शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

आता अन्य विषयांकडे पहा

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याला चित्रपट कारकीर्दीत हयात असताना जेवढी प्रसिद्धी गेल्या दहा पंधरा वर्षात मिळाली नाही ती फक्त दोन महिन्यात मिळाली. म्हणजे त्याने जर आत्महत्या केली नसती किंवा त्याचा मृत्यू झाला नसता तर तो कालांतराने विस्मरणातही गेला असता. इतकी त्याची कारकीर्द कमी होती. पण त्याच्या मृत्यूनंतरच त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली. म्हणजे एका मधल्या वयातील पिढी अशी आहे की ज्यांनी आजकालचे चित्रपट पाहिले नाहीत किंवा जे टिव्ही मालिकाही पहात नाहीत, त्यांना सुशांतसिंह कोण होता हे ही माहिती नसेल. तो त्यांना समजला त्याच्या मृत्यूनंतरच. कारण त्याच्या मृत्यूचे राजकारणच इतके केले गेले  की त्याच्या निर्मात्यांनी कधी त्याच्या चित्रपटांचे प्रमोशनही इतके केले नसेल. पण आता हो प्रकरण एकदाचे सीबीआयकडे गेले आहे, त्यामुळे त्याच्यावरच्या चर्चा थांबायला काहीच हरकत नाही.

मागच्या आठवड्यात अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूची चौकशी केंद्रीय गुप्तचर विभागाकडे(सीबीआय) सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवल्याने या संदर्भातील चर्चा आता थांबायला हव्यात आणि सीबीआयलातरी मोकळेपणाने तपास करता आला पाहिजे. खरं तर त्याच्या मृत्यूचा तपास मुंबईचे पोलिस करत होतेच; पण त्याचे वडील के.के.सिंग यांनी बिहारमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल केला. त्यावर बिहारच्या राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी केंद्रीय गुप्तचर विभागाकडे सोपवण्याची शिफारस केली. त्यावरून वितंडवाद सुरु झाले. त्याला मुंबईचे पोलिस विरुद्ध बिहारचे पोलिस असा रंग मिळाला. खरं तर हा संघर्ष मुंबई पोलीस विरूद्ध बिहार असा नव्हताच. हा संघर्ष बिहारच्या आगामी निवडणुकीसाठी केलेला होता. त्यामुळे डिसेंबरमध्ये या निवडणुका पार पडल्यावर नंतर हा तपास किती काळ रखडला तरी कोणी त्याबद्दल फारसे बोलेल असे वाटत नाही. पण आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून  राजकारणातील व्यक्तींनी त्यात चढाओढीने भाग घेतल्याने सुशांतच्या मृत्यूस एक गूढतेचे वलय प्राप्त झाले. सुशांत सिंग राजपूत हा गुणी कलावंत होता. त्याच्या क्षमतेस पूर्ण न्याय मिळण्यापूर्वी त्याचे निधन झाले. त्यामुळे त्याचे नातलग, मित्र व चाहते या चौकशीतून काय निष्पन्न होते याची वाट पाहात आहेत. या संदर्भातील तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळावा म्हणून या घटनेची निष्पक्षपाती, सक्षम व योग्य चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. सुशांतची निकटवर्ती असल्याचा दावा करणार्या रिया चक्रवर्ती हिनेही हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. सुशांतचा मृत्यू धक्कादायक होता; पण त्या नंतर समाजात माजलेला गोंधळ अधिक खेदजनक आहे. खरं तर कोणाच्याच मृत्यूचे राजकारण होणे योग्य नाही. पण आपल्याकडे कोणत्याही विषयावर चर्चा होते.
   आता सुशांत सिंग गेल्या 14 जून रोजी त्याच्या निवासस्थानी मृतावस्थेत सापडला. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले; पण त्याच्या नातलगांनी विशेषत: त्याच्या वडिलांनी त्याच्या मृत्यूविषयी शंका उपस्थित केली. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्याची त्याची मानसिकता नव्हती, त्यामुळे त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा त्यांचा दावा होता. मात्र त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास मुंबईत आल्यानंतर पोलिसांकडे जबाब नोंदवताना त्यांनी तशी शंका व्यक्त केली नव्हती. सुशांतच्या शव विच्छेदन अहवालातही ती आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले होते.
  पण त्याच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध झाल्यावर लगेचच चित्रपट क्षेत्रातील काही व्यक्तींनी या क्षेत्रातील वशिलेबाजी व अन्य गैरप्रकारांमुळे सुशांतला आत्महत्या करणे भाग पडले अशा आशयाची विधाने केली. यामुळे त्याची हत्या झाल्याचा समज पसरला. समाज माध्यमांतून तो वार्याच्या वेगाने फैलावला. त्याला वायफळ वृत्तवाहिन्यांनी आणखी खतपाणी घातले. आता गेल्या दोन दिवसात सीबीआय तपास आणि त्यानिमित्ताने ज्या बातम्या देत आहेत त्यातून काय पुढे येत आहे? तर सुशांतसिंह गांजा ओढत होता, तो डिप्रेशनमध्ये होता, कोणा गर्लफ्रेंडबरोबर भांडण झाले होते, कोणी आठ जूनलाच चिडून निघून गेले होते. अशा अनेक चमत्कारीक आणि बदनामी करणार्‍या गोष्टीच आता बाहेर येताना दिसत आहेत. यातून नेमके काय सिद्ध होणार आहे हे माहिती नाही, पण मूठभर लोकांना चर्चेत राहण्यासाठी आणि राजकीय नेत्यांना आपली निष्क्रियता झाकण्यासाठी हा मसाला मिळाला आहे हे नक्की.
  टिव्हीवरच्या सीआयडी किंवा क्राईम रिपोर्ट सारख्या मालिकांमधून जसे तर्क वितर्क केले जातात तसेच काहीसे प्रकार पहायला मिळत आहेत. अर्थात हे सगळे तर्क-वितर्क आणि कुतर्क समाज माध्यमांनी व वाहिन्यांनी पसरवले. कोणी त्याच्या फार्महाउसवर काय जातो आहे, कोणी त्याच्या बँकेचे डिटेल आपल्याकडे आहेत असे सांगून टाकतो आहे. नुसता उच्छाद मांडला आहे. म्हणजे भारतात त्याच्या मृत्यूखेरीज कोणतीही महत्वाची घटना घडत नसल्याचे चित्र त्यामुळे निर्माण झाले. सुशांत हा लोकप्रिय अभिनेता असल्याने त्याच्या आत्महत्येस जास्त प्रसिद्धी मिळणे स्वाभाविक आहे. कोणाचीही आत्महत्या ही वाईटच असते. पण त्याचा जो सोशलमिडीया, वृत्तवाहिन्या आणि राजकारण्यांनी बाजार मांडला तो चीड आणणारा आहे. त्यामुळे आता सीबीआयकडे हे प्रकरण गेल्यावर तरी थोडी तोंडे बंद ठेवण्याची गरज आहे. खरं तर एका आकडेवारीनुसार संपूर्ण जगात सर्वात जास्त आत्महत्या या आपल्या देशात भारतात होतात. त्यात सर्व वयाच्या, आर्थिक स्थितीतील व्यक्तींचा समावेश आहे. 2016 मध्ये देशात 2 लाख 30 हजार 314 जणांनी आत्महत्या केली. 15 ते 39 या तरुण वयात आत्महत्या करणार्यांचे प्रमाण जास्त आहे.  अर्थात भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळे हे प्रमाणही जास्त असणार याकडेही डोळेझांक करून चालणार नाही. पण त्याची इतकी चर्चा होणे आवश्यक नसते. पोलीसांना त्यांचे काम करून द्यावे. गेलेल्या माणसाबद्दल बरे बोलावे. त्यापलिकडे त्याचे महत्व संपूर्ण तपास होईपर्यंत वाढवू नये. पण आपल्याकडे विषयाला बगल देउन नवे काही करण्याची क्षमता नसलेले लोक असे उद्योग करतात. अफवा, गॉसिपिंग, चर्चा यातून संशयाचा धूर निर्माण करायचा. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले गेलेले दिसते. आता सुशांत सिंग मृत्युप्रकरणी ज्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली त्यांना हवा तसाच निष्कर्ष निघेल असे नाही. जो निकाल येईल तो त्यांनी ’योग्य’ मानून स्वीकारला पाहिजे. त्यामुळे आता तरी या चर्चा थांबायला हरकत नाही. अन्य विषयांकडे लक्ष दिले तर बरे होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: