रविवार, २ ऑगस्ट, २०२०

आकस्मिक बेरोजगारीचे संकट

कोरोना व्हायरसमुळे पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगभरात महामंदीचे, महाबेरोजगारीचे संकट आले. बेरोजगारीचा दर दिवसागणिक वाढतच आहे. बेरोजगारीचा हा चढता आलेख देशाला आणि राज्याला विकासाकडे नाही तर अधोगतीकडे नेणारा ठरतो, हेच वास्तव आहे.
फक्त मुंबईचाच विचार केला तर देशातील सर्वाधिक रोजगार देणारे शहर म्हणून या शहराची ओळख आहे. म्हणूनच मुंबई शहर भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत येणार्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळत असतो. त्यामुळे भारतातल्या विविध प्रांतांतून अनेक लोक मुंबई शहरात कामधंदा मिळविण्यासाठी येतात. त्यामुळे मुंबई शहराची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातील एक समस्या म्हणजे बेरोजगारी. आज कितीतरी कंपन्या, लघुउद्योग, कारखाने बंद पडले आहेत. काही उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे बेरोजगारीचा टक्का वाढतोय!
  गेल्या चार महिन्यात असंख्य तरूणांना, ज्येष्ठ, मध्यमवयीन व्यक्तिंना फोनवरूनच उद्यापासून कामावर येउ नका असे सांगण्यात आले. कॉलसेंटरपासून, आयटी क्षेत्रातही याच प्रकारे अनेकांचा रोजगार गेला आहे. म्हणजे काम नसल्यामुळे बेरोजगार असलेले आणि अचानक कोरोनामुळे कामावरून कमी केलेले असे बेरोजगार आज या देशात दिसत आहेत.
लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यांपासून आपल्या देशावर फार मोठे संकट कोसळले. कोरोना हा रोग जीवघेणा ठरला. त्यामुळे आपल्या सर्वांना लॉकडाऊन व्हावे लागले. सर्वात पहिले तर रेल्वेसेवा, बससेवा बंद करावी लागल्यामुळे लोकांचे कामावर जाणे शक्य झाले नाही. मग काय वर्क फ्रॉम होम’ चालू झाले. देशातील सर्व नोकरदारवर्ग घरातून काम करत होता. शाळा, परीक्षा बंद. त्यामुळे कित्येकांना कळेना की पुढे कसे होणार? बरं, आताही काही सांगता येत नाही, असे किती दिवस चालेल ते. काही नोकरदारांसाठी, शिक्षकांसाठी, मोठया उद्योगपतींसाठी वर्क फ्रॉम होम’ ठीक आहे आहे. पण सगळेजण तसे नाही करू शकत. जसे कुरियरवाले, ओला-उबरवाले, दूधवाले, पेपरवाले, कामवाल्या, मासे विक्रेते, भाजीवाले, घरगुती जेवणाचे डबे पोहोचवणारे, फुलवाले, फळवाले, रिक्षावाले, सलूनवाले असे कितीतरी जणांच्या रोजच्या रोजंदारीला फटका बसला आहे. यांच्यासाठी कुठून आले वर्क फ्रॉम होम?’ प्रत्येकाचा रोजगार वेगळा असतो. हातातला रोजगार गेला की, तुम्ही आपसूकच बेरोजगार होता.
 आज कितीतरी कंपन्या, लघुउद्योग, कारखाने बंद पडले आहेत. काही उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच संगणकाचे वाढते आक्रमण! दहा-दहा माणसांचे काम संगणक करू लागल्याने बेरोजगारीमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे युवकांना रोजगाराची समस्या फार मोठया प्रमाणात भेडसावत आहे. मोठया प्रमाणात कामाचा अनुभव मिळवण्यासाठी, तसेच प्रपंचाला हातभार लावण्यासाठी ही मंडळी वाटेल ती कामे करण्यास तयार असतात. रिकाम्या हातांना काम मिळाले नाही तर ही मंडळी अनिष्ट मार्गाला जाण्याचा संभव असतो.
   एका आकडेवारीनुसार, देशातील प्रत्येक पाचवा व्यक्ती सध्या बेरोजगार आहे. गेल्या चार महिन्यांत बेरोजगारीची टक्केवारी वाढली असल्यामुळे भविष्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
 रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार असे म्हणतात. पूर्वी याला बेकार असे म्हटले जात होते. पण जे बेरोजगार आहेत ते बेकार नसतात. ते शिकलेले, सुसंस्कृत असतात. पण परिस्थितीने त्यांना काम मिळत नसते. म्हणून बेकार शब्द मागे पडला आणि बेरोजगार आला. खरे तर रोजगार निर्माण करण्यास राज्यकर्ते बेकार आहेत म्हणून लोक बेरोजगार राहतात.
 जेव्हा कधी वेळ, क्षमता आणि योग्यतेनुसार लोकांना कामकाज मिळू शकत नाही, तेव्हा त्याला बेरोजगार’ असे म्हणतात.  जे लोक काम करू शकतात आणि इमानदारीने नोकरी शोधतात, पण काही कारणास्तव त्यांना नोकरी मिळत नाही, अशांनाही बेरोजगार’ असे म्हणतात.  रोजगार मिळवण्यासाठी उत्सुक असलेली व्यक्ती त्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्टया समर्थ असावी, तिची काम करण्याची इच्छा असावी, तसेच समाजातील प्रचलित वेतनदरावर काम करण्याची तिची इच्छा असावी; या तिन्ही अटी पूर्ण करण्यात व रोजगार मिळण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केल्यानंतरही रोजगार न मिळालेल्या व्यक्तीला बेरोजगार’ असे म्हणतात.
 अर्थशास्त्राच्या वर्गीकरणानुसार सध्या असलेल्या बेरोजगारीचे अनेक गट पडतात. त्यामध्ये खुली बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी, अदृश्य बेरोजगारी, सुशिक्षित बेरोजगारी, आकस्मिक बेरोजगारी इत्यादी बेरोजगारीचे कितीतरी प्रकार आहेत. त्यांपैकी सध्याचे संकट हे आकस्मिक बेरोजगारीचे ओढवले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या मुंबई महाराष्ट्रातील बेरोजगारीचे दर वीस टक्क्यांवर जाणे चिंताजनक मानले जात आहे. देशातील शहरांमध्ये गेल्या वर्षीच्या प्रमाणात यावर्षी बेरोजगारीचे प्रमाण वाढले. याचदरम्यान कोरोना विषाणूचा उद्रेक झाला. वेगाने रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे लॉकडाऊन करावे लागले. शहरांमधून लाखोंच्या संख्येने मजुरांचे स्थलांतर सुरू झाले. यातून ग्रामीण भागातील शेतीवरचा ताण वाढला. शहरांमध्ये रोजगारांच्या संधी कमी झाल्या. त्यामुळे या चार महिन्यांत बेरोजगारीचे प्रमाण झपाटयाने वाढले. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा बेरोजगारीचे प्रमाण जास्त आढळून येत आहे. आजच्या भारतापुढे बेरोजगारी हे अत्यंत महत्त्वाचे आव्हान आहे. येत्या काही दिवसात आपण कोरोनाच्या संकटातून बाहेर पडू पण बेरोजगारीच्या संकटातून बाहेर पडणे फार अवघड आव्हान या देशापुढे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: