बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

वाढता वाढता वाढे..

  देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या एका दिवसात पन्नास हजार इतक्या गतीने वाढत आहे. आता कोरोना बाधितांचा आकडा सतरा लाखाचा ा पार पडला आहे. एका एका दिवसात 52 हजार रुग्ण आणि 800 मृत अशी उच्चांकी आकडेवारी गाठलेली असताना 11 लाखाहून अधिक लोक बरे झालेले आहेत हा देशाला एक मोठाच दिलासा आहे. पण ही सगळी आकडेवारी वाढता वाढता वाढे अशी जात असताना काही दिवसांनी देशातील प्रत्येक घरटी एक रूग्ण अशी अवस्था येण्याचे लक्षण दिसत आहे.
त्याने कोणालाच सोडले नाही. बीग बी अमिताभ बच्चन यांना सहकुटुंब ग्रासले. अमिताभ बच्चन बरे होउन येतात तोच भाजपचे मोठे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना कोरोना झाल्याचे पुढे आले. शिवराजसिंह चौहान झाले, महाराष्ट्रातही अनेक मंत्रिगण झाले. त्यामुळे कोरोना धक्का देण्याचे थांबला आहे असे दिसत नाही. सर्वसामान्य माणसांशी तो क्रूरपणे वागतो आहेच, पण, मोठयांनाही त्याने सोडलेले नाही.
    देशातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणारी, त्यांना जपणारी यंत्रणा असते. नेते अभिनेते हे सुरक्षा कवचात वावरत असतात. त्यांचा थेट संपर्क कोणाशीच नसतो, त्यामुळे हे लोक सुरक्षित असतात हा आजवरचा अनुभव कोरोनाने खोटा ठरविला आहे. म्हणजे भारतातच नव्हे तर अगदी ब्रिटनच्या पंतप्रधानांपासून देशोदेशीच्या सत्ताधारी मंडळींनाही कोरोनाने अत्यंत छुप्या पद्धतीने गाठल आहेे. मात्र इतर लाखो नशीबवान लोकांप्रमाणेच हे नेतेही सुखरूपपणे या संकटातून बाहेर पडले आहेत, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. काही महान व्यक्ती यात दगावल्या. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी, नीला सत्यनारायण यांच्यासारख्या महान व्यक्ती आम्ही यामुळे गमावल्याही. पण तरीही इतक्या महान लोकांना कोरोनाची बाधा झाली कशी अशी शंका सर्वसामान्य माणसाला येणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तर जसा छुप्या कोरोनाग्रस्ताचा धोका सर्वसामान्य माणसाला आहे तसा तो या महनीय व्यक्तिमत्त्वांनाही आहेच. या व्यक्तिमत्त्वांच्या कार्यालयापासून विविध ठिकाणच्या बैठकांपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारीवर्ग यांचा संपर्क असतो. या मंडळींचा संपर्कही अफाट असल्यामुळे यांच्या संपर्कातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या या महनीय व्यक्तीही  कोरोनाग्रस्त होऊ शकतात.
   केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशातील सर्वात ताकदवान राज्यकर्त्यांपैकी एक असल्याने त्यांच्याविषयी चर्चा ही होणारच. मात्र स्वत:त कोरोनाची लक्षणे आढळल्याचे जाहीर करण्याचे मनोधैर्य बाळगणारे व्यक्तिमत्त्व या संकटावर मात करण्याची ताकद बाळगून असतेच. महानायक अमिताभप्रमाणेच अमित शहा हे सुद्धा या संकटातून बाहेर पडतील अशी सदिच्छा व्यक्त करूया. पण सर्वात महत्वाचे म्हणजे या मोठ्या लोकांचा दांडगा असलेला जनसंपर्क हेच त्यांना याची बाधा होण्याचे कारण आहे हे नक्की. त्यामुळे त्यांना जे  जे लोक गेल्या काही दिवसात भेटले त्यांनीही काळजी घेण्याची गरज आहे. म्हणजे मागच्याच आठवड्यात त्यांना माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसही भेटायला गेले होते. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा भेटले होते. तसेच प्रकाश जावडेकरही भेटले होते. देवेंद्र फडणवीस हे या काळात सगळीकडचे दौरे करून भेटी घेत आहेत. त्यामुळे त्यांनीही आता सावध राहिले पाहिजे.
कोरोनाचा संसर्ग अनेकांना छुप्या पद्धतीने झाला आहे. अनवधानाने संपर्कात येऊन बाधित होणाऱयांचीच सर्व संख्या आहे. जाणूनबुजून कोणी संपर्कात येणार नाही. पण, आता देशातील प्रत्येक व्यक्तीने या आव्हानाला फार म्हणजे फारच गांभिर्याने घेण्याची वेळ आलेली आहे. वाढता वाढता वाढे भेदीले नाही तर छेदीले भूमंडळा असे म्हणावे लागेल. कारण जगाच्या प्रत्येक देशाच्या कानाकोपर्‍यात तो पसरला आहे. कोरोनावरील औषध दृष्टिपथात असले तरी ते तयार होऊन सर्वसामान्य भारतीयांच्या उपचारात रुजू व्हायला अद्याप बराच वेळ जाणार आहे. अनेक तज्ज्ञांनी 15 ऑगस्टचा बोलबाला केला आहे. भारतीय सहयोगातून तयार झालेली लस स्वातंत्र्य दिनापर्यंत आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस असला तरी आव्हाने अनेक आहेत. तरीही डिसेंबर महिन्यापर्यंत देशाला दम धरावाच लागणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यालाच लस मिळेपर्यंत तारेवरची कसरत चालू ठेवावी लागेल असे म्हटले आहे. पण, ही कसरतही तितकीच भयानक आहे. तारेवरून उंचावर चालणा़र्‍यांनाच त्याचे मोल माहीत असते. तोल सुटला तर प्राणांशी गाठ असते. त्यातही धोरणकर्त्यांना करावी लागणारी कसरत ही संपूर्ण समाजाच्या प्राणांशी जोडली गेलेली असल्याने महामारीवरील औषध शोधण्याचा मोठा दबाव जगभरातील राज्यकर्त्यांवर आहे. संपूर्ण जगभरात आजपर्यंत कोरोनानेही सात लाख लोकांचा जीव घेतला आहे. म्हणजेच सात लाख संसार उद्ध्वस्त झाले आहेत.  तरीही या सर्व  परिस्थितीत मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱया लाखो लोकांना कोरोना होऊनही गेला, मात्र तो त्यांच्या ध्यानातही आला नाही. आज आरोग्य विभाग किंवा सरकारपुढचे आव्हान म्हणजे मृत्यूदर शून्यावर आणण्याचे उद्दीष्ट हे आहे. ते साध्य होईल तेव्हा होईल. पण, काळजी घेणे प्रत्येक व्यक्तीच्या हाती आहे. प्रत्येक सण, समारंभापूर्वी ही जाणीव फार मोठया वर्गाला करून द्यावी लागतेच आहे. आजपर्यंत झाले नाही, आता कुठला होतोय अशी वृत्ती बाळगली तर कोरोनाचा छुपा शत्रू घात करू शकतो. त्यासाठी सावधानता हीच सुरक्षा हे प्रत्येकाने स्वकियाला ध्यानात आणून दिलेच पाहिजे. समूह संपर्क वाढता वाढता वाढे अशा गतीने होत असताना प्रत्येकाने स्वत:ची काळजी करण्याचे आव्हान तितकेच वाढत चालले आहे. सतत वाढत चाललेला लॉकडाउन आणि त्याच्या वाढत्या मर्यादा माणसाचे जीवन अस्थिर करत आहेत. ही अस्थीरताही वाढत आहे. माणसाची भीती वाढत आहे. कारखाने, उद्योग, सेवा व्यवसाय बंद झाल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. हे सगळेच दुष्टचक्र वाढताना दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: