आज होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्या निमित्ताने अनेकांनी अनेक वक्तव्ये करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये सर्वाधिक जबाबदारी आहे ती काँग्रेसचीच. चारच दिवसांपूर्वी भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि नेहमीच वादग्रस्त आणि चमत्कारीक वक्तव्ये करण्यात माहिर असलेले सुब्रमण्यम स्वामी यांनी एक वक्तव्य केले होते. त्याचा वेगळा अर्थ काढला गेला असला तरी हा प्रश्न समस्या बनवण्यास काँग्रेस जबाबदार आहे हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालेले आहे.
हे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. याच दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वानी यांच्या एका वक्तव्यानं चर्चेला तोंड फुटलंय. ’राम मंदिर निर्माणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काहीही योगदान नाही’ असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय. ’गेल्या पाच वर्षांपासून राम सेतुची फाईल पंतप्रधानांच्या टेबलावर पडलेली असल्याचंही’ स्वामी यांनी म्हटलंय. एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना सुब्रमण्यम यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे भाजपमध्ये चर्चा सुरू झालीय. मोदींपेक्षा राजीव गांधींचे योगदान मोठे आहे हे स्वामींनी म्हटले. अर्थात त्यांनी ते स्पष्ट म्हटले असते तर जरा बरे झाले असते. म्हणजे भाजपचाही बुरखा फाटला असता.
राम मंदिरासाठी प्रयत्न करणार्यांत सुब्रमण्यम स्वामी यांनी माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी यांच्या नावाचाही उल्लेख केला. ’ज्या लोकांनी यासाठी काम केलं त्यांच्यात राजीव गांधी, पी व्ही नरसिंह राव आणि अशोक सिंघल यांच्या नावाचा समावेश आहे’, असं स्वामी यांनी यावेळी म्हटलंय. राजीव गांधी दुसर्यांदा पंतप्रधान बनले असते तर अयोध्येत राम मंदिराचं निर्माण तेव्हाच झालं असतं. राजीव गांधी यांनी वादग्रस्त जागेचं टाळ उघडलं होतं आणि राम मंदिरासाठी शिलान्यास कार्यक्रमाची परवानगीही दिली होती परंतु, त्यांच्या अकाली निधनामुळे अनेक गोष्टी बदलल्या, असं याअगोदर स्वामी यांनी म्हटलं होतं
म्हणजेच राम मंदीर हा मुद्दा भाजपने राजीव गांधींकडून हायजॅक केला असाच होतो. अर्थात राम मंदीराचा मुद्दा वादग्रस्त करण्याचे कामही काँग्रेसनेच केले. याला नेहरूंचे पाप असेच म्हटले जाते. कारण नसताना राम लल्लांच्या मंदीराला कुलुप लावण्याचे राजकारण पंडित जवाहरलाल नेहरूंनी केले. त्यामुळे हिंदू मुसलमान यांच्यात दरी निर्माण करण्याचे राजकारण त्यांनी केले होते. रामाबद्दल प्रेम हिंदूंना होते तितकेच मुसलमानांनाही होते. पण भारतीय मुसलमानांना बाबराचे वंशज ठरवून, परकीर ठरवून हिंदू मुसलमान यांच्यात दरी निर्माण करण्याचे राजकारण नेहरूंनी केले होते. ती चूक सुधारण्याचे काम राजीव गांधींनी केले. त्यामुळेच राम मंदीराचा मार्ग मोकळा झाला होता. पण नेमके त्याच दरम्यान राजीव गांधी बोफोर्स प्रकरणात अडकले. व्ही पी सिंग यांनी बंडखोरी करून जनता दल काढले आणि काँग्रेसची सत्ता गेली. राजीव गांधी सत्तेवर आले असते तर कदाचित झालेली असते तेंव्हाच राम मंदीर. पंडित नेहरूंनी केलेली घोडचूक त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे देशात हिंदू मुसलमान अशी दरी निर्माण होता कामा नये हे राजीव गांधींनी ओळखले होते. पण त्यांचे हे मोठेपण काँग्रेसच्या अन्य नेत्यांना अजूनही समजलेले नाही. ते फक्त तत्कालीन नरसिंहराव यांनाच समजले होते. त्यामुळे बाबरी मशिद पाडायच्या काळातही ते स्थिर राहिले होते असे दिसते. सुब्रमण्यम स्वामी जरा स्पष्टच बोलले असते तर बरे झाले असते. पण केवळ मुस्लिम व्होट बॅक निर्माण करण्यासाठी रामाचा बळी देण्याचे पाप स्वातंत्र्योत्तर नेहरूंनी केले. ती चूक सुधारून 1986 ला राजीव गांधींनी राममुक्त केले हे नक्कीच आता स्पष्ट होत आहे. ते शक्य झाले असते तर आज काँग्रेसला कोणीच संपवू शकले नसते. पण नेमका राजकारणात राम कशात आहे हे भाजपने जाणले आणि हा मुद्दा हायजॅक केला. शिवसेनेलाही त्याचे महत्व समजले आणि पहिले मंदीर, फिर सरकार अशी घोषणा त्यांनी दिली. त्याचा परिणाम मतदारांवर होउन शिवसेनेला आज राज्याची सत्ता मिळाली. त्यामुळे सुब्रमण्यम स्वामींच्या वक्तव्याने अनेक सत्य बाहेर पडताना दिसत आहेत.
राम मंदिराची उभारणी व्हावी, ही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचीही इच्छा होती, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीही म्हटलंय. तर ’राम प्रत्येक नागरिकाच्या श्रद्धेचे केंद्र आहे. सध्या देशही रामावरील विश्वासातूनच चालत आहे. त्यामुळेच रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी व्हायला हवी, अशी राजीव गांधी यांचीही इच्छा होती,’ असं ट्विट मध्य प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी ट्विटरवर व्यक्त केलं आहे. म्हणजेच आता पंडित नेहरूंनी केलेल्या घाणेरड्या फोडाफोडीच्या राजकारणापासून काँग्रेस आज सावध झाल्याचे दिसते.
काँग्रेसचा आजवरचा निवडणुका जिंकण्याचा मार्ग हा हिंदू मुसलमनान यांच्यात तेढ निर्माण करणे हेच होते. धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून जातीय राजकारण करण्याचा पाया नेहरूंनी घातला. त्याचाच एक भाग म्हणजे स्वातंत्र्यानंतर 1949 ला रामाला बंदीवान करण्याचे राजकारण होते. त्यामुळे ही चूक राजीव गांधींनी सुधारली आणि काँग्रेसचे पारंपारीक राजकारण बंद केले. याचे कारण जनता सुशिक्षित होत होती. माहिती मिळत होती. आणिबाणीचा फटका मिळाल्यामुळे काँग्रेसला सत्तेपासून दूर करण्याचे शक्य झाले होते. आता जर असे फोडा आणि झोडा या ब्रिटीश नितीचे राजकारण केले तर पुन्हा कधीच संधी मिळणार नाही हे समजल्याने त्यांनी राममुक्त करण्याचा आणि कुलुप काढण्याचा निर्णय घेतला. हेच वास्तव यातून समोर येते. पण ते आजही राहुल गांधींसारख्या मंडळींना समजले नाही. हे लोक हिंदू द्वेष करत आजही धर्मनिरपेक्षतेचा खोटा बुरखा पांघरून आहेत. त्यामुळेच आज काँग्रेस सत्तेबाहेर आहे. मणिशंकर अय्यर, दिग्विजयसिंग, अशा लोकांच्या सानिध्यात राहुन राहुल गांधी अगदीच टाकाउ बनले.
माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या जवळच्या एका केंद्रीय मंत्र्यांनं केलेल्या खुलाशानुसार, 1992 मध्ये बाबरी विद्ध्वंसापूर्वीच नरसिंह राव अयोध्येत राम मंदिर निर्माण करणार होते. यासाठी त्यांनी योजनाही तयार केली होती. परंतु, तेव्हा वेगवेगळ्या मठांचे शंकराचार्य आणि पीठाधीशां दरम्यान सुरू असलेल्या मतभेदांमुळे ही योजना यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे राममंदीराचे महत्व राजीव गांधींना समजले होते. ते जर सोनिया गांधी आणि राहुल गांधींना समजले असते तर आज काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली नसती. पण त्यांना अंधारात ठेवण्याचे काम नेहरूनिष्ठ कर्मठ काँग्रेसींनी केले. त्यामुळे जसे बाबरीचे पतन झाले तसेच जुन्या काँग्रेसचे झाले. आजची नवी काँग्रेस राहुल गांधींनाही न जुमानता राम मानणारी तयार झाली आहे, त्याची बीजे राजीव गांधींच्या धोरणात होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा