गेल्या सहा वर्षांमध्ये पक्षाची सतत पडझड होत असल्याची नोंद घेत 23 काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्याची गरज या नेत्यांनी पत्रात व्यक्त केल्याचे केल्याचे सांगण्यात येत आहे.
या 23 नेत्यांमध्ये काँग्रेसचे 5 माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार आणि इतर ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. या सवार्र्चा मुख्य मुद्दा काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडून काढून घेउन अन्य कोणाला तरी दिले जावे. हे नेतृत्व बिगर गांधी नेहरू यांना मिळावे अशी अपेक्षा आहे. त्यामुळे यापूर्वी गांधी नेहरू कुटुंबा व्यतिरीक्त काँग्रेसचे नेतृत्व कोणी केलेच नव्हते असे समजायचे कारण नाही. त्याचप्रमाणे हे नेतृत्व बिगर काँग्रेस नेत्याकडे गेल्यावर पक्षाची वाट लागली होती असेही नाही. म्हणूनच कोण असे नेते होते यांचाही थोडा आढावा याठिकाणी घेतला पाहिजे.राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसचे नेतृत्व हे पी व्ही नरसिंहरावर यांच्याकडे आले होते. त्यावेळी ते काँग्रेसचे अध्यक्षही होते आणि पंतप्रधानही झाले होते. अल्पमतातील सरकार त्यांनी उत्तमपणे पाच वर्ष चालवले होते. त्यामुळे बिगर काँग्रेस अध्यक्ष असू शकतो आणि झालेले आहेत हे लक्षात घेण्यास हरकत नाही.
नरसिंहराव यांच्यानंतर सोनिया गांधींचे आगमन होईपर्यंत किंवा सोनिया गांधींचा उदय होईपर्यंत हे काँग्रेसअध्यक्षपद सिताराम केसरी यांच्याकडे होते. पण काँग्रेसमधील अन्य नेत्यांना सीताराम केसरी नको होते म्हणून सोनिया लाओ देश बचाओ अशी हाक दिली गेली होती. सीताराम केसरी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भागही घेतला होता. पण त्यांना मतदान न करता पराभूत केले गेले. कारण सोनिया गांधी पक्षाला मोठे करतील असे अनेकांना वाटत होते. त्यामुळे अलिकडच्या काळातच सोनिया गांधी येण्यापूर्वी सलग दोन अध्यक्ष हे बिगर काँग्रेस होते.
त्यापूर्वी ऐन आणीबाणीच्या काळात 1975 ते 1977 मध्ये हे पद देवकांत बरुआ यांच्याकडे होते. आणखी थोडे मागे गेले तर, काँग्रेसच्या पडझडीच्या काळात म्हणजे आणीबाणीनंतर 1977 मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद हे के ब्रम्हानंद रेड्डी यांच्याकडे होते. त्यांनी ते सक्षमपणे सांभाळले होते. त्यापूर्वी 1972 ते 1974 या काळात काँग्रेस अध्यक्षपद हे डॉ. शंकर दयाल शर्मा यांच्याकडे होते. त्यानंतर ते महाराष्ट्राचे राज्यपाल ते देशाचे राष्ट्रपतीपद या पदापर्यंत पोहोचले. पण शंकर दयाल शर्मा, बरुआ, ब्रम्हानंद रेड्डी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात इंदिरा गांधी यांचा महत्वाचा काळ होता. त्यामध्ये अनेक चढउतार काँग्रेसने पाहिले आहेत. 1970-71 मध्ये बाबू जगजीवनराम हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. हा सगळा काळ इंदिरा गांधींचा ऐन उमेदीचा आणि भारतीय राजकारणातील अत्यंत महत्वाचा काळ होता. त्यामुळे बिगर गांधी अध्यक्ष काँग्रेसमध्ये झाले नाहीत असे म्हणण्यास काहीच अर्थ नाही. थोडे आणखी मागे गेलो तर नीलम संजीव रेड्डी, कामराज, एस निजलिंगप्पा हे काँग्रेस अध्यक्ष होते. म्हणजे 1960 पासून संजिव रेड्डी ते 1978 पयर्र्त सलग बिगर गांधी अध्यक्षपद काँग्रेसकडे होते. 1978 ला काँग्रेसच्या फुटीनंतर इंदिरा काँग्रेसच्या स्थापनेनंतर आणि इंदिरा काँग्रेस म्हणजेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे हे जाहीर होईपर्यंत इंदिरा गांधी, त्यांनंतर राजीव गांधी यांच्याकडे नेतृत्व गेले. पण मूळच्या काँग्रेसमध्ये बिगर गांधी अध्यक्षपद झालेले आहेत.
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा काँग्रेसचे अध्यक्षपद जयंत कृपलानी यांच्याकडे होते. त्यानंतर ते पी सितारामय्या यांच्याकडे आले. 1950 मध्ये पुरषोत्तमदास टंडन यांच्याकडे होते. त्यानंतर पंडित नेहरूंनी तीन वर्ष अध्यक्षपद सांभाळल्यानंतर इंदिरा गांधींकडे अध्यक्षपद येईपर्यंत सलग 5 वर्ष ढेबर यांच्याकडे होते.
म्हणजे बिगर नेहरू गांधी अध्यक्षपद असताना देशात काँग्रेसने राज्य केलेले आहे. पण आजकाल समज असा झाला आहे की काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले म्हणजे पंतप्रधानपदाचीच उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे मला नाही तर कोणालाच नाही. त्यापेक्षा गांधी कुटुंबाकडेच ते असावे असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटू लागले.
पण आता काँग्रेस नेत्यांनीच तशी मागणी केलेली आहे. त्याबाबतचे पत्र साधारणपणे पंधरा दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांना पाठवण्यात आले आहे. त्यावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, शशी थरुर, विवेक टंका, मुकुल वासनिक, जितिन प्रसाद, भूपिंदर सिंह हुडा, राजिंदर कौर भट्टल, वीरप्पा मोईली, पृथ्वीराज चव्हाण, पी.जे. कुरियन, रेणूका चौधरी, मिलिंद देवरा, राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह ठाकूर, अखिलेश प्रसाद सिंग, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री, संदीप दीक्षित या नेत्यांच्या सह्या आहेत.
म्हणजे जे लोक इतकेवर्ष गांधी कुटुंबियांचे दास्यत्व, तरफदारी करणे किंवा विरोधकांच्या भाषेत लाचार होते, तेच लोक आता गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला अध्यक्षपद मिळावे म्हणून मागणी करत आहेत.
काही दिवसांपुर्वी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीने काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हातात घ्यावी असं वक्तव्य काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केले होते. त्यानंतर या मागणीला जोर आला हे विशेष. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष ’गांधी परिवाराच्या बाहेरील’ व्यक्ती झाल्यास आपण त्यांच्या सूचनेचे पालन करू असंही प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या.
गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधींनी नेतृत्व स्वीकारावं यासाठी काँग्रेसचे काही नेते आग्रही आहेत. शिवाय, राहुलची ’यंग ब्रिगेड’ सतत नाराजी व्यक्त करत आहे.
अशा परिस्थितीत प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीने अध्यक्षपद हाती घ्यावे असे वक्तव्य का केले? याचा नेमका अर्थ काय? काँग्रेसचे अध्यक्षपद आता गांधी-नेहरू कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे जाणार का? इतक्या निष्ठावान नेत्यांनी त्यावर सह्या केलेल्या आहेत म्हणजे हा बदल होईल असे दिसते. म्हणूनच कोण यासाठी पात्र ठरू शकते हेही पहायला हवे. पण काँग्रेसची सत्ता असताना आणि सत्ता नसतानाही बिगर गांधी नेहरू या पक्षाचा अध्यक्ष होता हे समजले तरी आज पुष्कळ आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा