मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. देशमुख यांच्या मारेकºयांना शिक्षा करावी, तसेच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मूक मोर्चात जनतेचा आक्रोश पाहायला मिळाला. रविवारी पुण्यातही मोठ्या संख्येने या मोर्चात सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मोर्चात मृत संतोष देशमुख यांची दोन्ही मुले, पत्नी तसेच बंधू धनंजय देशमुख यांचाही सहभाग होता. परभणीत आंबेडकरी विचारांच्या सुशिक्षित तरुणाचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू हा पोलिसांनी केलेली हत्याच आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. या दोन्ही घटनांवर जनतेने व सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी वस्तुस्थिती मांडली आहे. त्यानंतर सरकारने वेगाने हालचाली केल्या आहेत. तीन मुख्य आरोपींना पकडण्यातही यश आलेले आहे. त्यामुळे आता थोडे संयमाने घेतले पाहिजे. जेणेकरून तपास करणाºया यंत्रणेवर भावनिक दबाव निर्माण होणार नाही.
हे सरकार प्रायोजित असल्याने सीआयडी चौकशी केली तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही, अशी टीका काँग्रेसकडून सातत्याने होते आहे. नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यात चुरस लागली आहे की, कोण जास्तीत जास्त टीका करतो. तर शिवसेना(ठाकरे गट) नेते संजय राऊत हेही यात हात धुवून घेत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषणचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी केज येथे जाऊन आढावा घेतला होता. देशमुख हत्याप्रकरणी राज्य सरकारने सीआयडीतील उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती केली आहे. बीड, परभणी, पुण्यामध्ये हजारोंच्या संख्येने निघालेल्या मोर्चात सर्वच नेत्यांनी अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर हल्ला चढवत त्यांच्या राजीनाम्याची एकमुखी मागणी केली. यावेळी बोलताना भाजप आमदार सुरेश धस म्हणाले की, बीडमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गोली मार भेजे में नाहीतर गोली मार किधर भी असे सुरू आहे. आतापर्यंत इथे अनेक हत्या झाल्या. या लोकांनी अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले, जमिनी लाटल्या. अशा लोकांना बिनभाड्याच्या खोलीतच पाठवायला हवे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. अनेकांकडे बंदुकीचे परवाने आहेत. हे परवाने ज्यांनी दिले त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. आम्ही पाच वेळा आमदार झालो, पण आम्हालाही या ठिकाणी सुरक्षा मागावी लागते, असेही आमदार धस म्हणाले. या प्रकरणाचा वाल्मीक कराड आका असल्याचे बोलले जाते. वाल्मीक कराड यांच्या मागे ज्यांनी शक्ती उभी केली ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असेपर्यंत या प्रकरणात न्यायाची अपेक्षा नाही. या विषयावरून सरकारला घेरण्याची संधी विरोधकांना आलेली आहे. विशेष म्हणजे गेल्या १५ दिवसांत अजित पवारांचे एकही वक्तव्य कुठे आलेले नाही, त्यामुळे सगळे चिंतेत आहेत.
रविवारच्या पुण्यातील मोर्चातही संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी असल्याचे सांगितले जाते. संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवारांना सरळ सरळ आव्हान देताना म्हटले आहे की, तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. तुमची काम करण्याची पद्धत परखडपणाची असेल तर तुम्ही करेक्ट कार्यक्रम करा. तुम्हाला बीडचा बिहार करायचा आहे का? असा सवालही त्यांनी केला. देशमुख यांच्या हत्येवरून वादाच्या भोवºयात सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली कसलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. फक्त देशमुख यांची हत्या करणारे गुन्हेगार आणि त्यामागचे सूत्रधार यांना फाशीची शिक्षाच देण्यात यावी, अशी आपली पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे असे सांगून या घटनेवरून आपल्याला राजकीय व सामाजिक जीवनातून उठविण्याचा काहींचा डाव असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला होता. परंतु आता विरोधकांनी कुठे तरी थोडा संयम दाखवण्याची वेळ आलेली आहे. मुख्य आरोपी पकडले आहेत. पोलिसांनी १४ दिवसांची कोठडी त्यांना मिळवली आहे. या काळात ते या तिघांना बोलते करून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचतील आणि तपासकार्य वेगाने होईल अशी अपेक्षा आहे. तो तपास होईपर्यंत थोडा संयम आवश्यक आहे.
झालेली घटना अत्यंत वाईट आहेच. त्या नराधमांना कठोरात कठोर शासन होणे आवश्यक आहेच. पण आता पोलिसांनी सगळ्याच्या मुसक्या आवळल्या असताना त्यांना योग्यपणे चौकशी करता येणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्यावर घाईघाईने तपास करण्याचा दबाव येता कामा नये. यानिमित्ताने बीडमधील वातावरण खूपच बिघडले आहे हे पुन: पुन्हा अधोरेखित होत आहे. या दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यापण काही मुद्दे मांडत आहेत. त्यांच्यावरही मुंडे बंधू भगिनींच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक त्रास देण्याचे प्रकार होत असल्याचे दमानिया यांनी रविवारी जाहीरपणे सांगितले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास योग्यप्रकारे होणे गरजेचे आहे. जनतेला खूश करण्यासाठी बदलापूरप्रमाणे कोणाचा एन्काऊंटर इथे होता कामा नये, यासाठी हा संयम आवश्यक आहे. आपल्या निदर्शनांचा, टीकेचा परिणाम पोलिसांवर होणार नाही आणि त्याचा फायदा गुन्हेगारांना मिळणार नाही याची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जनतेचा आक्रोश आता पोलिसांपर्यंत, सरकारपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे ते वेगाने काम करतील ही अपेक्षा ठेवून थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा