शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

कालानुरूप बदललेला गणेशोत्सव

   गणेशोत्सव हा सर्वांना आनंद देणारा असा उत्सव आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सवार्र्ना आवडणारा आणि आनंद देणारा असा गणपती असतो. त्याचा उत्सव करताना सर्वच लोक खूष होत असतात. विशेष म्हणजे कालानुरूप बदल करणे हे गणेशोत्सवाचे वैशिष्ठ्य आहे. त्यामुळे जेंव्हा केंव्हा गणेशोत्सव सुरू झाला तेंव्हाचे त्याचे स्वरूप नक्की कसे होते हे सांगणेही अवघड आहे. आजकाल कोणाला ते माहितीही नाही. पण गणपती आणि मोदक हे दोन आनंद देणारे घटक मात्र कायम राहिलेले आहेत.

    कधी काळी बोलले जात होते की हे, गाणपत्य संप्रदायाचे हे एक व्रत आहे. आपल्याकडे जे मूळ संप्रदाय आहेत त्यामध्ये शैव, वैष्णव, शाक्त्य आणि गाणपत्य असे आहेत. शैव लोक शिवाची पूजा करतात, वैष्णव विष्णूची, शाक्त देवीची तर गाणपत्य संप्रदायातील लोक गणपतीची पूजा करतात. परंतु या सर्वच संप्रदायांची युती किंवा महाआघाडी असल्याने सर्व देवांची पूजा वेळेनुसार सगळे करतात. प्रत्येकाचा उत्सव केला जातो. शंकराची महाशिवारात्री केली जाते, विष्णूची एकादशी केली जाते, देवीचे नवरात्र केले जाते तसेच गणपतीची गणेश चतुर्थी केली केली जाते.
   मूळ धारणेनुसार श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जाऊन, स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून .तिचा 1 मित्र आहे एक चुहा नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे.
   गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन,स्नान,अभिषेक,वस्त्र,चंदन,फुले,पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते, यालाच षोडशोपचार पूा असे म्हणतात.  यामध्ये त्याला विविध 21 पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यत: उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत. तसेच मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात.
 काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड, पाच,सात, दहा दिवस केले जाते. काही कुटुंबात 21 दिवस हे व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते. हा झाला कुळाचाराचा विचार. पण गणेशाची मुख्य भूमिका काय आहे ते समजून घेणे आवश्यक आहे.
     मूळात गणपती ही संघटनेची देवता आहे. ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. म्हणूनच लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांविरोधात जनतेला संघटीत करण्यासाठी या उत्सवाची निवड केली. खरे तर अनेक सण आणि उत्सव होते. पण गणेशाचा उत्सव करण्याचे कारण हे होते की, गणेश हा शास्त्रानुसार संघटनेचा देव आहे. म्हणूनच लोकमान्यांनी त्याला सार्वजनिक स्वरूप दिले. हे गणेशोत्सवाचे बदललेले महत्वाचे पाउल होते.
  भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी 1894 साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते गणपतीबाप्पांचे स्वागत कसे करावे, कोणता देखावा उभारावा, कोणत्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, कोणत्या स्पर्धा घ्याव्यात, व्याख्यानाला कुणाला निमंत्रण द्यावे या विचारात दंग असतात. याचे कारणच संघटनात्मक काम उभे रहावे हे आहे. पूर्वी पक्षबांधणीसाठी आपली प्रत्येक भागात शाखा असावी. कार्यकर्ते असावेत असा विचार केला जायचा. स्थानिक नेतृत्व हे संघटनेच्या दृष्टीने महत्वाचे असते. अशा स्थानिक नेत्यांना संधी देण्यासाठी गणेशोत्सव मंडळांना राजकीय स्वरूप आले. त्यामुळे बहुतेक गणेशोत्सव मंडळांवर विविध राजकीय पक्षांचा पगडा दिसून येतो. कोणत्या पेठेत, वॉर्ड, प्रभागात किती गणेशोत्सव मंडळे आहेत यावर राजकीय पक्षांची ताकद ठरत असते. गावपातळीवरही तसेच घडत असते. त्यामुळे गणेशोत्सव हा पक्षबांधणीचा एक भाग बनत गेला. त्यामुळे गणेशोत्सवात स्थानिक नेतृत्वाचा फोटो, कार्याचे बॅनर लावणे असले प्रचारकी प्रकार अस्तित्वात आले. संघटनेचा फायदा अशा प्रकारे करण्याची प्रथा सुरू झाली.
    गणेशोत्सवाचे निमित्ताने राजकीय संघटनात्मक काम होते तसेच ते कलाप्रांतातही होत असते. विविध संस्था, भजनीमंडळे, वाद्यवृंद, ऑर्केस्ट्रा, नाटककंपन्या यांना आणि त्यांच्या माध्यमातून कलाकारांना संधी मिळत असते. त्यामुळे गणेशोत्सवात कोणते नाटक करायचे, कोणता कार्यक्रम करायचा याच्या महिनोंनमहिने अगोदर तयारी सुरू असते. कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारा हा उत्सव असतो. म्हणून गणेशोत्सव हा सर्वांना प्रिय असा उत्सव आहे.
  संघटनेच्या माध्यमातून शक्ती, भक्ती आणि युक्तीचे प्रदर्शन केले जाते. आपल्याकडे पुण्यातील  पुणे फेस्टिवल, गणेशा फेस्टीवल हे बॉलीवूडपासून ते आंतरराष्ट्रीय कलाकारांना संधी निर्माण करून देत असतात.
  गणेशोत्सव हा संघटनात्मक आहे तशीच ती एक कार्यशाळा असते. गायन, वादन, वक्तृत्व याला या उत्सवात चालना मिळते. यातून अभिनेते, नेते, कार्यकर्ते घडत असतात. त्यामुळे कालानुरूप यात सतत बदल घडत असतात. राजकीय सामाजिक बदल जसे घडतात त्याचे प्रतिबिंब दरवर्षीच गणेशोत्सवावर होत असते. यावर्षी कोरोनाचा पगडा या उत्सवावर आहे. दरवर्षी त्या त्या काळात घडलेल्या चांगल्या वाईट घटकांचा परिणाम या उत्सवात दिसून येत असतो. कालानुरूप बदल हे या उत्सवाचे वैशिष्ठ्य आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: