बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

इतिहासाचे साक्षीदार

  थोडसं राजकारण बाजूला ठेवूया. थोडासा आनंद घेउ या की या देशात आता ऐतिहासिक असे राम मंदीर अयोध्येत उभे राहणार आहे. त्याची पायाभरणी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आली. एकूण साडेतिनशे वर्षांची आणि स्वातंत्र्यानंतरचा 70 वर्षांचा असा लढा जिंकून आपण आनंद साजरा करणार आहोत. तर थोडे राजकारण बाजूला ठेवून देशाभिमान बाळगायचाच हा क्षण होता. त्यामुळेच जो आनंद 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला असतो तसाच उत्साह बुधवारी दिवसभर संपूर्ण देशभरात दिसत आहे.
 अयोध्येत राम जन्मभूमि मंदिराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधानांसह विविध मान्यवरांचे बुधवारी आगमन झाले. गेल्या तीन दिवसांपासून अयोध्यानगरीत सुरू असणारे धार्मिक विधी, भजन-कीर्तन, संगीत कार्यक्रम आनंदोत्सवी वातावरण बनून गेले होते. तसेच देशभरही लोक राम आराधना करताना दिसत होते. हे एक वेगळे दृष्य होते. एक प्रकारची आत्मिक शक्ती प्रत्येकाच्या अंगात संचारल्यासारखे वातावरण दिसून आले. या एका फार मोठ्या इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत. आज हयात असलेला प्रत्येक भारतीय हा या महान इतिहासाचे साक्षीदार आहेत.
 युद्धपातळीवर कामाला लागलेल्या जिल्हा प्रशासनाच्या कार्यामुळे अयोध्येत एका इतिहासाच्या निर्मितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रामजन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन हा भारताच्या इतिहासासाठी खरोखरच ऐतिहासिक असा क्षण ठरला आहे. पुराण आणि इतिहास काळापासून प्रभू श्रीराम मंदिरासाठी सुरू असणारी लढाई ही एका मशीद आणि मंदिराची न राहता अयोध्या आणि परिसरातील जातीय दंगलींचे अनेक वर्षे कारण बनली. ब्रिटिशकाळात त्याच्यावर इलाज करणे हुकूमशाही व्यवस्थेला शक्य असताना त्यांनी त्या भागातील हिंदू मुस्लिमांमध्ये वाद कसा पेटत राहील आणि जातीय दंगली कशा घडत राहतील हेच पाहत भारताच्या इतिहासात एक गंभीर वळण निर्माण करून ठेवले. ब्रिटीशांचीच री ओढत स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसने ही तेढ वाढवत नेली. त्याचा आता निकाल लागून मंदीर निर्माणाचे महान कार्य या देशात घडत आहे. हा भक्तीचा जितका विषय आहे तितकाच तो अस्मितेचा विषय आहे. राम आहे की नाही, देव  आहे की नाही, श्रद्धा अंधश्रद्धा, पुरोगामी सनातन असले फरक न करता आम्हाला आमचे सांस्कृतिक वैभव कोणा आक्रमकाने एका आक्रमणात नष्ट केले. ते वैभव आम्ही आज परत मिळवत आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. काही बावळट लोक इथे हॉस्पिटल बांधा, विद्यापीठ बांधा, शाळा बांधा असले फालतू सल्ले या दरम्यान देत होते आणि स्वत: किती पुरोगामी आणि विचारवंत आहोत असे दाखवत होते. पण या भोंदूंना सांगावेसे वाटते की देशात काय कमी हॉस्पिटल आणि विद्यापीठे आहेत का? जी जागा आमच्या इतिहासाची, सांस्कृतिक वैभवाची होती तीथे भलतेच काहीतरी बांधल्यावर आमच्यात आणि बाबरात फरक तो काय राहिला? त्यामुळेच आज या राममंदीराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्याने अतिव आनंद आहे.
 राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद यांच्यातील वादाच्या या इतिहासाने ऐंशीचे दशक संपता संपता जे वळण घेतले त्यातून देशाने एक प्रचंड लोक आंदोलन पाहिले. प्रचंड मोठया गर्दीने उद्ध्वस्त केलेली मशीद पाहिली, या मशिदीचा बदला म्हणून देशात बॉम्बस्फोटांची मालिका पाहिली, साखळी बॉम्बस्फोटांमध्ये होरपळणारी मुंबईसारखी आर्थिक राजधानी दीनवाणी झालेली पहिली. दोन धर्मामधल्या सर्वसामान्य नागरिकांचा रक्त संहार पहिला. त्याचे पडसाद पुढच्या दोन दशकांमध्ये देशभरात वेगवेगळया ठिकाणी जातीय दंगलीत अनुभवले गेले. गोध्रा येथे करसेवकांच्या रेल्वे डब्याला आग लावून त्यांना त्यात होरपळून मारले गेले. त्याचा बदला म्हणून गुजरातमध्ये मोठी दंगल झाली. या दंगलीचेही पडसाद इतरत्र उमटले. अशाप्रकारे एका पवित्र प्रार्थना स्थळासाठी देशभरात हजारो माणसांचे रक्त सांडले आणि लाखो लोकांचे रक्त आटले. त्या लढ्याला यश प्राप्त होउन आज मंदीर उभे राहणार आहे. दरम्यानच्या काळात हे प्रकरण न्यायालयात जाऊन प्रभू श्रीराम व्यक्ती, देवता, महाकाव्य की दंतकथा इथपासून त्याच्या अस्तित्वापासून मंदिराच्या अस्तित्वापर्यंतची प्रत्येक गोष्ट पडताळली. आरोप आणि प्रत्यारोपित होत गेली. अशा पार्श्वभूमीवरील न्यायालयीन खटल्याचा निकाल ज्यांच्या समोर होता त्या न्यायासनाला हा वाद म्हणजे केवळ एक जमिनीच्या अधिकाराचा वाद आहे आणि तो त्यादृष्टीने पाहिला जावा असे सांगून निकाल द्यावे लागले. विविध न्यायपीठासमोर एक एक गुंता सोडवत सोडवत अखेर सर्वोच्च न्यायालयाने एक अंतिम निकाल दिला आणि राम मंदिराची वाट मोकळी झाली. मशिदीसाठीही स्वतंत्र पाच एकराची जागा देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आणि अखेर कोर्टाच्या हुकूमाने ही रक्तरंजित लढाई मंदिर निर्माणपर्यंत येऊन थांबली आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते त्याची पायाभरणी व्हावी ही तर अपूर्वच घटना आहे. यामध्ये त्यांचे योगदान आहेच. त्यामुळे चांदीचे फावडे तयार करून त्यांच्या हस्ते झालेले भूमिपूजन आणि त्याचे साक्षीदार आपण आहोत ही तमाम भारतीयांना अभिमानाची बाब आहे.  आता होणारे राम मंदिर आणि अयोध्येतच दुस़र्‍या ठिकाणी जागा मिळाल्यानंतर मशीद उभारली गेली तर त्यातून वाद मिटावा आणि संपूर्ण देशात एक संवादाचे वातावरण निर्माण व्हावे अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता कसलेही राजकारण न करता या अस्मितेचा गौरव कसा करता येईल याकडे पाहिले पाहिजे. हा दुसरा स्वातंत्र्योत्सवच आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पाचशे वषार्र्पूर्वी परकीय आक्रमणात नष्ट झालेली इमारत आपण पुन्हा उभी करत आहोत ही भारतीय एकजुटीची ताकद आहे. त्यामुळेच बुधवारचा दिवस सर्वत्र आनंदाचा आणि अभिमानाचा होता. त्यामुळेच हा दिवस एक ऐतिहासिक होता. त्या इतिहासाचा साक्षीदार प्रत्येक भारतीय आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: