पूर्वी टीव्ही म्हणजे फक्त दूरदर्शनच होते. १९९०च्या दशकाच्या प्रारंभानंतर बाहेरच्या वाहिन्या आल्या. केबल आली, पण तोपर्यंत टीव्ही म्हणजे फक्त दूरदर्शनच होते. तो पाहण्याची इतकी मजा असायची की, आता ते आठवले तरी हास्यास्पद वाटते, म्हणजे सुरुवातीला टीव्ही हा फक्त मुंबई आणि पुण्यातच होता. नंतर तो हळूहळू प्रक्षेपण केंद्र, टॉवर वाढवले आणि सगळीकडे दिसायला लागला, पण १९७२ ते १९८६ पर्यंत तो मुंबई, पुण्यापुरताच होता.
त्या काळात टीव्ही पाहणे म्हणजे कसरतच असायची. आमच्याकडे टीव्ही आहे हे सांगणे प्रतिष्ठेचे असायचे. मग सातारा, सांगली, कोल्हापूर किंवा पश्चिम महाराष्ट्रात तर त्याची फार मजा असायची. ३० फूट, चाळीस फूट उंचीचे पाइपला पाइप जोडून त्याला तेरा काड्यांचा अँटिना जोडायचा आणि त्याचे सिग्नल मिळवायचा प्रयत्न केला जायचा, म्हणजे टीव्ही हे त्या काळात एक अवाढव्य धूड????? असायचे. त्या अँटिनाला कोणीवर एक बूस्टर, खाली एक बूस्टर लावायचे आणि मुंग्यामुंग्यांमध्ये कार्यक्रम पाहायचे. कधी तरी कलाकारांचे चेहरे दिसायचे. बाकी मुंग्या किंवा पाऊसच. मग तो फक्त ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास कमी-जास्त करून थोडे काळे करा, थोडे पांढरे करा असे प्रकार चालायचे.
अशाही परिस्थितीत त्या काळात साताºयात तीन ते चार टीव्ही होते. शनिवारी मराठी आणि रविवारी संध्याकाळी हिंदी सिनेमा असायचा. ज्यांच्याकडे टीव्ही आहे, त्यांच्याकडे खूप गर्दी व्हायची. मग ते चार आणे तिकीट घेऊन सिनेमा दाखवायचे. तरीही लोक गर्दी करायला जायचे. टीव्हीवर फारशा जाहिरातीही नसायच्या. बादशाह मसाला, टोपाझ, बाबुभाई जगजीवनदास अशा काही जाहिराती असायच्या. विशेष म्हणजे जाहिराती सगळ्या स्वच्छ क्लिअर दिसायच्या आणि सिनेमा मात्र मुंग्यामुंग्या. आजही कार्यक्रमांच्या मध्ये जाहिरात आली की, त्याचा आवाज वाढतो आणि कार्यक्रमात कमी असतो.
साधारण १९८१च्या सुमारास भारतात नवम एशियाई स्पर्धा भरवल्या गेल्या आणि रंगीत टीव्ही आले, पण तेही जिथे टीव्ही दिसत होता, त्याच शहरात. मग जिथे मुंग्यांचे दूरदर्शन असायचे, त्या लांबच्या शहरात रंगीत काचा आल्या. टीव्हीच्या मूळ काचेवर काळी, निळी अशी काच असायची, त्याऐवजी तीन रंगी काच लावून कार्यक्रम बघायचा. किती गमतीशीर दिसायचे ते. रंगीत टीव्ही म्हणून तिरंगी काच लावायची. तोंड तांबडे, मधले अंग निळे आणि खालचा भाग पिवळा, असे काही तरी विचित्र रंग दिसायचे, पण रंगीत टीव्हीची हौस भागवली जायची.
टीव्हीचे प्रक्षेपणही चोवीस तास नव्हतेच. संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सुरू व्हायचे आणि रात्री ११ वाजून २० मिनिटांपर्यंत. त्यात साडेआठपर्यंत प्रादेशिक आणि नंतर नॅशनल प्रोग्राम फॉलोज म्हणून दिल्लीचे कार्यक्रम सुरू व्हायचे. मराठी बातम्यांमध्ये प्रदीप भिडे, अनंत भावे, भक्ती बर्वे, स्मिता पाटील, स्मिता तळवलकर, चारुशिला पटवर्धन, शोभा तुंगारे, वासंती वर्तक, बुद्धभूषण गायकवाड हे चेहरे दिसायचे, तर हिंदी बातम्यांमध्ये सलमा सुलतानचा कोरा चेहरा, उलट्या बाजूला घातलेले फूल बघतानाही मजा यायची. मग कधी कोमल जी. बी. सिंग, आकाश, वेदप्रकाश दिसायचे. रविवारी साप्ताहिकी असायची. ती सकाळी बघायलाही मजा यायची. तबस्सूमचे फूल खिले हैं गुलशन गुलशन, अशोक शेवडेंचे मुखवटे आणि चेहरे, गजरा, संताकुकडी हे कार्यक्रमही पाहिले जायचे.
रविवारी सायंकाळी असणारे कीर्तन हा सगळा ढाचा आकाशवाणीचा होता. १९८६ला सगळीकडे टॉवर उभे केले आणि दूरदर्शन घराघरांत पोहोचले. मग तेरा काड्यांचा अँटिना गेला आणि तो पाच काड्यांवर आणि जेमतेम पाच फुटांपर्यंत आला. बूस्टर कमी झाला, स्टॅबिलायझर गेले आणि टीव्ही आटोपशीर झाला. पोर्टेबल आले. टीव्ही खºया अर्थाने रंगीत झाले, पण त्यामध्ये दूरदर्शनचे अधूनमधून व्यत्यय, सॉरी फॉर इन्ट्रप्शनचे येणारे फलकही असायचे. तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपण थांबून राहायचे आणि जत्रेत जसा सिनेमा पाहताना एकाच प्रोजेक्टरवर रीळ बदलताना ज्यादा मध्यंतर असतात, तसाच तो प्रकार होता. यानंतर दूरदर्शनने चांगली प्रगती केली आणि कार्यक्रमात वाढ केली.
संध्याकाळी मालिका सुरू झाल्या. साप्ताहिक मालिकांनी लोकांना वेड लावले. हम लोग, बुनियाद, नुक्कड यांनी प्रेक्षक तयार केला. रामायण, महाभारतने टीव्हीचा खप वाढवला आणि घराघरांत टीव्ही पोहोचला. इडियट बॉक्स असे वर्णन केला जाणारा टीव्ही जगण्याचा, जीवनाचा अपरिहार्य भाग झाला. अत्यावश्यक सेवांमध्ये झाला. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात झोपडपट्टीतही टीव्ही दिसू लागला तसे सगळ्या जगाचे लक्ष या देशाकडे गेले. उपग्रह वाहिन्यांचे जाळे पसरू लागले. कोट्यवधी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणून टीव्हीकडे विविध वाहिन्या पाहू लागल्या. त्यांची चढाओढ सुरू झाली. त्यात दूरदर्शनकडे दुर्लक्ष होऊ लागले, पण खºया अर्थाने टीव्हीची सवय लावली, टीव्ही संस्कृती निर्माण केली ती दूरदर्शनने. ते दूरदर्शनचे दिवस कधीच विसरले जाणार नाहीत.
आजच्या वाहिन्यांवरचे अचकट-विचकट आणि अतार्किक मालिकांचे कार्यक्रम पाहिले, तर दूरदर्शन किती सोज्वळ आणि सुसंस्कृत होते, हे लक्षात येईल. तरीही दर्जेदार कार्यक्रमात ते कधीच कमी पडले नाही. ना बातम्या अतिरंजित असायच्या ना कार्यक्रम. आज अनेकांना दूरदर्शन वाहिन्यांमुळे आऊट आॅफ डेट वाटत असला, तरी संपूर्ण देशात कानाकोपºयात तो पोहोचला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. वाहिन्यांना टक्कर देण्यासाठी दूरदर्शनवरही सह्याद्री असेल किंवा राष्ट्रीय दर्जेदार कार्यक्रम होताना दिसतात. संसदेतून थेट प्रक्षेपण करण्याचे काम फक्त दूरदर्शनच करते. कारण ती राष्ट्रीय वाहिनी आहे. त्यामुळेच तिला असणारे स्वातंत्र्य आणि नियंत्रण याच्या मर्यादांचे पालन केले जाते, पण कितीही वाहिन्या आल्या, गेल्या, स्थिरावल्या तरी दूरदर्शन कधीच विस्मरणात जाणार नाही, हे नक्की.
प्रफुल्ल फडके/अन्वय
९१५२४४८०५५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा