मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

मुखवट्यामागचा अंधार

   अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच गुरुवारी आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या केली. अभिनेता समीर शर्मा यानं त्याच्या मुंबईतील मालाड परिसरात असणार्या राहत्या घरामध्या आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येवरून राजकारण आणि चर्चा होत असल्या तरी प्रत्यक्षात हे पडद्यावरचे, छोट्या पडद्यावरचे आणि त्यामागचे जग फार वेगळे आहे. हे मुखवट्यामागचे जगच आज आत्महत्येचा मार्ग दाखवत आहे. कोणालाही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यापूर्वी जी स्पर्धा आणि टिकून राहण्याची जीवघेणी स्पर्धा चालली आहे ती भयानक आहे.

    गुरूवारी आत्महत्या केलेल्या समीर शर्माने अनेक हिंदी लोकप्रिय मालिकांमधून काम केले होते. टिव्ही मालिकांमधून काम केले की अभिनेता घराघरात सहजपणे पोहोचतो. पण तो तितकाच स्वस्तही होतो आणि चिरंतन रहात नाही. कहानी घर घर की, सांस भी कभी बहु थी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांतून समीर झळकला होता. पण या मालिका कधीकाळी बंद होतात आणि कलाकार विस्मरणात जातात. हेच कलाकारांना वैफल्य येण्याचे कारण असते. समीर शर्माने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असून, त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. समीरची आत्महत्या आता कलाविश्वाला आणखी एक हादरा देऊन गेली आहे. त्याच्या घरातून अद्यापही कोणत्याही प्रकारचा पुरावा किंवा चिठ्ठी सापडलेली नाही. समीर मुंबईतील मालाड येथील घरी एकटाच राहात होता. पत्नीचा त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही, त्यावेळी काहीतरी चुकीचं घडलं असल्याची शंका तिला आली. शिवाय समीर काही दिवस कोणालाच दिसलाही नाही. त्याचवेळी चौकीदाराला मृतदेहाचा वास येण्यास सुरु होताच त्यानं पोलिसांना माहिती दिली. ज्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत घराचं दार उघडलं असता समीरचा मृतदेहच पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. हे सगळे सामान्य माणसाच्या आत्महत्येसारखेच झाले. फक्त तो पडद्यावर दिसत होता म्हणून लोक हळहळले, एरवी परदु:ख शीतलम अशीच अवस्था असते.
   कलाकार आत्महत्येला प्रवृत्त का होत आहेत? तर प्रत्येकाला पोटाची चिंता आहे. या फसव्या जगात स्वत:चा मुखवटा सांभाळायचे टेन्शन आहे. त्यामुळेच आपण गरीब नाही, आपण पैसेवाले नाही, आपण मालदार आहोत, आपल्याला भरपूर कामे आहोत असे दाखवण्याची कलाकारांमध्ये चढाओढ असते. कारण पैशापाशी पैसा जातो. धावणार्‍या आणि जिंकणार्‍या घोड्यावर पैसे लावले जातात. पार्टी कल्चर, संपर्कात राहून निर्माता, दिग्दर्शक, प्रॉडक्शन हाउस यांना खूष करण्यासाठी जो काही खर्च करावा लागतो त्यात काही हातातच रहात नाही. ही कलाकारांची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दिवसा काम करणार्‍या बहुसंख्य कलाकारांची रात्र ही दारूच्या प्याल्यात निद्रीस्त होत असते. नकली राहणीमान आणि जीवनशैली जपताना करावी लागणारी कसरत ही भयानक आणि जीवघेणी आहे.
    हे सगळं सांभाळतान वैफल्य येणे स्वाभाविक आहे. त्यात दररोज येणार्‍या नवनव्या मालिकांचे प्रस्ताव, मर्यादीत असलेली चॅनेल. पहिली मालिका संपल्याशिवाय दुसर्‍या मालिकेला प्राईम टाईम मिळत नाही. ही वेळ मिळवण्यासाठी केल्या जाणार्‍या देवाणघेवाणी, त्याचे लिलाव. यात चॅनेलची मॅनेजमेंट, निर्माते, जाहीरातदार, प्रायोजक यांची असणारी अवास्तव मागणी. मालिकांचे प्रमोशन ही अवांतर कामे आणि जबाबदार्‍या कलाकारांवर येउन पडतात. त्यातच प्रस्थापित मालिकेने चॅनेलचा टीआरपी वाढत असेल तर तीला वाढीव एपिसोड मिळतात. मग नवीन तयार होत असलेली मालिका लांबणीवर पडते. यामध्ये कलाकारांना वेळेवर मानधन मिळणे अवघड होते. किंबहुना त्यांना पसंती मिळेपर्यंत राहणे अवघड होउन बसते. अशी असंख्य टेन्शन, ताणतणाव कलाकारांना असतात. त्याचा कुठेतरी स्फोट होतो आणि जगाला तोंड दाखवायचीही लाज वाटते आणि आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जातो.
   पूर्वी निर्मात्यांना चित्रपट तयार झाल्यावर, सेन्सॉर सर्टीफिकेट मिळाल्यावर तो रिलीज करण्यासाठी थिएटर मिळायचे नाही. काही निर्माते वितरक ठराविक टॉकीज कायम बुक करून ठेवायचे. त्यामुळे अनेक चित्रपट रखडत आणि निर्मात अडचणीत येत असत. त्याचप्रमाणे नाटकाच्या थिएटरच्या तारखा बुक करण्याचा धंदा तेजीत असताना अनेकांना थिएटर न मिळाल्याने प्रयोग लावता येत नाहीत, असे प्रकार घडायचे. तोच प्रकार आता चॅनेलवर लवकर मालिकेला टाईम लॉट न मिळण्याबाबत घडताना दिसतो आहे. वाहिन्यांमधील स्पर्धा आणि एखादी मालिका चालतेय म्हटल्यावर त्यात काहीही वाटेल ते दाखवायचे प्रकार यामुळे प्रतिक्षेत असलेल्या मालिकांच्या कलाकारांची परवड होते. असेच काहीसे कलाकारांचे होते. हा काही हिंदी मालिकांचाच प्रश्न आहे असे नाही, तर मराठी मालिकांमध्येही तेच चालते. त्यामुळे कलाकारांचा पार अर्क काढायची प्रवृत्ती निर्माण होते. आता झी मराठीवर गेली साडेतिन वर्ष तुझ्यात जीव रंगला ही मालिका चालू आहे. पण आज त्या मालिकेत काय फालतुगिरी चालवली आहे, हे आपण पाहतो आहे. तो राणा पेहेलवान होता, अशिक्षित होता. तो जिंकला, शिकला, संसाराला लागला, पोलीस भरती झाला  इथपर्यंत ठिक होते. तिथेच तो संपायला हवा होता. पण त्या राणाचा पार किस काढला जात आहे. सध्या त्याचा फॅन्सी  ड्रेसचा कार्यक्रम दाखवला जातो आहे. वेगवेगळी रूपे घेउन तो सैरावेैरा पळतो आहे. काही अर्थ नाही त्यात. पण त्या कलाकाराला चिंच कोळून काढल्याप्रमाणे इतका वापरून घ्यायचा की नंतर त्याला दुसरी भूमिका करताच आली नाही पाहिजे. पौराणिक मालिकांमध्ये अडकलेले अभिनेते जसे दुसरीकडे शोभत नाहीत, त्यांना मर्यादीत केले जाते तसेच या मालिकांच्या कलाकारांचे होते. त्यामुळे ती मालिका संपल्यावर आपले कसे होणार अशा चिंताही अनेक कलाकारांना भेडसावतात. कारण आधीच्या मुखवट्यातून त्यांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे नंतर कामे मिळत नाहीत. मग कुठेतरी किरकोळ उद्घाटनसमारंभ, कार्यक्रमात सेलिब्रेटी म्हणून सुपार्‍या घेत जायचे. अमूक एक सिरीयल फेम असे लेबल लावायचे. त्याला फारसा प्रतिसादही मिळत नाही. कारण तोपर्यंत आणखी कोणीतरी नवा कलाकार टीव्हीवर झळकत असतो. इतके हे भयानक स्पर्धेचे जग आहे. त्यामुळे कलाकारांना काम न मिळणे, असलेले टिकवणे, पहिले संपले की दुसरे मिळणे, त्यासाठी संपर्क राहणे, हे सगळे जमवण्याचे कसब दाखवावे लागते. यातले काहीजरी कमी झाले तरी तुम्ही टाकाउ होता.
एकदा गंज चढू लागल्यावर भंगारात माल निघतो. तशीच अवस्था कलाकारांची होताना दिसते आहे. मग दुर्लक्षित अवस्थेत करीअर करायला गाव सोडून चंदेरी नगरीत आलेल्यांना परत तिकडे जाणे शक्य नसते. खाजगी किंवा अन्य कसलीही नोकरी करणे शक्य नसते. शेतावर काम करणे जमत नसते. मग आत्महत्या हाच पर्याय उरतो. मुलींच्या बाबतीत तसे होत नाही. त्या लग्न करून मोकळ्या होतात. पण पुरूष कलाकारांची लग्नही होत नाहीत आणि करीअरही संपुष्टात आलेले असते. त्यामुळे आत्महत्या हा एकच मार्ग त्यांच्यापुढे असतो. कारण असुरक्षितता सगळीकडे असेल तर आत्महत्येचा सुरक्षित मार्ग ते निवडतात, ही वस्तुस्थिती आहे. मुखवट्यामागचा हा अंधार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: