मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

बाकीच्या आजारांचे काय?

   औषधोपचाराचा मारा करून, लोकांना घाबरवून सोडून मारायचे आणि लुटायचे असे काही कारस्थान आहे का, असा प्रश्न आता अगदी ठळकपणे पडू लागला आहे. याचे कारण रविवारी आलेली बातमी. एका वाहिनीवर दाखवले की आता आवाजावरूनही कोरोना झाला आहे की नाही हे 30 मिनिटात सांगता येणारे तंत्र आले आहे. म्हणजे आपल्याकडे कोरोना झाला आहे हे सांगणारे तंत्र विकसीत केले आहे पण ते बरे करण्याचे तंत्र विकसीत केलेले नाही. कारण औषध कंपन्यांचा प्रचंड फायदा होत असल्यामुळे ही लूट चालवली आहे काय असे वाटते. पण त्यामुळे अन्य आजाराच्या रूग्णांची जी हेळसांड होत आहे त्याचे काय?

   सध्या सगळीकडे कोरानाचा विषय. अन्य साथीचे रोग इतर आजाराकडे कोणी ढुंकूनही पाहायला तयार नाही. जरा किरकोळ ताप आला तरी लगेच संशयीत म्हणून त्या रूग्ण आणि नातेवाईकांची लूट केली जात आहे. हे प्रकार आता थांबवले पाहिजेत. कोरोनाच्या रोगाची दररोज नवीन लक्षणे सांंगितली जात आहेत. आता म्हणे आवाजात झालेल्या बदलानेही हा रोग झाल्याचे सांगता येईल. म्हणजे लोकांना आजारी पाडणारे तंत्र निर्माण केले जात आहे का? अन्य कुठलाही आजार झाला असेल तरी त्याला कोरोना नावाचे सर्टीफिकेट देण्याचा हा आटापिटा आहे का?
 आता पावसाळा सुरू झाला आहे. हळूहळू साथीचे आजार डोकेवर काढतील. अशा परिस्थितीत या आजारांवर उपचार करण्यासाठी रूग्णांनी कोणत्या रूग्णालयात अथवा आरोग्य केंद्रात उपचार घेण्यास जायचे यावर सरकारचे काहीही धोरण नाही. खाजगी डॉक्टरांना त्यांचे रूग्ण कोरोनाची टेस्ट करायला पाठवा अशा सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे साध्या अन्य रूग्णांवर उपचार करण्यास डॉक्टर तयार नाहीत. ही सामान्य माणसांची छळवणूक आहे. कुठल्याही रोगाची लक्षणं असली तरी टेस्ट करोनाची करायची आणि पैसे खर्च करायचे. हा प्रकार थांबवला पाहिजे. या सगळ्याची सरकारला गरज असेल तर त्यांनी फुकट टेस्ट करावी. रूग्णांकडून पैसे घेउ नयेत. या प्रकारांनी एक लूट करणारे रॅकेट कार्यरत आहे काय असा प्रश्न पडतो.
एखाद्याला साथीचा आजार झाला आणि तो जर रूग्णालयात अथवा खासगी दवाखाने उपचारासाठी गेला असता त्याला प्रथम कोरोनाची चाचणी करा, असे सांगितले जाते. त्यामुळे तो रूग्ण अगोदर त्याला होणार्या त्रासाने तो बेजार असतो. अशा अवस्थेत कोरोनाची चाचणी करा म्हटल्यानंतर तो निम्मा गारद होतो. त्याच्या मनामध्ये आपणास कोरोना झाला आहे की काय? अशी भिती निर्माण होते. अशा भितीमुळे सुध्दा कोरोना ‘निगेटीव्ह’ असणारे रूग्ण देखील ह्दयविकार व अन्य आजारांनी मृत्यूमुखी पडल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याविषयाकडे गांभीर्याने बघून कोरोनाबरोबर अन्य आजारांच्यावर उपचारासाठी राज्यातील संबंधित शासकीय रूग्णालये, महापालिका रूग्णालये, त्याचबरोबर खासगी रूग्णालयांना देखील सुचना देऊन उपचारांची सोय करावी. अन्यथा कोरोना राहिल बाजूला व अन्य साथीच्या आजाराने उपचाराविना रूग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागेल. शासनाने या बाबींचा गांभीर्याने विचार करावा. कारण, येणारा हा चार महिन्याचा कालावधी या साथीच्या आजारांचा आहे. देशात पावसाने थैमान घातलेच आहे. तर राज्य भरात देखील पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे.
कोरोना महामारीमुळे देशात सर्वत्रच अन्य आजाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. ह्दयरोग, मधुमेह, पावसाळ्यातील वातावरणामुळे होणारे सर्दी, ताप, खोकला या सारखे आजार डेग्यू, मलेरियासारख्या आजारात पावसाळ्यात अधिक भर पडते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उपचार घेण्यासाठी त्यांनी कोणत्या रूग्णालयात जायचे, हा खरा प्रश्न आहे.
 सध्या कोरोनामुळे या रूग्णालयात केवळ कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहेत. तर खासगी रूग्णालयात देखील कोरोनाचेच रूग्ण असल्यामुळे अन्य आजारांवर उपचार घ्यायचे तरी कसे? हा खरा प्रश्न आहे. पावसाळा सुरू होत असताना अन्य साथीच्या रोगांसाठी रूग्णांनी उपचार कोठे घ्यावा, त्याचे नियोजन प्रशासनाने केले नाही. कोरोनाच्या भितीमुळे खासगी वा सरकारी दवाखान्यात जरी गेले तर प्रथम कोरोनाची चाचणी करून घ्या, असे डॉक्टर सांगतात. आणि एका चाचणीला सुमारे 2400 रूपये खर्च लागतो. हा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही. शिवाय ही चाचणी पॉझिटीव्ह येणार की निगेटीव्ह येणार याची भिती तो अहवाल येईपर्यंत रूग्णांच्या मनात असते. त्यामुळे या अनावश्यक चाचण्या थांबवल्या पाहिजेत.
आज नागरिकांनी उपचार घ्यायचे झाले तर कोठे जायचे. आणि हे उपचार घेताना त्यांना कोरोना चाचणी करावी लागणार का? या बाबी देखील स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे.

पावसाळ्यातील वातावरणामध्ये हवामानात बदल होतो. कधी-कधी कामानिमित्त पावसात भिजावे लागते. त्यामुळे सर्दी, खोकला आणि ताप याचा त्रास होतो. मात्र, कोरोनामध्ये देखील ही लक्षणे असल्यामुळे नागरिकांमध्ये ही भिती आहेच. शिवाय डॉक्टरांकडे गेल्यानंतर हा त्रास असल्याचे सांगितल्यानंतर ते प्रथम कोरोनाची चाचणी करा, म्हणूनच आग्रह धरणार. त्यामुळे डॉक्टर आणि नागरिक यांच्यामध्ये एकप्रकारची ही कोंडीच आहे. त्यात आता आवाजात बदल झाल्यावर कोरोना असू शकतो अशी भिती घातली जाते आहे. त्यामुळे ही कोंडी कशी सोडवायची हे आव्हान आता या काळात राहणार आहे. अशा परिस्थितीत या पावसाळी वातावरणात अशा रूग्णांकडे दुर्लक्ष केले तर साथीचे आजार अधिक बळावतील. ते नियंत्रणात आणणे प्रशासनाला अवघड जाईल.
या सगळ्या बाबी पाहता कोरोना हे एक कृत्रिम भूत उभे केले आहे काय असा प्रश्न पडतो. कोरोनाच्या नावाखाली सामान्यांची लूट करायचे कारस्थान जोरात असल्याचे दिसून येते आहे. त्या कारस्थानाचा एक भाग म्हणजेच अन्य आजारांकडे दुर्लक्ष केले जात आहे. माणसांची सर्दी खोकला वाढवून कोरोनाच्या टेस्ट करण्यास भाग पाडले जात आहे. हे प्रकार तातडीने थांबवण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: