ईव्हीएमवर संशय व्यक्त करत आमदार उत्तम जानकर २३ जानेवारीला राजीनामा देणार असल्याची धमकी देत आहेत. त्यांनी राजीनामा द्यायचा तर खुश्शाल देऊ देत, पण मतदारांनी अशा स्टंटबाजांना पुन्हा थारा देता कामा नये. निवडणूक आयोगाने, जगातील सर्व तंत्रज्ञांनी ईव्हीएम हॅक करता येत नाही हे ठामपणे सांगितले असतानाही जानकर यांनी चालवलेला पोरकटपणा हा हास्यास्पद नाही तर त्यांची कीव करावी असाच आहे.
निवडणूक आयोगाने ओपन चॅलेंज देऊन ईव्हीएम मशिन हॅक करुन दाखवा असे आवाहन करुनही ते आजपर्यत कोणी स्विकारलेले नाही. त्यामुळे ईव्हीएमचे हॅक करुन दाखवण्याचे आव्हान अगोदर उत्तम जानकरांनी स्विकारावे. ते हॅक करुन दाखवावे आणि मग बोलावे. उगाच प्रसिद्धीसाठी वैफल्यातून काहीही बरळण्यात अर्थ नसतो.
मुळात महायुतीचा विजय हा मतदारांनी त्यांना दिलेला एकमुखी निर्णय आहे. महाविकास आघाडीला का जवळ करायला हवे होते, याचे काय कारण सांगणार आहात? इतके करुन जर माळशिरसच्या या आमदारांना आमदारकीचा राजीनामा द्यायचा असेल तर त्यांच्याकडून निवडणुकीचा सरकारने केलेला सगळा खर्च वसूल केला पाहिजे. मुळात २३ जानेवारीला विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवण्याचे धाडस त्यांच्यात आहे का हे पहावेच लागेल. पण काहीतरी नौटंकी करुन चर्चेत राहण्याचे बहाणे आता मतदारांना नको झालेले आहेत. महाविकास आघाडीला हद्दपार करण्यासाठीच मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
महाविकास आघाडीने त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात कोणते चांगले काम केले होते? कोणता जनहिताचा निर्णय घेतला होता? फक्त चांगल्या योजना बंद करुन टाकण्याचे काम केले होते. महायुतीचे इच्छुक मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे तर जाहीर सभांमधून सांगत होते की आम्ही सत्तेवर आलो तर एमएमआरडीए बंद करु, वाढवण बंदराला विरोध करुणार, सगळे प्रकल्प हद्दपार करणार, धारावीचा पुनर्विकास होऊ देणार नाही. अशा वक्तव्यांनी मतदार कधी जोडला जाईल का? जे रोजगार, सोयीसुविधा, जनहिताचे निर्णय बंद करणार त्यांना मतदार कसा जवळ करेल? त्यामुळे जानकरांनी लक्षात घेतले पाहिजे की ईव्हीएम नाही तुमचे मेंदू नको त्या विचारांनी हॅक झाले आहेत.
काँग्रेस, शप राष्ट्रवादी आणि उबाठा यांच्यात एकमत नव्हते. प्रत्येकाला आपला मुख्यमंत्री हवा होता. त्यात शरद पवारांनी ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे जाहीर करुन टाकले होते. त्यामुळे तिघेही पक्षनेते एकमेकांचे उमेदवार पाडण्यात गर्क झाले होते. सगळीकडे लोकसभेचा सांगली पॅटर्न राबवून महाविकास आघाडीतील नेत्यांनीच एकमेकांना पाडण्याचे काम केले होते हे जगजाहीर आहे. असे असताना आता नाचता येईना अंगण वाकडे याप्रमाणे उत्तम जानकर ईव्हीएमवर खापर फोडत असतील तर त्याला कोणीही भाव देणार नाही. नशिबाने तुम्ही निवडून आला आहात, खरोखरज अध्यक्षांनी राजीनामा मंजूर केला आणि पुन्हा निवडणूक लागली तर जनता यावेळी त्यांना पोटनिवडणुकीत पराभूत केल्याशिवाय गप्प बसणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. मग तेलही गेले, तुपही गेले आणि हाती आले धुपाटणे म्हणायलाही वाव राहणार नाही. त्यामुळे ही नौटंकी त्यांना तारु शकणार नाही. जानकर आणि त्यांच्या मूठभर समर्थकांनी कितीही आदळआपट केली तरी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जाणार नाहीत. देशाला पुन्हा शंभर वर्ष मागे न्यायचे असेल तर जानकरांनी अगोदर मोबाईल, गाड्या, सर्व यंत्रणा बंद कराव्यात. पोस्टकार्ड वापरावा, सायकल वापरावी, एसटीने प्रवास करावा, टीव्हीवर येणे बंद करावे आणि रेडिओवर जाऊन मागच्या काळात जावे आणि मग ही मागणी करावी. त्यांच्याकडे असणाºया सगळ्या सुखसोयी, सुविधा, यंत्रणांचा त्याग करावा. अगदी पॅट शर्टऐवजी धोतर टोपीत यावे आणि मग अशी मागणी करावी. नाकारायची तर सगळीच यंत्रणा नाकारा तर त्याला अर्थ राहील. त्यामुळे अशा स्टंटबाजीला आता कोणीही थारा देणार नाही.
आपण कुठल्या जमान्यात आहोत याचा अगोदर उत्तमराव जानकर यांनी विचार करावा. त्यांच्या पक्षाचे अजूनही काही आमदार निवडून आलेले आहेत. ते राजीनामा देण्याचे नाव काढत नाहीत. त्यांना माहिती आहे जर दिला तर पुन्हा निवडून येणार नाही. शाहीस्तेखानाची जशी बोट गेली आणि जान वाचली तशी अवस्था महाविकास आघाडीतील थोड्या फार आमदारांची झालेली आहे. त्यामुळे अशी नौटंकी करायला जातील तर जनता हद्दपार करेल. त्यामुळे असले पोरकट कारनामे त्यांनी थांबवून विधायक असे काहीतरी काम करावे. राजीनामा द्यायचाच असेल तर लोकसभा निवडणुकीत जेवढे महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले आहेत त्या सर्वानी द्यावा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे. त्यावेळी संविधान बदलणार या फेक नॅरेटीव्हमुळे मिळालेले यश पुन्हा पोटनिवडणूक लागली तर महाविकास आघाडीला मिळते का हे पाहता येईल. सवंग लोकप्रियतेसाठी काहीतरी करण्यात अर्थ नाही. नशिबाने आपण निवडून आलो आहोत यात समाधान मानण्यातच त्यांचे शहाणपण आहे. त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न, समस्या मांडण्यासाठी त्यांना जनतेने निवडून दिले आहे. त्याकडे लक्ष देण्याचे काम त्यांनी केले तर योग्य ठरेल. या असल्या स्टंटबाजीला काहीही अर्थ नाही. जंतरमंतरवर जाऊन काही चमत्कार घडेल असे समजण्याचे कारण नाही. जंतरमंतरवर आंदोलने करणारे अनेकजण आता विस्मरणात गेले आहेत. त्यामुळे जानकरांनी जनतेने विसरु नये असे वाटत असेल तर ही नौटंकी थांबवावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा