सुरू केला, तर काय फरक पडला असता?

लोकलमधून फोनवर बोलणारे कित्येक संवाद हे अत्यंत फालतू, घरगुती असे असतात, म्हणजे कोणतेही अर्जंट कामाचे नसतात. गप्पा, एकमेकांवर टीका, आॅफिसात बॉसने कसे झापले, कोणाला कोणी कसे अडचणीत आणले यावर एकमेकांना कळवण्याचे प्रकार होत असतात. अनेक वेळा गॉसिपिंग केले जात असते. याची खरंच गरज असते का? ते नंतर केले तरीही चालण्यासारखे असते. कोणतीही अर्जंट बाब नसताना फोनवर बोलून बेसावध व्हायचे आणि मोबाइल उडवला म्हणून लोकलच्या नावाने शिमगा करण्यात काहीच अर्थ नसतो. थोडीशी काळजी घेतली तर हे प्रकार टाळता येऊ शकतात. कॉल रिसिव्ह न करता मेसेज टाकता येतो. नंतर फोन करतो, असे कळवता येते. ही खबरदारी घेतली तर बरेचसे चोरीचे प्रकार टळतील. तोच प्रकार महिलांचे मंगळसूत्र, सोनसाखळी बाबतीत असतो. मोठे लांबसडक मंगळसूत्र, सोन्याची साखळी बाहेर लोंबत ठेवण्याची गरज नाही. प्रवासात असताना ते आत टाकले, ड्रेसच्या आत झाकून घेतले, ब्लाऊजच्या आत लपवले, तर काय हरकत आहे? एखादी सेफ्टी पीन लावली आणि ती कपड्याला अटॅच केली, तर मौल्यवान दागिना सुरक्षित राहील. मुख्य कार्यक्रम स्थळी गेल्यावर ते बाहेर काढता येऊ शकते. गर्दीत ते आत लपवून ठेवण्याची खबरदारी घेतली तर चेन खेचण्याच्या प्रकाराला आळा बसेल. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त महिलांनी महिलांच्या डब्यातून प्रवास करावा. जनरल डब्यात गर्दी करायला आल्यावर चोरट्यांना सहजपणे ते सापडू शकते. त्यामुळे थोडी खबरदारी आपल्या जीवाचे आणि मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करू शकते, हे लक्षात घेतले पाहिजे. मौल्यवान आणि किमती वस्तूंचे अशा गर्दीच्या ठिकाणी प्रदर्शन करण्याची गरज आहे का? याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक वेळी लोकल प्रवासाला दोष देण्याची गरज नाही, तर खरी गरज आहे, आपण खबरदारी घेण्याची. आपली थोडीशी खबरदारी, रेल्वेत फोनवर बोलणे टाळले, तर आपले फोन आणि दागिने सुरक्षित राहू शकतील.


त्याचप्रमाणे लोकल प्रवासात गर्दी नसतानाही दरवाजाच्या पॅसेजमध्ये उभे राहून उतरणाºयांना त्रास होईल अशाप्रकारे अनेक जण उभे असतात. दरवाजात उभे राहून गर्दी करायची. उतरणार आहात का म्हणून मागच्या प्रवाशाने विचारल्यावर प्लॅटफॉर्मला गाडी लागत असताना दरवाजाला धरून उतरत पळत जायचे आणि एक हात धरून उभे राहायचे. बाकीचे उतरल्यावर पुन्हा चढायचे. असले प्रकार करणारे नगही खूप असतात. त्यांच्यामुळे अनेक जण लटकत राहतात. लोकलमध्ये गर्दी नाही तरी दरवाजात लटकून लोकांना त्रास देणारेही खूप असतात. या अनावश्यक गोष्टींना आळा घातला गेला पाहिजे.

प्रफुल्ल फडके/अन्वय


९१५२४४८०५५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: