शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

इंडिया आघाडीत काँग्रेस विरोधकांची एकजूट

दिल्ली विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढत आहेत. यामागचा सर्वसाधारण तर्क असा आहे की, त्यांची आघाडी ही लोकसभा निवडणुकीसाठी होती. इंडिया आघाडीतील कोणत्याही पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिलेला नाही. सपाप्रमुख अखिलेश यादव यांनी आप आणि तृणमूल काँग्रेससाठी सभा घेण्याची घोषणा केली असून, शिवसेना (ठाकरे गट) यांनी केजरीवालांना पाठिंबा जाहीर केला आहे. तेजस्वी यादव यांनीही ही आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दिल्लीत इंडिया आघाडीत काँग्रेस विरोधकांची एकजूट झाल्याचे दिसत आहे.


मात्र, बिहारच्या संदर्भात त्यांनी काँग्रेससोबत असल्याचे संकेत दिले. या काळात महाराष्ट्रात आश्चर्यकारक बदल पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उघडपणे कौतुक केले आहे. खरे तर याची कल्पनाही कोणी केली नव्हती. अलीकडेच शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि तेही अशा वेळी जेव्हा भाजप वक्फ दुरुस्ती विधेयकापासून समान नागरी संहितेपर्यंत सर्व गोष्टींवर वचनबद्धता दाखवत आहे. त्याचवेळी संघाच्या प्रचाराची आणि यंत्रणेची त्यांनी दखल घेत आपला गाफीलपणा कबूल केला आणि ईव्हीएमला क्लीन चिट दिली.

नुकतेच पवारांनीही संघाच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतल्याचा भाजपला फायदा झाल्याचे सांगितले आहे. या सगळ्याचा एक अर्थ असा आहे की, इंडिया आघाडीतील घटक काँग्रेसच्या विरोधात वळत आहेत. नुकतेच ममता बॅनर्जी यांचे नाव इंडिया आघाडीतील नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावरून पुढे आले आणि त्यांनीही मी तयार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीतील काँग्रेसविरोधी प्रादेशिक पक्षांच्या ऐक्याचा आवाज दिल्ली विधानसभा निवडणुकीत बळकट होताना दिसत आहे.


भविष्यातील राजकारणावर याचा खोल परिणाम होणार आहे. अरविंद केजरीवाल हेही हिंदुत्वाचे राजकारण पुढे नेत आहेत, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांनी मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वाराच्या पुजाºयांना पगार देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपला हिंदुत्वावर थेट आव्हान देणाºया पक्षाची प्रतिमा आपला निर्माण करायची आहे, असे दिसते.

संबंधित बाब म्हणजे इमामांना १८ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. इमामांची एक संघटना सतत आंदोलन करत आहे, पण केजरीवाल ना त्यांना भेटत आहेत ना काही बोलत आहेत. आम्ही इमामांचे पगार जाहीर केले, पण ते देत नाही आणि आता पुजारी आणि पुरोहितांना पगार देऊ, असा संदेश हिंदुत्व समर्थकांना देण्यासाठी ही रणनीती आहे. याआधी त्यांनी हिंदू भाविकांसाठी तीर्थयात्रेची योजना सुरू केली. केजरीवाल हे इंडिया आघाडीतील एकमेव नेते आहेत जे आपल्या कुटुंबासह अयोध्येला गेले आणि श्री राम लल्लाचे दर्शन घेतले. हे धोरण इंडिया आघाडीतील उर्वरित पक्षांच्या आतापर्यंतच्या राजकीय वर्तनाच्या विरुद्ध आहे. केजरीवाल यांनी वंदे मातरम् आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. इंडिया आघाडीतील नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तीव्र निषेध केला. याउलट केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून आदरपूर्वक विचारले की, भाजप ज्या प्रकारे मतदारांची नावे हटवत आहे, ते तुम्हाला मान्य आहे का?


तत्पूर्वी, संघाची गरज नाही या भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या विधानाचा हवाला देत त्यांनी विचारले होते की, यामुळे तुमचे नुकसान झाले नाही का? लक्षात ठेवा केजरीवाल यांनी अद्याप कोणत्याही कल्पनेशी बांधिलकी दाखवलेली नाही. ते आपल्या राजकारणासाठी आपली भूमिका बदलण्यात माहीर आहेत.

इंडिया आघाडीतील घटकांचे अलीकडील वर्तन हे एका मोठ्या बदलाचे सूचक आहे. याबद्दल काही शंका असल्यास, थोडे मागे जा. २०२१च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी स्टेजवर चंडीचे पठण करून स्वत:ला एकनिष्ठ हिंदू असल्याचे सिद्ध करत होत्या. एकेकाळी काँग्रेसचे रणनीतीकारही राहुल गांधींची प्रतिमा निष्ठावंत हिंदू म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. काँग्रेसचे मीडिया प्रमुख असलेले रणदीप सिंग सुरजेवाला यांनी तर आपण पवित्र धागा धारण करणारा ब्राह्मण असल्याचे म्हटले होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची रणनीती बदलली आणि भाजपविरोधी आणि विशेषत: मुस्लीम मतांना एकत्र आणण्यासाठी अतिरेकी प्रयत्न सुरू झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कळघम या स्वत:ला नास्तिक समजणाºया पक्षाने हिंदूंना तीर्थयात्रा आणि मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी पैसे देण्याची घोषणा केली होती.


किंबहुना, हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांचा असा समज आहे की, मतदानामागे हिंदुत्व हा एक मोठा घटक असेल. अंतर्गत किंवा इतर विविध कारणांमुळे भाजप निवडणूक हरू शकतो किंवा त्याच्या जागा कमी होऊ शकतात, पण हिंदुत्वाबद्दलच्या भावना आणि गेल्या काही वर्षांत प्रबळ झालेली त्याची ओळख दूर होणार नाही. धर्मांध मुस्लीम नेत्यांच्या वक्तव्यावर गप्प बसून केवळ भाजप आणि आरएसएसला शिव्याशाप देण्याच्या विरोधात सर्वसामान्य मतदारांमध्ये विपरित प्रतिक्रिया उमटत आहेत, हेही ते समजून घेत आहेत. केजरीवाल यांना हे बरोबर समजलेले दिसते. इंडिया आघाडीतील इतर घटकांनाही असे वाटते की काँग्रेस ज्या प्रकारे मुस्लीम समर्थक पक्ष असल्याचे सिद्ध करत आहे, त्यामुळे पुढे आणखी नुकसान होईल. बहुतेक पक्ष हिंदुत्वाला फारसे टाळत नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. ते केवळ भाजपविरोधात राजकारण करण्यासाठी धर्मनिरपेक्षता किंवा अल्पसंख्याकवादाचे धोरण स्वीकारत आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना (ठाकरे गट) यांसारख्या पक्षांना यात काहीच अडचण नाही. द्रमुकही वाजपेयी सरकारमध्ये भागीदार होते. त्यामुळे काँग्रेस विरोधकांची एकजूट आता दिसत आहे. त्यामुळे इंडिया आघाडी संपलेली आहे किंवा काँग्रेसला बाहेर काढले आहे हे फक्त जाहीर करणे बाकी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: