काँग्रेसच्या तेवीस नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिल्यानंतर सोनिया गांधींनी राजीनाम्याची तयारी दाखवली. दुसरीकडे नेतृत्व सोपवण्याची तयारी दर्शवली आणि पक्षाची बैठकही बोलावली. सोनिया गांधींची ही भूमिका अत्यंत स्पष्ट आणि योग्य अशीच आहे. परंतु काही काँग्रेस नेत्यांना मात्र या पत्राने असुरक्षित वाटू लागले. विशेषत: महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाव्यतिरीक्त कोणाकडे नेतृत्व गेले तर आभाळ कोसळेल अशी भिती वाटू लागली. त्यामुळे या लोकांनी पृथ्वीराज चव्हाण आणि महाराष्ट्रातील नेत्यांचा निषेध सुरू केला. गांधी कुटुंबियांव्यतिरीक्त पर्यायांचा विचार करणेही पाप आहे असे भासवून काँग्रेस अंतर्गत लोकशाही संपुष्टात आलेली आहे, इथे फक्त घराणेशाहीच चालू शकते असे बिंबवण्याचा प्रयत्न केला. यात विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि मंत्री केदारी यांनीही पुढकार घेतला. ही अत्यंत खेदाची गोष्ट वाटते आहे.
या सगळ्यावरून एकच दिसून येते, की ही काँग्रेसची वेगळी रणनीती असावी. चर्चेत राहण्यासाठी केलेला हा उपद्व्याप असावा. म्हणजे गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती काँग्रेसचे नेतृत्व करणार? काही अनुकुल होतात तर काहींना ही कल्पनाच भयावह वाटते. हे सारे कशासाठी? म्हणूनच यापूर्वी सक्षम काँग्रेस अध्यक्ष होउन गेले आहेत, दीर्घ काळ गेले आहेत हे कालच्याच लेखात आपण पाहिले आहे.2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी राहुल गांधी यांनी स्वीकारली आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गांधी-नेहरू घराण्याच्या बाहेरील व्यक्तीने आता अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी असे मत त्यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
काँग्रेस समितीने राहुल गांधींची ही भूमिका अमान्य केली. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या खांद्यावर पुन्हा नेतृत्वपदाची जबाबदारी आली. समितीने राहुल गांधींची ही भूमिका त्यावेळी का अमान्य केली होती? कारण सरळ आहे, बुडत्या जहाजात बसायला कोणीही आवडत नाही. गांधी कुटुंबाबाहेरच्या कोणाला संधी दिली असती आणि त्यानंतर महाराष्ट्रातील निवडणुकीत काँग्रेसची परिस्थिती सुधारली असती, तर त्याचे श्रेय त्याला मिळाले नसते. काँग्रेस ही गांधी कुटुंबियांची मालकी आहे आणि आपण त्यांचे मांडलिक आहोत अशी धारणा गेल्या काही वर्षात नेत्यांची झालेली आहे. त्यामुळे फक्त लाचारी, लोचटपणा हीच वैशिष्ठ्ये झालेली आहेत. अर्थात यात सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा दोष नाही. जबाबदारी कोणीच घेण्यास तयार नाही, हे वास्तव आहे. कारण अन्य पर्याय मान्य करायला तयार होत नाहीत. ही माळ आपल्या गळ्यात पडणार नसेल तर दुसरा नको, फक्त गांधी कुटुंबातीलच कोणाला तरी मिळावी. या विचाराने महाराष्ट्राचे नेते अन्य प्रांतातील नेत्यांना आणि अन्य प्रांतातील नेते महाराष्ट्रातील नेत्यांना विरोध करताना दिसतात.
आता वर्षभरानंतर प्रियंका गांधी यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा गांधी कुटुंब आणि अध्यक्षपदाची रखडलेली निवड याविषयीची चर्चा सुरू झाली. काँग्रेसने आपला मार्ग शोधावा असं म्हणत अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरील असावा असं त्या म्हणाल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षातले अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांची ’यंग ब्रिगेड’ म्हणून ओळखल्या जाणार्या नेत्यांनी बंडाचा पवित्रा घेतला. त्यामुळे प्रियंका गांधींना तसे जाहीरपणे बोलावे लागले. पण अन्य पर्याय स्वीकारायची तयारी छोट्या नेत्यांची नाही, हे दुर्दैव आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम केला आणि ते भाजपमध्ये गेले. राहुल गांधींच्या जवळचे असणारे दुसरे नेते सचिन पायलट यांनीही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधींचे अत्यंत जवळचे मानले जाणारे खासदार राजीव सातव यांनीही नव्या वादाला तोंड फोडलं. पण असे कोणी मत मांडले की त्याला बंडखोरी असे काँग्रेसमध्ये का मानतात? ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेस अध्यक्षपदाचा पर्याय म्हणून काँग्रेस का पाहू शकली नाही? कारण पर्याय नको आहे.
केंद्रात सत्ताधारी भाजप पक्षाला हरवायचे असेल तर सर्वप्रथम काँग्रेसला सक्षम होणं गरजेचं आहे हे काँग्रेस नेत्यांनाही मान्य आहे. पण काँग्रेसमधला अंतर्गत कलह दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
राहुल गांधी यांची अध्यक्षपदावर निवड करण्यासाठी काही काँग्रेस नेते आग्रही आहेत. गेल्या वर्षभरात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या नेतृत्वपदासाठी एकही नाव समोर आलेले नाही. हे संघटनेच्या दृष्टीने योग्य नाही. पक्ष हा विचार असतो. तो व्यक्तीवर अवलंबून नसतो. आज भाजपमध्ये नेत्यांची रांग आहे. अमित शहांची मुदत संपल्यावर लगेच जे पी नड्डा यांच्याकडे नेतृत्व गेले. पक्षाला काही फरक पडला नाही. मग गांधी कुटुंबियांव्यतिरीक्त नेतृत्व दिले तर पक्षाला फरक पडेले अशी भिती का वाटते? असेही गाळातच चाललो आहोत तर नव्यांना संधी देण्यास काय हरकत होती? पण पर्याय आम्हाला नको आहे.
राजस्थानात सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातली नाराजी दूर करण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधींनीच प्रयत्न केले. तेव्हा आजही काँग्रेसमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. मात्र तरीही पक्षाला विशिष्ट छत्रछायेखालून बाहेर काढण्यासाठी आणि कार्यकर्त्यांपर्यंत संदेश पोहचवण्यासाठी कधी कधी चाकोरीबाहेरील नेतृत्वाला संधी द्यावी लागते. मग ती नामधारी असली तरी हरकत नाही. याची भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांचा राजकीय इतिहास पाहिला तर अशी नामधारी नेतृत्वांची अनेक उदाहरणं देता येतील. काल आपण जी अध्यक्षांची नामावली पाहिली ती गांधी कुटुंबाशी सल्ला मसलत करूनच काम करत असेल ना? इतकेच काय सोनिया गांधींना 2004 मध्ये पंतप्रधानपदासाठी विरोध झाला. डॉ. मनमोहन सिंह यांना सोनिया गांधींनी पंतप्रधानपदासाठी संधी दिली होती. मात्र प्रत्यक्षात निर्णय सोनिया गांधींचेच असायचे अशी टीका आजही काँग्रेसवर होत असते. भारतीय जनता पक्षातही अशी अनेक उदाहरणं देता येतील. आताही अध्यक्षपद जे. पी. नड्डा यांच्याकडे असले तरी पक्षाच्या महत्त्वाचे निर्णयांवर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे वर्चस्व असल्याचे बोलले जाते. येणार्या काळात काँग्रेसचीही अशीच रणनीती असायला काही हरकत नाही. नेतृत्वहीन काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे पार पाडू शकत नसल्याची टीकाही केली जातेय. बिहार निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसला दिशाहीन राहणे परवडणारे नाही. पण पर्याय विचार करायची मानसिकता तयार होणे आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा