रविवार, २ ऑगस्ट, २०२०

चौकशीचे राजकारण

  तशी त्याची कारकीर्द फारशी मोठी नव्हती. त्याने काही चांगल्या मालिका आणि चित्रपट दिलेही. पण त्याने केलेली आत्महत्या हा इतका महत्वाचा विषय असू शकतो? देशातील सगळे प्रश्न संपले आणि आता कोणताही प्रश्न शिल्लक राहिला नाही म्हणून सुशांतसिंह याच्या आत्महत्येची चर्चा सुरू आहे का? त्याच्या आत्महत्या आणि चौकशीवरून इतके राजकारण का होते आहे? करू द्या ना पोलीसांना त्यांचे काम. कशाला राजकीय हस्तक्षेत होतो आहे?
म्हणजे अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचं गुंता दिवसागणिक वाढताना दिसतोय. बिहारमधील राजकीय नेतेही आता या प्रकरणावर मतं मांडू लागल्यानं राजकीय वळणही लागलं आहे. ट्विटरवर तर यावरच्या चर्चांना उत आला आहे. म्हणजे हा प्लॅटफॉर्म काय कुटाळक्या करायचा , गॉसिपिंग करायचा प्लॅटफॉर्म आहे काय?
गेल्या दोन-तीन दिवसात  हे प्रकरण विनाकारण तापत ठेवले जात आहे. त्यात तेल ओतण्याचे काम वाहिन्यांवरून होत आहे. खरे तर या फालतू चर्चा करणार्‍या वाहिन्यांवरच थोडे दिवस बंदी घातली पाहीजे, त्यांनाही एखादे सेन्सॉर बोर्ड असावे काय असे वाटू लागले आहे.
काय घडते आहे गेल्या चार पाच दिवसांपासून? तर सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत दाखल झाली होती. मुंबई पोलिसांच्या मदतीने अभिनेत्री अंकिता लोखंडेची चौकशी केली. त्यानंतर सिनेदिग्दर्शक रुमी जाफरी यांच्याही घरी बिहार पोलीस पोहोचले होते. हे सगळं व्यवस्थित चालले असताना राजकीय पक्षांनी त्यात मते मांडण्याची काहीच गरज नव्हती. म्हणजे फक्त गॉसिपिंग आणि साप सोडून देण्याचे प्रकार चालले आहेत. म्हणजे याला चक्क रिकामटेकडेपणाचे उद्योग म्हणावे लागतील. कदाचित लॉकडाउनमुळे घरात बसलेल्यांना काही काम नसल्यामुळे राजकीय नेते, कार्यकर्ते असले धंदे करत आहेत काय असा प्रश्न पडतो. म्हणजे अभिनेत्री रिया चक्रवर्तीबाबत माध्यमांनी बिहार पोलिसांना विचारलं असता, त्यांनी सांगितलं, रिया चक्रवर्तीच्या चौकशीची आता गरज नाही. मात्र, तिच्या हालचालींवर लक्ष आहे. असे बाहेर आले. तर कोणी म्हणते रिया चक्रवर्तीच्या विरोधात बिहार पोलीस लुकआऊट नोटीस जारी करण्याच्या विचारात आहेत.
गेल्या मंगळवारी सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रियाने सुशांतच्या आर्थिक व्यवहारात हेराफेरी केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी पोलीस तक्रारीत केलाय. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) प्रकरणी चौकशीस सुरुवात केली आहे. इतपत ठिक आहे. पण राजकीय पक्षांनी यात उडी घेणे म्हणजे अतिच झाले. कशासाठी याला इतके महत्व दिले जाते आहे? रिया चक्रवर्तीने एका व्हीडिओच्या माध्यमातून तिची भूमिका मांडली आहे. मला न्यायव्यवस्था आणि देवावर पूर्ण विश्वास आहे. माध्यमात माझ्याबाबत चुकीच्या गोष्टी दाखवल्या जात आहेत. वकिलांच्या सूचनेमुळे मी काही बोलत नाहीय. कारण प्रकरणाची चौकशी होतेय. सत्यमेव जयते. यावरूनही लगेच ट्विटरवॉर सुरू झाले. सगळ्या राजकीय पक्षांच्या उथळ नेत्यांनी त्यात हात धुवून घेतला.
म्हणजे एकीकडे चौकशा सुरू असताना, दुसरीकडे राजकीय टीकाही सुरू झाल्या आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीवरून महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर टीका केलीय. काय संबंध तुमचा ही टिका करायचा? एवढा जर आपल्या बिहारी माणसांचा पुळका होता तर त्याला तिथेच रोजगार, कलेची संधी का दिली गेली नाही? बिहारी म्हणून त्याचे कौतुक कसले करता? एकदा कलाकार सगळ्या देशाचा आहे म्हटल्यावर त्याला प्रादेशिक पातळीवर संकुचित कशासाठी करायचा? मुंबईने त्याला मोठे केले तेंव्हा काही वाटले नाही, पण मुंबई पोलिसांवर अविश्वास कशासाठी दाखवता? हे फालतू राजकारण आहे.
बिहारचा मुलगा सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची चौकशी करण्यास गेलेल्या बिहारच्या पोलिसांना मुंबई पोलीस सहकार्य करत नाहीत. उद्धव ठाकरे हे बॉलीवूडमधील माफियांच्या दबावात आहेत. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार असणार्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं सुशीलकुमार मोदी म्हणाले. महाराष्ट्राच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवताना लाज वाटायला पाहिजे होती. मग एवढा पुळका असेल तर मुंबई आणि महाराष्ट्रातील सगळे बिहारी घेउन जा. महाराष्ट्र जगवतो आहे, ही मुंबई जगवते आहे तुम्हाला आणि आता पुळका आला आहे काय?
बिहार पोलिसांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय की, मुंबई पोलिसांकडून चौकशीसाठी सहकार्य केले जात आहे. असे असताना हे घाणेरडे राजकारण का केले जाते आहे?
   सध्या तपास रिया चक्रवर्ती भोवती फिरतो आहे. त्याला वेगळे वळण लावण्याचा का प्रयत्न केला जात आहे? रिया चक्रवर्ती हे नाव सध्या चर्चेत आहे. पण अनेक लोकांची पहिली प्रतिक्रिया हीच होती की, रिया चक्रवर्ती हे नाव आम्ही सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतरच पहिल्यांदा ऐकलं. त्याआधी ती कोण होती, काय करत होती याबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती होतं. 2012 साली तिने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं. तिचा पहिला पिक्चर होता ’तुनीगा तुनीगा.’ त्याच्या पुढच्याच वर्षी तिने बॉलिवूडमध्ये ’मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटाव्दारे पदार्पण केलं. त्यानंतर तिने ’सोनाली केबल’, ’बँकचोर’ अशा चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या तर ’हाफ गर्लफ्रेंड’, ’दोबारा’ या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका केल्या. या दरम्यान रिया चक्रवर्ती अनेकदा वादांमध्ये अडकली आहे. 2018 साली ’जलेबी’ पिक्चर रिलीज व्हायच्या आधी दिग्दर्शक महेश भट यांच्याबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला.
या फोटोवरून रिया प्रचंड ट्रोल झाली. अनेकांनी रिया आणि महेश भट यांचं प्रेमप्रकरण असंही म्हटलं. असे असताना सुशांतच्या आत्महत्येनंतर रियाने अमित शहांना ट्वीट करून सीबीआय चौकशीची मागणी केली. तिने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, मी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती. त्याच्या मृत्यूनंतर जवळपास एक महिना उलटून गेलाय. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे पण न्याय मिळावा म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा. मला हे जाणून घ्यायचं आहे की सुशांतने असं का केलं. हे सगळे विषय का उकरून काढले जात आहेत? पोलीस तपास करत असतील की. त्याचे कशाला इतके राजकारण करायचे? आज देशापुढे असलेल्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे सोडून सीबीआय की बिहार पोलीस की मुंंबई पोलीस हा वाद घालण्याची गरज नाही. राजकीय लफडी चौकशी करण्यासाठी सीबीआयला पुरेशी आहेत. त्याला दिरंगाई करण्यासाठी कोणी सीबीआयला यात गुंतवू पाहते आहे काय याचीच आता चौकशी करावी लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: