मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

अविश्रांत मेहनत घेणारे बाबा...

  अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हेच यशाचे रहस्य आहे, असे धोरण ज्यांनी अवलंबले ते मुरलीधर तथा बाबा शिंगोटे यांचे आज निधन झाले. आपल्या कर्तृत्वाचा आणि कामे कशी करायची असतात त्याचा ठसा उमटवून मराठी वृत्तपत्रसृष्टीत एक वेगळा ठसा उमटवणारे मालक, संपादक, प्रकाशक, वितरक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे नाव घेतले   जाते.

      अत्यंत साधेपणाने राहणार्‍या बाबांकडे नेमकी काय दूरदृष्टी होती ती अलिकडेच मला पहायला मिळाली. ती म्हणजे यावर्षीचा फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात त्यांच्या सानिध्यात दीर्घकाळ राहता आले आणि त्यांची कार्यपद्धती जवळून अनुभवता आली. त्या काळात बाबांसमवेत आलेले अनुभव हे अत्यंत मार्गदर्शक असेच आहेत.
   आपण वाचकांना जो अंक देणार आहोत तो अत्यंत अचूक असला पाहिजे. माहितीने परिपूर्ण असला पाहिजे. त्यात मनोरंजनही असले पाहिजे याकडे बाबांचा कटाक्ष असायचा. त्यामुळेच प्रस्थापित वर्तमानपत्रातूनही आपली वेगळी वाट निर्माण करण्याचे त्यांचे धोरण हे यशस्वी झाले. अतिशय अल्प काळात त्यांनी आपली सर्वच वर्तमानपत्रे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय केली. अवघ्या दोन दशकात त्यांनी अनेक दशके लोकांच्या मनात असलेल्या वर्तमानपत्रांना मागे टाकत वाचकप्रियता मिळवली. हे काम सोपे नव्हतेच. पण ते त्यांनी सहजपणे करून दाखवले.
आजकाल मॅनेजमेंटच्या पदव्या घेणारे लोक आपल्या काहीतरी कल्पना लढवून प्रयोग करत असतात. पण असली कसलीही प्रस्थापित डिग्री नसताना बाबा त्यांच्या कल्पकतेने जो यशस्वी प्रयोग करत होते त्यामुळे मुंबई चौफेर, पुण्यनगरी ही वर्तमानपत्रे यशाच्या उत्तुंग शिखरापर्यत पोहोचली. याचे कारण दीर्घकाळ वितरण व्यवस्थेत राहिल्याने त्यांना वाचकांची नाडी सापडलेली होती. वाचकांना जे पाहिजे तेच दिले पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे बाबांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेली सर्वच वर्तमानपत्रे आणि अंबिका गृप हा वृत्तपत्रसृष्टीतील एक विश्वासपात्र आणि यशस्वी कंपनी ठरली.
   बाबांच्या प्रत्येक वागणुकीतून आणि कृतीतून काही ना काहीतरी सतत शिकायला मिळायचे. अन्य साखळी वर्तमानपत्रे किंवा त्यांची वितरण साखळी, त्यासाठी हिंडणारे कर्मचारीही या व्यवसायातले बारकावे नेमके कसे असले पाहिजेत याचे मार्गदर्शन घेण्यासाठी सतत बाबांकडे येत असत. बाबा नेहमी सांगायचे की, सगळ्या वर्तमानपत्रांना आज कुठे किती अंक विक्री झाली आहे, किती वितरीत केला आहे याची आकडेवारी दुसरेदिवशी समजायची. पण बाबांना मात्र ही आकडेवारी डोक्यात असायची. ती त्याच दिवशी सकाळी त्यांना माहिती असायची. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात कोणत्या गावात कोणते वर्तमानपत्र किती ठिकाणी जाते, किती खप आहे हे त्यांना माहिती असायचे. त्यामुळे कोणीही कितीही दावे केले, कसलीही आकडेवारी जाहीर केली, कोणाचेही दाखले दिले, कोणत्याही एजन्सीचे हवाले दिले तरी बाबांचे त्यावर शिक्कामोर्तब असेल तरच ती आकडेवारी खरी आहे का खोटी आहे हे समजायचे. कारण बाबांना वाचकांची, विक्रेत्यांची, पत्रकारांची, संपादकांची सवार्ंचीच माहिती, मर्यादा माहिती होत्या. प्रत्येकाची क्षमता माहिती होती. इतके ते सगळे कसे काय करत होते? तर एखादा चमत्कार असावा अशी काम करण्याची त्यांची क्षमता होती. तो मशिनचा आवाज, कागदाचा वास  आणि वाचकांपर्यंत पेपर पोहोचवण्यासाठी राबवण्यात येणार्‍या वितरणाचा आनंद हे त्यांना सतत हवे हवेसे वाटायचे. जास्तीत जास्त ताजी बातमी आपल्या अंकातून दिली पाहिजे यासाठीच त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली आणि वाचकांची पसंती मिळवली.
    बाबा नेहमी म्हणायचे की, लग्न समारंभात सजवलेले ताट असते त्याप्रमाणे वर्तमानपत्र असले पाहिजे. चमचमीत भाजी, चटणी, कोशिंबीर, झणझणीत रस्सा, आमटी, आंबट ताक, कढी, चुरचुरीत तळण, भजी, गोडवा जपणारे मस्तपैकी पक्वान्न अशी परिपूर्ण थाळी जशी लोकांना आवडती तसेच वर्तमानपत्र असले पाहिजे. त्यात सगळे रस असले पाहिजेत. ज्ञान, विज्ञान, मनोरंजन, अध्यात्म, राजकारण, इतिहास, भूगोल, कला, नाटक, सिनेमा असे सगळे विषय असले पाहिजेत. गुन्हेगारी जगत असले पाहिजे, आरोग्य असले पाहिजे, शिक्षण असले पाहिजे. सगळं काही एकाचवेळी देता आले पाहिजे. दोन रूपये देउन आपला पेपर विकत घेतल्यावर ते पैसे वसूल झाले असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. इतका छान अंक आपण दिला पाहिजे. यासाठी बाबा कायम आग्रही होते.
   अत्यंत उत्साही आणि न कंटाळणारे बाबा अतिशय प्रेमळ होते. त्यांचा मनाचा मोठेपणा त्यांच्या सानिध्यात राहिल्याने पहायला मिळाला हे माझे भाग्यच होते. एखादी गोष्ट आवडल्यावर त्याचे मनापासून कौतुक करण्याचे मोठे मन हे बाबांचेे होते. बाबांच्या सानिध्यातला प्रत्येक दिवस आणि क्षण हा काही ना काहीतरी शिकण्यासारखा असाच होता.
    कोणी कितीही बढाया मारल्या, कितीही काहीही सांगितले तरी त्याच्याकडे नेमके काय आहे हे बाबा ओळखून होते. त्यामुळेच बाबांनी नेहमीच भेदभाव विरहीत काम केले. कोणी मोठा कोणी छोटा असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. त्यामुळेच त्यांच्यावर प्रेम करणारी माणसे असंख्य होती.
   माणसाचे मोठेपण त्याच्या कर्तृत्वात असते. त्याच्या कपडे, राहणीमानावर माणसाचे कर्तृत्व ठरत नसते. हे बाबांनी दाखवून दिले. रात्र रात्र जागून आणि कमीत कमी विश्रांती घेउन बाबांनी आपली कंपनी मोठी केली. कंपनीचा विस्तार मोठा केेला.  
    महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्तमानपत्रांना आपले बॅनर उभे करावे लागतात. जाहीराती कराव्या लागतात. पण आपण कधीही बॅनर उभा करायचा नाही, असा त्यांचा कायम कटाक्ष असायचा. कायम वाचकांचा विचार करण्याची त्यांची विचारधारणा होती. त्यामुळेच त्यांचे या क्षेत्रात मोठे योगदान होते. सामान्य माणूस, मध्यमवर्गिय आणि साधी माणसे हा आपला वाचक आहे, ती आपली ताकद आहे, त्यांना जपायचे आहे हे बाबा नेहमी सांगायचे. त्यामुळे अत्यंत कमी कालावधीत सर्व वर्तमानपत्रे लोकप्रिय होत गेली. लोकमत उद्योग समुहाचे संचालक आणि पत्रकार, संपादक, माजी मंत्री राजेंद्रबाबू दर्डा हे बाबांचा नेहमीच अभ्यास करायचे. लांबून दिसले तरी बाबांना सन्मानाने बोलवायचे आणि त्यांचा गौरव करायचे. या माणसाकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे असे ते आवर्जून सांगायचे. आसपास भव्य ताफ्यात हिंडणारे आमदार, खासदार, मंत्रिगण असतानाही लांबच्या गर्दीतून अत्यंत साधेपणाने दिसणार्‍या बाबांचा गौरव जेंव्हा बाबूजी करायचे तेंव्हा सर्वजण बाबांकडे आश्चर्याने बघायचे. कारण या मागे बाबांची फार मोठी तपश्चर्या होती.
आज बाबांच्या जाण्याने अंबिका गृपची, आमची सर्वांची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. कारण आमचे मागदर्शक गेले आहेत. पण त्यांनी घालून दिलेल्या वाटेवरच आम्ही पुढेही जाउ असे वचन त्यांना यानिमित्ताने देउन आमची आदरांजली याठिकाणी अर्पण करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: