गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

आपले महत्व वाढवण्यासाठी


   काही काही लोक आपले महत्व वाढवण्यासाठी काहीही बोलत असतात. अशा बोलबचन नेत्यांमुळे पक्षाची प्रसिद्धी आणि पक्ष चर्चेत राहतो. त्यामुळे पक्षातील आपले महत्व वाढते असे अनेकांना वाटते. तोच प्रकार सोमवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. राहुल गांधी यांनाच पक्षाचे अध्यक्ष करावे, त्यांनी सांगितले तर महाराष्ट्रातील सरकारमधूनही बाहेर पडू, असे वक्तव्य त्यांनी केले. आता पक्षाच्या अध्यक्षपदाचा, पक्षाला नेतृत्व नसण्याच्या समस्येचा आणि राज्यातील सत्तेतून बाहेर पडण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. पक्षाचे नेतृत्व कोणी करावे यावरून काही जाणकार जुन्या निष्ठावान अनुभवी नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहीले. त्यावरून बैठक आयोजीत केली. हा सर्वस्वी पक्षाचा अंतर्गत प्रश्न होता. त्याचा सरकारमधून बाहेर पडण्याचा काहीच संबंध नव्हता. पण वडेट्टीवार यांनी तसे वक्तव्य केले. त्यामुळे हा इशारा शिवसेनेेला होता, राष्ट्रवादीला होता. तसेच महाविकास आघाडीत काँग्रेसला दुय्यम स्थान असल्याचे वाटत असल्यामुळे आपले महत्व वाढवण्याचा तो प्रयत्न होता.
  राज्यातील काँग्रेस सत्तेतून बाहेर पडले तरी हे सरकार कोसळेल असे वाटत नाही. कारण आजच्या घडीला सरकार चालवावे असे कोणालाच वाटत नाही. कोरोनामध्ये सध्या राज्याची धुरा ही प्रशासनाकडे आहे. तसेच या परिस्थितीत 105 संख्याबळावर भाजप हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे जर सरकार अल्पमतात आले तर भाजप मतदानात भाग न घेता हे सरकार तारेल. प्रसंगी पुन्हा शिवसेनेला पाठिंबा देईल, पण काँग्रेसमुळे सरकार पाडण्याची संधी देणार नाही. कारण त्यामुळे काँग्रेसचे महत्व वाढेल. पूर्वी जो प्रकार काँग्रेस करत होती, तोच प्रकार भाजप केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे काँग्रेस सरकारमधून बाहेर पडल्यामुळे महाविकास आघाडीला काहीही फरक पडणार नाही.
    सध्या महाविकास आघाडीत काँग्रेसची नाराजी वाढत चालल्याचे दिसून येते. एका बाजूला काँग्रेसला डावलण्यात येत असल्याचा आरोप आता जाहीरपणे काँग्रेस आमदारांकडून केला जात आहे. तर दुसर्‍या बाजूला राहुल गांधींनी सांगितले तर सरकारमधून बाहेर पडू असे विधान मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. म्हणजे संधीचा फायदा उठवण्याचा हा प्रकार आहे.
  नगर विकास खात्याकडून काँग्रेस आमदारांना जाणीवपूर्वक निधी दिला जात नसल्याचा आरोप नुकताच काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला होता. याप्रकरणी 11 आमदार नाराज असून उपोषण करू असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर अजितदादांनी या सर्व आमदारांना समजावले आणि नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसचा सध्याचा अजंडा हा सत्तेचा फायदा घेणे आणि विरोधकांची भूमिकाही करणे असा आहे. जे फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना करत होती, तेच आज काँग्रेस करत आहे. सत्तेत आहेपण आणि नाहीपण अशी अवस्था त्यांची झालेली आहे. पण त्यामुळे या सरकारला काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे शिवसेना काँग्रेसला कुरवाळत बसणार नाही. त्यांनी राष्ट्रवादीशी दोस्ती इतकी भक्कम केली आहे की तो फेविकॉलचा जोड आता दीर्घकाण सेना भाजपप्रमाणे राहील असे दिसते.
  सहकारी पक्ष शिवसेनेविषयी काँग्रेसकडून जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्यात आल्याची ही पहिलीच घटना नाही. विधानपरिषद निवडणुकीतील जागावाटप, अधिकार्‍यांच्या नियुक्त्या-बदल्यांचे निर्णय, श्रेय वाद, कोरोनासंबंधीचे निर्णय अशा अनेक मुद्द्यांवरून तिन्ही पक्षांमध्ये सातत्याने कुरबुरी दिसून येत आहेत. यामध्ये सेना राष्ट्रवादी एकीकडे तर काँग्रेस अंधारात अशी परिस्थिती होती. पण त्यामुळेच काँग्रेस अस्वस्थ झाली. बाळासाहेब थोरातांपासून अशोक चव्हाणांपर्यंत, पृथ्वीराज चव्हाणांपासून वडेट्टीवारांपर्यंत सर्वांनी आपल्याला सरकारमध्ये स्थान नसल्याचे वेगवेगळ्या प्रकारे बोलून दाखवले. पण त्यातील कोणीही दखलपात्र ठरले नाही. सेना राष्ट्रवादीने त्यांना फारसे महत्वही दिले नाही. त्यामुळे आता काँग्रेसला आपले महत्व वाढवण्याची ओढ लागली आहे. आपले उपद्रव मुल्य दाखवण्याची गरज वाटू लागली आहे. या न्यूसन्स पॉवरचा वापर करून सरकारला दणका देण्यासाठी काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी देणे, उपोषणाचा इशारा देणे वगैरे प्रकार आहेत.
  पण त्यामुळे ठाकरे सरकार अस्थिर होईल का? असा प्रश्न कोणाला पडला तर त्याचे उत्तर नाही हेच असेल. सत्तेत असूनही काँग्रेस अस्वस्थ का आहे? तर नेतृत्वावर विश्वास नसणे आणि ते कमकुवत असल्याने अस्थिरता वाटणे हे दुखणे काँग्रेसचे आहे. त्यामुळे कुठला तरी राग कुठेतरी काढायचा हा प्रकार आता त्यांना करावा लागणार आहे. सतत चर्चेत राहिल्याने आपण जिवंत आहोत, शिल्लक आहोत हे दाखवावे लागणार आहे. त्यामुळेच दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे काँग्रेस नेते सत्तेत राहण्याबाबत शंका उपस्थित करताना दिसतात. काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल का? काँग्रेसच्या नाराजी सत्रामुळे शिवसेनेसमोर नवे आव्हान उभे आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण त्याचे उत्तर काहीही परिणाम होणार नाही. सरकार व्यवस्थित तरेल हेच आहे.
 हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसमधले मतभेद वारंवार चव्हाट्यावर येत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल असल्याचे कितीही दावे केले जात असले तरी प्रत्यक्ष लपून राहिलेली नाही. पण काँग्रेसला बेदखल करण्याचे तंत्र सेनेने चांगल्याप्रकारे सांभाळले आहे. सेना राष्ट्रवादी ते तंत्र बरोबर हाताळत आहेत. त्यामुळे सरकारला काहीही फरक पडत नाही.
   नगर विकास खात्याच्या असमान निधी वाटपावरुन नाराज असलेल्या काँग्रेसच्या 11 आमदारांची नाराजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीनंतर दूर झाल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले.  आमच्यासह मित्रपक्षातले आमदारही नाराज आहेत. काही पक्षातील आमदारांना जास्त निधी मिळाला आहे. मी त्या पक्षाचे नाव घेणार नाही. असा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे, पण हे सर्व आपले महत्व वाढवण्यासाठी आणि  अस्तित्व दाखवण्याचे प्रयत्न आहेत. महाविकास आघाडीत सहभाग घेण्यासाठी आग्रही असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना सर्व घडामोडींपासून कमालीचे दूर ठेवण्यात आले आहे. काँग्रेसमुळे सत्ता स्थापन शक्य झाले आहे. पण काँग्रेसला आपल्या या ताकदीचा पूर्ण वापर करता आलेला नाही. त्यामुळे आपले महत्व वाढवण्याचे काम काँग्रेसला करावे लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: