रविवार, २ ऑगस्ट, २०२०

नेतृत्व बदलाशिवाय काँग्रेसला पर्याय नाही


     कोणे एकेकाळी देशावर राज्य करणारा काँग्रेस पक्ष आता राज्यकर्ता पक्ष म्हणून परत उभारी घेउ शकणार नाही असे दिसते. कारण नेतृत्वा अभावी आणि असलेल्या नेतृत्वामुळे काँग्रेसची जी वाताहात होत आहे ते पाहता नेतृत्व बदलाशिवाय काँग्रेसला पर्याय राहिलेला नाही. एका परिवाराच्या दास्यत्वातून काँग्रेस मुक्त केली तरच मोदी शहांच्या भाजपला टक्कर देण्याची शक्ती त्यांच्यात निर्माण होईल आणि देशात सक्षम विरोधी पक्ष ते पर्यायी राज्यकर्ता पक्ष अशी त्यांची पुन्हा ख्याती होईल.
    राहुल गांधीच्या बाळबोध वक्तव्ये, अभ्यास न करता बोलण्याचा स्वभाव, पक्षातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठांचा अवमान करण्याचा स्वभाव आणि बेजबाबदार वृत्ती पाहता लोक काँग्रेसकडे पाठ फिरवत आहेत. मतदारांनी ती फिरवलीच पण आता पक्षातील जाणते, होतकरू नेतेही पाठ करत आहेत. त्यामुळे सत्तेत येणारा भाजप हा काही भाजप प्रेमामुळे मतदारांनी निवडून दिलेला पर्याय नाही. तर काँग्रेस नको, राहुल गांधींच्या नाकर्तेपणामुळे मोदींना दुसर्‍यांदा संधी मिळाली आहे. काँग्रेस पक्ष हा आपल्या घराण्याचा किंवा गांधी नेहरू परिवाराची प्रायव्हेट लिमीटेड कंपनी आहे आणि त्या कंपनीचे आपण शेअर होल्डर असा समज बाकी कार्यकर्ते नेत्यांचा असतो. हे शेअर होल्डर कधीही आपणही मुख्य पदावर पोहोचू शकतो असा विचार करत नाहीत. त्यामुळे साहजिकच या कंपनीचा शेअर आज राजकारणाच्या मार्केटमध्ये कोसळत आहे. जेंव्हा शेअर कोसळतात तेंव्हा गुंतवणूकदार, शेअर मार्केटमधले दलाल ते पडलेले शेअर खरेदी करतात. आज भाजप अशाच पडलेल्या, बाहेर फेकल्या गेलेल्या नेत्यांना आपल्याकडे खेचायचा फायदा उठवताना दिसत आहे. कारण हे आपण पळवत असलेले नेते भविष्यात कामाचे आहेत याचा विश्वास भाजपला आहे. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापासून ते सचिन पायलट यांच्यासह देशभरात तरूणांची रांग लागली आहे. आम्ही भाजपत जाणार नाही म्हणत हे नेते तिकडे जातील. या सगळ्याला कारण राहुल गांधींचे नेतृत्व हेच आहे.
 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला दोन अंकी जागा मिळाल्या. 2019च्या निवडणुकीत त्यात काही फरक झाला नाही. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची मते गोळा करण्याची ताकद संपली. 1984 सालच्या निवडणुकीत काँग्रेसपक्षाला 48 टक्के मते पडली होती. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 19.5 टक्के मते पडली. 48 टक्क्यांवरून 19.5 टक्के काँग्रेस खाली आली. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत कमी कमी होत गेली आहे. ती केवळ एका पक्षाची घसरण असती तर तिची गंभीरपणे दखल घेण्याचे काही कारण नव्हते. राजकीय पक्षांचे चढ-उतार होत असतात. आज सत्तेत असलेल्या भाजपाला 1984 साली लोकसभेत फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. म्हणून अशा चढ-उतारांची कमालीची चिंता करण्याचे कारण नसते. काँग्रेसच्या बाबतीत तेवढाच विषय नाही. पण दोन वरून म्हणजे जवळ जवळ शून्य असताना हा पक्ष इतका मोठा होतो, पण तेच उदाहरण काँग्रेसबाबत लागू होत नाही. कारण आशादायक चित्र काँग्रेसबाबत नाही. आज ज्या प्रकारे भाजप वाढत गेला, त्याचा अभ्यास सगळ्याच राजकीय पक्षांनी करण्याची गरज आहे. पण ते होत नाही. भाजपमध्ये वारंवार नेतृत्वबदल होत गेला. सामान्य माणसातले चेहरे दिले गेले. कोणतीही घराणेशाही इथे नाही. हे दिसून आले. गेल्या दहा वर्षात भाजपचे नेतृत्व नितीन गडकरी, अमित शहा, जे पी नड्डा अशा अनेकांनी केेले. त्यापूर्वीही ते राजनाथसिंह, अडवाणी, वाजपेयी, व्यंकय्या नायडू, हशू अडवाणी अशा कितीतरी जणांनी केले. वर्षानुवर्षे दशकानुदशके एकाच घरातील कोणीही या पक्षात दिसत नाही. पण काँग्रेस ते करू शकला नाही. जोपर्यंत काँग्रेसमध्ये कर्तबगार नेते होते तोपर्यंत घराण्याचा सन्मान केला. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी इतपर्यंत ठिक होते. पण त्यानंतर काँग्रेस गाळात जाउ लागली. जेंव्हा राजीव गांधींच्या निधनानंतर ते बिगर गांधी नेहरू घराण्याकडे आले तेंव्हा पुन्हा काँग्रेसला संधी मिळाली. पण काँग्रेसच्या लाचार नेत्यांनी गांधी या नावाशिवाय पर्याय नाही असे जनतेवर बिंबवण्याचा प्रयत्न केला आणि सोनिया लाओ देश बचाओ अशी हाक दिली. देश कसला वाचवतायत? यांना काँग्रेस वाचवायची होती. सोनिया लाओ काँग्रेस बचाओ अशीच ती हाक होती. पण तरीही त्या नको नको म्हणत असताना अन्य कोणाला संधी मिळू नये म्हणून अंतर्गत गटबाजीने सोनिया गांधींवर नेतृत्व लादले. तिथेच काँग्रेसच्या महापतनाला सुरूवात झाली. शरद पवार, माधवराव शिंदे, जगदीेश पायलट असे कितीतरी तरूण, अनुभवी नेते काँग्रेसमध्ये असताना त्यांना नाकारले गेले. आज तोच प्रकार राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधी पराभूत झाल्यावर जवळपास तीन महिने काँग्रेस नेतृत्वहिन होती. शेवटी ते नेतृत्व पुन्हा सोनिया गांधींकडे दिले गेले. पण कोणाही अन्य कर्तबगार व्यक्तिला दिले गेले नाही. याचे कारण काँग्रेसमध्ये कायम गटतट असतात. काँग्रेसमध्ये अतीसोनिया, राहुलनिष्ठांचा एक फार मोठा गट आहे. यात पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्रातले तर अशोक गेहलोत राजस्थानात, कमलनाथ मध्यप्रदेश असे प्रत्येक राज्यात नेते आहेत. ते पक्षहितापेक्षा गांधी कुटुंबाची आपल्यावर मेहेरनजर राहिल यासाठी धडपडत असतात. त्यांना देशाशी, पक्षाशी काहीही पडलेले नसते. ते नेते पक्षातील होतकरु तरूणांच्या हातात कसलेही अधिकार जाउ देत नाहीत. त्यामुळे काँग्रेस कायम गांधी परिवाराशिवाय नेतृत्वहिन राहिली आहे. परंतु जोपर्यंत काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल होत नाही तोपर्यंत भाजपला कोणताही पर्याय तयार होउ शकत नाही. आघाडी करण्याचा पर्याय असला तरी पंतप्रधानपदाचा उमेदवार बिगर काँग्रेस असणार नाही. अशा परिस्थिती आपल्याला भाजप सरकारला शह द्यायचा असेल देवेगौडांसारखे एखादे सरकार येईलही पण ते अस्थिर असेल. त्याचे नेतृत्व करणारे मग अगदी आठ दहा खासदारांचा पक्षही असू शकतो. पण भाजप जसा सर्व राज्यात पसरलेला पक्ष आहे तसा फक्त काँग्रेस होता. त्यामुळे सक्षम पर्याय देण्याची ताकद काँग्रेसमध्ये असताना अंतर्गत गटबाजीमुळे आणि चुकीच्या हाती नेतृत्व असल्यामुळे जोपर्यत नेतृत्व बदल होत नाही तोपर्यत काँग्रेसला भविष्य नाही हे नक्की आहे.
  काँग्रेस हा भारताच्या खेडोपाडी पोहचलेला, अखिल भारतीय स्वरूप असलेलाकाँग्रेस हा पक्ष आहे. भाजपा सोडून अन्य सगळे पक्ष प्रादेशिक पक्ष आहेत. देशाची सत्ता चालवायची असेल तर पक्ष देशव्यापी हवा. प्रादेशिक पक्षाचे हे काम नव्हे. त्यामुळे प्रादेशिक पातळीवर दुबळा असलेला आणि राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वहिन असलेला पक्ष अशी आज काँग्रेसची अवस्था आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: