मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

व्यवहारी शिक्षणाची गरज

    गणेशोत्सवाच्या तयारीसाठी एका दहावीतील मुलाला भिंतीचे माप घेण्यास सांगितले. त्या मुलाने हातात घरातील शिवणाचा टेप घेतला आणि मोजू लागला. जवळपास अर्धा पाउणतास तो मुलगा भिंतीचे माप घेत होता. या संपूर्ण भिंतीला डेकोरेशन करण्यासाठी रंगीत वॉलपेपर चिकटवायचा आहे. तो किती आणायचा यासाठी त्या भिंतीचे क्षेत्रफळ काढायचे होते. पण ते काही त्या मुलाला जमले नाही.
   मुळात झाले होते काय की, त्या मुलाने शिवणाचा टेप घेतला होता. त्यावर इंच आणि सेंटीमीटर दोन्ही आकडे होते. तो मुलगा कधी इंचात आकडे लिहीत होता तर कधी सेंटीमीटरमध्ये लिहीत होता. ही सगळी कसरत पाहताना मला संताप, हसू, आश्चर्य सगळंच वाटत होतं. कारण एका दहा बाय दहाच्या भिंतीचे क्षेत्रफळ मुलांना काढता येत नसेल, ते मोजता येत नसेल तर इतकी वर्ष शाळेत शिकून केले काय? शाळेचे शिक्षण हे व्यवहारात उपयोगाला आणायचे असते हे समजत नसेल तर मुलांच्या शिक्षणाचा उपयोग काय? किती इंच म्हणजे फूट, किती सेटिमीटर म्हणजे फूट, किती सेंटिमीटर म्हणजे मीटर हे अभ्यासात शिकवलेले असतानाही मुलांना त्याचा व्यवहारात वापर करता येत नसेल तर त्या शिक्षणाचा उपयोग काय? फोनमध्ये तासनतास गुंतून राहणार्‍या या पिढीतील मुलांना व्यवहारातील ज्ञान कमी पडते आहे का?
    अशी अनेक उदारहणे देता येतील. अगदी सुशिक्षीत असलेली माणसे बँकेत जातात तेंव्हा त्यांना साधी पेइन स्लीप भरता येत नाही. विड्रॉवल स्लीप भरता येत नाही. एखादा चेक लिहिला तर त्यावर खंडीभर चुका करतात. कोणत्या रकान्यात काय लिहायचे आहे यामुळे गडबडून जातात. बँकेत असाच एक सुशिक्षीत माणूस दिसला. माझ्या जवळ आला आणि पेईन स्लिपमध्ये काय काय लिहू विचारत होता. आता कोणत्याही बँकेची स्लीप ही मराठी, हिंदी, इंग्रजी अशा दोन भाषांमधून असते. कोणती तरी एक भाषा वाचून समजायला हवी. नाव पुढे नाव लिहायचे. अकौंट नंबर पुढे अकौंट नंबर, तारीख कॉलमपुढे तारीख लिहायची. यासाठी टेन्शन कसले घेतात लोक? शिक्षणाचा व्यवहारात उपयोग न करण्याचे हे फळ आहे. कोरी स्लीप वाचली तर त्याची फक्त रिकाम्या जागेत उत्तरे भरायची आहेत. पण त्यासाठी शिकलेली माणसे अडाण्यासारखी शेजार्‍याला विचारतात? त्या माणसाला सांगितले, इथे नाव लिहा, इथे अकौंट नंबर लिहा, इथे तुमचा मोबाईल नंबर लिहा, खाली सही करा, पॅन नंबर टाका. हे सगळं सांगितल्यावर त्याची शंका होती, अकौंट नंबर माझाच टाकू ना? त्या शिकलेल्या माणसाची कीव करावीशी वाटली. तुझ्या खात्यात पैसे भरण्यासाठी आला आहेस आणि कुणाचा अकौंट म्हणून काय विचारतो? पण शिकून काही फायदाच नाही असेच दिसते.
    माणसं नेहमी दफ्तरदिरंगाई, सरकारी कामात उशीर होतो म्हणून ओरड करत असतात. पण त्यात आपल्या कितीतरी चुका असतात याचे भान त्यांना नसते. कोणताही अर्ज करताना तो पूर्ण भरला जात नाही. त्यात आवश्यक माहिती पूर्ण भरलेली नसते. कोणताही फॉर्म भरताना कोणताही रकाना रिकामा ठेवू नये याचे भान न राखल्याने कामे पूर्ण होत नाहीत. मग सरकारला, प्रशासनाला, शासकीय अधिकार्‍यांना दोष दिले जातात. हे केवळ व्यवहारात शिक्षणाचा उपयोग न करण्यामुळे होते. म्हणूनच आता शिक्षणाचा व्यवहारात उपयोग होतो की नाही हे पाहण्याची गरज आहे. शिक्षणाचा उपयोग जगण्यासाठी आणि व्यवहारासाठी करता आला पाहिजे. केवळ पुस्तकी ज्ञान देउन उपयोग नाही. गणितात शंभर पैकी शंभर मार्क पडलेत, लांबी गुणिले रूंदी म्हणजे क्षेत्रफळ हे सूत्र पाठ आहे. पण भिंतीचे क्षेत्रफळ काढायला येत नसेल तर त्यानं इंजिनीअर होण्याचे स्वप्नच बघू नये.
त्यापेक्षा आमचा बांधकाम कामगार अनुभवातून हुषार असतो. तो अचूक मापे घेतो. तो दहावीपण शिकलेला नसतो. पण वर्गात हुषार म्हणवून घेणारी मुले मापे नीट घेउ शकत नाहीत. हा दोष कुणाचा?
शाळेत जे कागदाचे अमूक करा अन तमूक करा म्हणून प्रोजेक्ट केले जातात. त्यासाठी मुलं आईबापांना वेठीस धरतात. असल्या फालतू प्रोजेक्टपेक्षा मुलांना व्यवहारात उपयोगी पडणारे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. कागदाची फ्रेम आणि काहीतरी कचरा करायला सांगण्याऐवजी तुमच्या घराची मापे तुम्हाला घेता येतात का? घरातील बेसीन, सींक, नित्य उपयोगाच्या वस्तुंची देखभाल कशी करावी याचे शिक्षण दिले तर त्याचा काही फायदा होईल.
आजकाल बारीक सारीक कामासाठी कोणी येत नाही. घरातील एखादा फ्यूज गेला, किंवा किरकोळ दुरूस्ती असली, छोटाच टवका उडाला म्हणून त्याठिकाणी रंग देण्यासाठी कोणताही पेंटर येत नाही. तर अशी कामे मुलांना करता आली पाहिजेत. व्यवहारज्ञान शून्य शिक्षणाचा आज बाजार मांडला आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या आहारी गेल्यामुळे वाणसामान कसे आणावे, त्याची यादी कशी करावी, भाजी आणायला गेल्यावर कशी आणावी, या साध्या गोष्टी अनेकांना जमत नसतात. कारण प्रत्येक गोष्टीचे पार्सल मागवायची सवय लागलेली असते.

   शिक्षणाचे धोरण बदलले आहे. पण त्यात व्यवहारात उपयोगी पडणारे शिक्षण किती आहे याचाही विचार केला पाहिजे. मुलांना शिकल्यावर कुणी तरी विचारले पाहिजे की हे तू शिकलास, त्याचा जगासाठी, व्यवहारासाठी काय फायदा? हे शिक्षण तुझे पोट भरू शकेल का? तुला समाजात, जगात उभे करू शकेल का? नाहीतर नावाला डिग्री घेतली आहे पण बँकेत स्लीप भरता येत नाही, कसला अर्ज करता येत नाही, कसला फॉर्म भरता येत नाही, मग या शिक्षणाचा उपयोग  काय? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: