शनिवार, १८ जानेवारी, २०२५

बंद पडलेले खेळ


दोन घडीचा डाव, याला जीवन एैसे नाव... हे रामशास्त्रीमधले सागरगोटे खेळतानाचे गाणे पाहिले की वाटायचे, दोन घडीचा कसला दिवसदिवस या खेळात आपण रमत असतो, पण असे घडवणारे खेळच कालबाह्य झाले आहेत. कारण मोबाइल गेम, व्हिडीओ गेमपासून पबजी आणि असल्या खेळापर्यंत फक्त अंगठ्याने एका जागी बसून खेळायचे खेळ आले आहेत. त्यामुळे नव्या पिढीला हे जुने खेळ कसे माहिती असणार?


बिल्डरांनी, राजकीय नेत्यांनी मैदाने बळकावली, शाळासुद्धा फक्त इमारतीत भरू लागल्या. या शाळांची मैदानेही गेली. त्यामुळे ८० टक्के शाळा या मैदानाशिवाय आहेत. त्यामुळे किती खेळ लोप पावत गेले हे सांगता येत नाही. अगदी मुलांचे आणि मुलींचेही. काही मुलींचे खेळही मुले आवडीने खेळत. वाड्यात हे खेळ चालायचे. अनेक मैदानी खेळ कार्पोरेट झाले, तर अनेक लुप्त पावले. मातीतली कुस्ती गादीवर गेली आणि कार्पोरेट झाली, तर कबड्डी मॅटवर आली प्रो झाली, पण कसल्याही साहित्याविना असलेल्या खेळांचे काय?

खर्चिक नसलेले अनेक खेळ हे लुप्त झाले. आजकाल कोणी बिट्ट्या, गजगे किंवा सागरगोटे खेळताना दिसत नाहीत. खरे तर बरेच काही शिकवणारा हा खेळ, पख्खई, दुख्खई, तिख्खई एकेक टप्पा पार करत हंडी गाठायची. वरून येणारा खडा एका हाताने झेलायचा. त्यापूर्वी जमिनीवरच्यांना उचलायचे. सावरण्याचा, आवरण्याचा, तोलण्याचा हा खेळ. केव्हा काय झेलायचे, केव्हा काय उचलायचे हे सहजपणे जीवनाचे रहस्य शिकवणारा खेळ कालबाह्य झाला. सगळे काही मोबाइलमध्ये आले. कोरा कागद, निळी शाई, आम्ही कुणाला भीत नाही, तुला दगड का माती? असे म्हणत हातावर टपल्या देत राज्य सुरू व्हायचे आणि दगड का माती या खेळाला सुरुवात व्हायची. हा खेळही कुठे खेळला जात नाही. माती फक्त धुरळा उडवण्यापुरती दिसते. चिखल फक्त चिखलफेकी पुरता दिसतो. बाकी घरातून बाहेर पडले की फरशा, टाइल्स, काँक्रीट, डांबरी रस्ते, नाहीतर पेव्हर ब्लॉक दिसतात. माती दिसणार कुठे? दगड झाले रस्त्यात खडी होऊन लुप्त. खेळणार कसा हा खेळ? नुसता कागद कोराच राहिला की. तसाच विष-अमृत, जोडी साखळी, अखंड साखळी हा खेळही कुणाला माहिती नाही. आता अखंड साखळी नाही तर मोबाइलमधला स्नेक नावाचा गेम खेळून लांबलचक साप तयार करण्याचा खेळ खेळला जातो. विष आणि अमृत या दोन गटात विषाचा गट जिंकणार की अमृताचा विजय होणार? पण आज सगळीकडेच विषारी वातावरण झाल्यामुळे हा खेळही मरून गेला आहे. काठ्या पाणी हा संपूर्ण गावातून फिरवला जाणारा खेळ आजकाल पाहायला मिळत नाही. वडाच्या पारंब्याच काय वडच नसल्यामुळे सूर पारंब्या हा खेळ फक्त ऐकण्यापुरता झाला आहे, पण हे सगळे खेळ व्यायाम, आनंद आणि कसलाच खर्च असणारे नव्हते.


घरात प्रत्येकाच्या काठी ही असायचीच. त्यामुळे ओळीने सर्वांनी काठ्या फेकायच्या. ज्याची सगळ्यात कमी अंतरावर असते त्याच्यावर राज्य. बाकीच्यांनी दगडावर काठी टेकवायची आणि ज्याच्यावर राज्य आहे त्याची काठी उडवत न्यायची. दगडावर काठी नसताना शिवले की तो आऊट. काठी संपूर्ण गावभर फिरायची. ढकलत, उडवत नेत नुसता पाठलाग केला जायचा. हरल्यावर पायात काठी धरून लंगडत जिथून खेळ सुरू झाला तिथपर्यंत यायचे. त्यावेळी बाकीच्यांनी डाळ गूळ खाती घोडी... म्हणत ओरडायचे. तो खेळणारा रडलाच पाहिजे अगदी, पण हाच तर खरा संघर्ष होता. काठ्या उडवणारे हे समाजाचे प्रतीक होते. आपल्याला जगण्यासाठी जो संघर्ष करायचा आहे त्यात पाठशिवणी आली, काठीप्रमाणे हेळसांड आली, अवहेलना आली. हा संघर्ष करत आपले ध्येय गाठायचे. ते म्हणजे जिथून खेळ सुरू झाला ती जागा. दुसºयाला आऊट करून त्याच्यावर राज्य द्यायचे. आपणही कधी शोषक व्हायचे, शोषणकर्ते व्हायचे. हा सगळा नियतीचा खेळच आपण करायचा. हे शिक्षण हे सगळे खेळ देत होते, पण आज हे सारे खेळ लुप्त झाले आहेत.

खाली मान घालून तासन्तास मोबाइलमध्ये गुंतून राहायचे. ल्युडोसारखा खेळही मोबाइलमध्ये खेळला जातो. फासे आपल्या हातात नाहीत, तर ते कॉम्प्युटरच्या हातात असणार. कसे खेळणार, कसे डोके चालणार आपले? उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे मंदिरात, कधी लग्नात घातलेल्या मांडवात असलेले खांब त्याचाही छान खांबखांबोळीचा खेळ असायचा, पण आजकाल लग्नही हॉलमध्ये होतात. त्यामुळे खेळायला आणि पकडायलाही खांब नाहीत. हा खेळही कोणी खेळत नाही, पण चपळता आणि लवचिकता, एकमेकांचे खांब बदलणे आणि त्या मधल्या वेळात ज्याच्यावर राज्य आहे त्याने तो पकडण्याचा प्रयत्न करणे यात खूप मजा यायची. तसाच आणखी एक खेळ म्हणजे जो पूर्वी शाळेतही खेळला जायचा. तो म्हणजे कांदा फोड किंवा वांगंटांगं. एकाने पाय पसरून बसायचे, मग त्याने आधी पाय, मग पायावर दुसरा पाय. मग त्यावर एक वीत हात, मग दुसरा हात अशी उंची वाढवत न्यायची. सगळ्यांनी त्याला स्पर्श न करता त्यावरून उडी मारायची. त्याने हळूहळू उंच उंच होत उंची वाढत न्यायची. उंच उडीचाच हा एक प्रकार होता. या खेळांमुळे मुलांना कसल्याही व्यायामशाळेत किंवा जीममध्ये न जाता उंची वाढवता यायची. हे सगळे लुप्त झाले आहे.


उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळले जाणारे खेळांपैकी एक अत्यावश्यक खेळ म्हणजे पत्ते. ग्रामीण भागात पत्ते हा खेळ खूप लोकप्रिय आहे, पण त्यातील आजकाल फक्त रमी हा खेळ सर्वत्र खेळला जातो. तो अगदी मोबाइल गेम, फेसबुकवरही खेळला जातो, पण कित्येक आनंद देणारे पत्त्यातील खेळ आजकाल कोणी खेळतानाही दिसत नाही. म्हणजे लहानपणी अगदी पत्ते ओळखायलाही येत नसताना भिकार सावकार सुरू व्हायचा. मग पाच-तीन-दोन, सात-आठ, लॅडीज, बदाम सात, नॉटअ‍ॅट होम, झब्बू, चॅलेंज हे खेळ म्हणजे धमाल असायची. जितके खेळाडू असतील त्यावर खेळ अवलंबून असायचा. एकटाच असेल, तर स्मरणशक्ती, डाव लावणे सुरू असायचे. दोघेच असतील तर सात-आठ, भिकार सावकार, तिघे असतील तर पाच-तीन-दोन, चौघे, सहा जण असतील लॅडीज, जास्त जण असतील तर चॅलेंज, झब्बू, गड्डे झब्बू, बेरीज झब्बू, बदाम सात, तर कधी दोन तीन कॅट एक करूनही खेळायचे. कधी पत्त्यांचा बंगला उभा करायचा. एकाग्रतेसाठी पत्त्यांचा बंगला तयार करणे हे फार महत्त्वाचे असायचे. आता नाहीत मुले असे बंगले बनवताना दिसत. घरात चोवीस तास पंखा आणि एसी सुरू ठेवायचा तर पत्त्याचा बंगला उभा करता येणारच नाही. नैसर्गिक येणारी वाºयाची झुळूक जेव्हा हा बंगला पाडायची तेव्हा येणारी मजाही वेगळी असायची. चिंचोके, सिगारेटची पाकिटे, बांगड्यांचे तुकडे यातूनही खूप प्रकारचे खेळ व्हायचे. हे सगळे आज कालबाह्य झाले आहेत. कारण आमचे मन आता फक्त एका मोबाइलमध्ये रमते. त्या मोबाइलमध्येच आमचे सारे विश्व बंदिस्त करून ठेवले आहे.

प्रफुल्ल फडके/अन्वय


९१५२४४८०५५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: