शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

नेते उपचारासाठी मुंबईत का येतात?

 कोरोनाने राज्यात नाही, तर जगभरात कहर केलेला आहे. तरीही आमची आरोग्ययंत्रणा सज्ज आहे असे सरकार सांगते. मग ते केंद्र सरकार असो वा राज्य सरकार. गावागावात कोरोना विरोधातील लढ्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे दावे सरकार करत आहे. प्रत्येक जिल्ह्यात, शहरात, गावात कोव्हीड 19 ची केंद्र, तपासण्या, उपचाराची सोय होत आहे. असे असतानाही राज्याच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यतचे नेते, आमदार, मंत्री हे उपचारासाठी मुंबईत का येतात?

    सातारचे पालकमंत्री आणि राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ते सर्वात प्रथम कृष्णा हॉस्पीटलला अ‍ॅडमीट झाले. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात हलवण्यात आले. सातार्‍यात जे साडेआठहजार रूग्ण आत्तापर्यंत सापडले त्यापैकी सुमारे दोन हजार रूग्ण या कृष्णा हॉस्पीटलमधून बरे होउन गेले आहेत. साडेपाच हजारांच्या आसपास रूग्ण बरेही झालेले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे दावे प्रशासन आणि शासन दोघेही करत असतानाच नेत्यांना उपचारासाठी मुंबईत का जावे लागते? अर्थात हे फक्त याच मंत्र्यांच्या बाबतीत आहे असे नाही.
  काही दिवसांपूर्वी राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद असलेले धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनाही उपचारासाठी मुंबईत दाखल केले गेले. त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनाही नांदेडवरून मुंबईत आणावे लागले होते. जितेंद्र आव्हाड हे ठाण्यातीलच असल्यामुळे त्यांना तिथेच उपचार मिळाले, पण बहुतेक मंत्रिगण त्यांच्या मतदारसंघात आजारी पडतात  आणि उपचारासाठी मुंबईत येतात. हे त्या नेत्यांचे अपयश नव्हे काय?
    आरोग्यसेवा ही प्राथमिक सेवा आहे. अत्यावश्यक सेवा आहे. प्रत्येक नागरिकाला ती सहजपणे मिळाली पाहिजे. त्यामुळे चांगली आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आपले आरोग्यखाते, आरोग्यमंत्री नेहमीच आम्ही सक्षम असल्याचे दाव करतात. पण ही सक्षमता फक्त मुंबईतच आहे का? राज्याच्या कानाकोपर्‍यात ती पोहोचलेली नाही का?
 अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये आजारी पडले होते. त्यांना कोरोनाची लागण नांदेडमध्ये झाली. तेव्हाची परिस्थिती, बंदोबस्त, लॉकडाउनची स्थिती पाहता त्यांना जवळपास बारा ते 14 तास मुंबईत येण्यासाठी लागले होते. अर्थात याचे तपशिलवार वर्णन वाहिन्यांनी केले होते. मंत्र्यांनाही जीथे सहज रस्ता खुला नव्हता आणि येण्यासाठी इतका वेळ लागला तिथे सामान्यांची अवस्था काय असेल? मंत्र्यांनाही त्यांच्या मतदारसंघात उपचाराची सोय नसेल तर सामान्य माणूस तडफडूनच मरेल यात शंकाच नाही. त्यामुळे आजवर या मंत्र्यांनी काय केले? अशोक चव्हाण हे अत्यंत धार्मिक, बाबा बुवा करणारे. सत्यसाईबाबांचे भक्त. मुख्यमंत्री असताना सत्यसाईबाबांची पूजा त्यांनी वर्षा बंगल्यावर केली होती. अशा या व्यक्तिमत्वाला आपले कर्तृत्व दाखवता आले नाही का? त्यांचे वडिल शंकरराव चव्हाण हे कडक शिस्तीचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री म्हणून ओळखले जात होते. मराठवाड्यातील मोठे प्रस्थ म्हणून ते ओळखले जात होते. त्यांनी मराठवाड्यासाठी, आपल्या मतदारसंघासाठी काहीच केले नाही का? आपल्या चार दशकांच्या कारकीर्दीत त्यांना आपल्या मतदारसंघात सुसज्ज, सुपरस्पेशालीटी, अद्यावत आरोग्यसेवा निर्माण करता आलेली नाही का? असे नेते या राज्याचे मुख्यमंत्री होते हे सांगताना महाराष्ट्राला कोणता अभिमान वाटेल? ते जर मुंबईतच असते आणि त्यांना तिथेच अ‍ॅडमीट केले असते तर मान्य केले असते. पण नांदेडवरून त्यांना मुंबईत आणावे लागले. यातच या नेत्यांच्या, मंत्र्यांच्या कर्तृत्वाचा फुगा फुटलेला दिसतो.
   विद्यमान सरकारमध्ये धनंजय मुंडे हे मंत्री आहेत. त्यापूर्वी विधानसभेचे आमदार, विरोधीपक्षनेतेपद अशी विविध पदे त्यांनी भूषवलेली आहेत. या पदावर असताना या लोकांनी आपल्या मतदारसंघासाठी काहीच केले नाही का? बीड मतदारसंघात चांगले सुसज्ज हॉस्पीटल, आरोग्ययंत्रणा का नसावी? आज नेते आहेत म्हणून ते मुंबईत येउ शकले. सामान्य माणूस असा मुंबईत येउ शकेल का? याचा अर्थ सामान्य माणसांना या नेत्यांनी वार्‍यावरच सोडले आहे का? जनतेला आरोग्यसेवा देण्यासाठी वर्षानुवर्षे आमदारकी, पदे असूनही, सत्तेचे घटक असूनही हे लोक काहीच करू शकलेले नाहीत का? कोरोनाच्या संकटानंतर प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि नेत्याला जनतेने हाच प्रश्न विचारला पाहिजे. तुमच्यावर वेळ येते, उपचार घेण्याची वेळ येते तेंव्हा मुंबईला पळून जाता. सामान्य जनतेचा जीव मात्र तिथल्या डॉक्टरांवर सोडून देता. हा सामान्य जनतेचा छळ म्हणायचा की तिथल्या स्थानिक डॉक्टरांवरचा अविश्वास? जनता कसे उपचार घेते आहे, जनतेसाठी काय सोयी सुविधा आहेत हे तरी यानिमित्ताने पाहता आले असते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात कोणताही मंत्री, आमदार, नेता आजारी पडला की त्याला लगेच मुंबईत आणले जाते. हा स्थानिक डॉक्टरांवरचा अविश्वास आहेच. त्याशिवाय जनतेला सुविधा देण्यास हे नेते कमी पडले आहेत याची कबूली आहे. आमच्या मतदारसंघात उपचाराची सोय नाही म्हणून आम्हाला मुंबईला यावे लागते, यात नेत्यांचा कसला आला आहे मोठेपणा? हा तर या नेत्यांचा कमकुवतपणा आहे.
कराडचा कृष्णा पॅटर्न हा फार मोठा आहे. यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, आनंदराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विलासराव पाटील उंडाळकर, पी. डी पाटील, जयवंतराव भोसले असे दिग्गज नेते, अतिरथी महारथी, विद्वान लोक, नेते, मंत्री या भागातून निवडून आले, राज्याचे प्रतिनिधीत्व केले. तेथील मंत्री बाळासाहेब पाटील यांना उपचारासाठी कराडमध्ये सुविधा का नसावी? हा या सर्व ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, मंत्री यांचा अपमानाच म्हणावा लागेल. यांनी आपल्या भागासाठी काहीच केले नाही, जनतेच्या आरोग्याची या नेत्यांना काळजीच नाही, असाच संदेश यातून जातो आहे. माझे जे काही होईल ते माझ्या मतदारसंघात होईल, तिथेच उपचार घेईन, जी सेवा जनतेला मिळते तीच मी घेईन असे सांगण्याचे धाडस एकाही नेत्याचे का होउ शकत नाही? म्हणजे मुंबईत उपचार करतात ते डॉक्टर आणि बाकीचे कपौंडर आहेत असे म्हणायचे आहे काय? पण आपल्याकडे चांगले कंपौंडरही आहेत, हे नुकतेच सिद्ध झालेले आहे. त्यामुळे नेते, मंत्री यांनी मुंबईत नसताना उपचारासाठी मुंबईत येणे टाळले तर जनतेचा विश्वास ते कमावतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: