शनिवार, २३ जून, २०१८

काँग्रे्रसला प्रादेशिक पक्षांचा ‘आधार’

काँग्रेस ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वात कमी जागा लढवण्याच्या मनस्थितीत आहे. एकहाती सत्ता मिळवण्याच्या मानसिकतेतून काँग्रेस आता आघाडीच्या मानसिकतेत परावर्तीत झालेली आहे. त्यामुळे आतापर्यंत लढवत असलेल्या जागांपैकी निम्म्यापेक्षा जास्त जागा मित्र पक्षांना देण्याची तयारी काँग्रेसने केलेली आहे. लढवलेल्या जागांच्या प्रमाणात यश प्राप्त झाले नाही तर यशाची टक्केवारी आणि पक्षाच्या अस्तित्वाची भिती निर्माण होते. राष्टÑीय पातळीवरील पक्ष अशी प्रतिमा असलेल्या पक्षाची ताकद आज एखाद्या प्रादेशिक पक्षाच्या एवढीच असल्यामुळे अस्तित्वासाठी आता काँग्रे्रसला ही तडजोड करावी लागत आहे. प्रादेशिक पक्षांची शिडी लावून काँग्रेस आता सत्तेची स्वप्न साकार करणार का याचे उत्तर आता लोकसभा निवडणुकीनंतरच मिळेल.
काँग्रेसने २०१४ च्या १६ व्या लोकसभा निवडणुकीतील ‘न भूतो न भविष्यती’ अशा अपयशानंतर २०१९ ला परिस्थिती सुधारण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे भाजप विरोधी मतांची एकजूट करणे. ही एकजूट करताना पाहिजे ती तडजोड करण्याची मानसिकता काँग्रेसने केलेली आहे. याचे कारण सत्तेपासून दूर गेल्यामुळे काँग्रेसचे फार मोठे नुकसान झालेले आहे. निवडणुका आणि राजकारण हाच धंदा असलेले काँग्रेस कार्यकर्ते, नेते, विचारवंत, वक्ते, प्रवक्ते अक्षरश: बेरोजगार झालेले आहेत. एखादा कारखाना बंद पडावा आणि हजारो कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळावी त्याप्रमाणे काँग्रेसवर बेकारीची पाळीच चार वर्षांपूर्वी आली आहे. त्यातील काहींनी नवीन पक्षात जाऊन, तडजोडी करून नवे जॉब मिळवले. पण तरीही कार्यकर्ते आणि नेत्यांची मोठी फौज आज प्रतिक्षेत आहे. त्यांच्यासाठी आता काँग्रेसला आपला लोकशाही नामक भांडवली व्यवसाय पुन्हा सुरु करावाच लागेल. त्यामुळे अवसायनात निघालेल्या कंपनीप्रमाणे आता तडजोडीचे राजकारण करत काँग्रेस आपले अस्तित्व दाखवून देण्यास सिद्ध झालेली आहे.या तडजोडीचाच एक भाग म्हणून काँग्रेसने विविध ११ राज्यांमध्ये २१ प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडी करण्याची तयारी केलेली आहे. काँग्रेसने तयार केलेल्या या फॉर्म्युल्यामुळे म्हणजे या आघाडीमुळे काँग्रेसला मतांमध्ये ८० टक्क्यांपर्यंत फायद्याची अपेक्षा केली आहे. यासाठी काँग्रेसकडून स्वातंत्र्यानंतर प्रथमच लोकसभेच्या सर्वात कमी जागा म्हणजे फक्त २५० जागा लढवल्या जाण्याची तयारी आहे. मित्र पक्षांशी जागावाटपात तडजोड करून आत्ताची ४४ जागा ही दयनीय अवस्था संपवून पुन्हा तीन अंकी आकडा गाठण्यासाठी आणि आघाडीतील मोठा पक्ष म्हणून नेतृत्व करण्याचे काँग्रेसचे स्वप्न आहे. या महाआघाडीच्या माध्यमातून मोदींना रोखण्यासाठी दोन पावले मागे येण्याची काँग्रेसची तयारी झाली आहे. त्यासाठी काँग्रेसने ब्लू प्रिंट तयार केली आहे. त्यावर स्थानिक पातळीवरील रिपोर्ट आल्यानंतर अँटनी कमिटी आणि काँग्रेस अध्यक्षांच्या सल्ल्यानुसार अंतिम निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस म्हणत असली तरी सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी याशिवाय काँग्रेसला पर्याय उरलेला नाही. थोडक्यात काँग्रेस भाजपच्या वाटेने आणि भाजप काँग्रेसच्या वाटेने जाताना दिसत आहे. एखादी वेल वाढवायची असेल तर मोठ्या झाडाचा आसरा घ्यावा लागतो, मोठी भिंत असेल तरी चालते. भाजपने गेल्या ३० वर्षांत तसेच केले. वेलीवरच्या रातराणीचा सुगंध दूरवर पसरतो आणि नावही रातराणीचे होते आधाराच्या झाडाकडे, भिंतीकडे कोणी लक्ष देत नाही. हाच फॉर्म्युला वापरून आपले इप्सित साध्य करण्याचे काम काँग्रेस करण्याची शक्यता आहे. तर काही प्रमाणात एकाधिकारशाहीतून भाजप काँग्रेसची जुनी मळलेली वाट पकडत आहे. या दोन मार्गावरील हे दोन पक्ष कोणती वाट रुंद करतात यावर आगामी लोकशाहीचे भवितव्य आहे. पण काँग्रेसने तडजोडीचा आणि मजबूत आघाडीचा मार्ग स्वीकारला आहे हे निश्चित.मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळाल्या होत्या अवघ्या ४४ जागा. काँग्रेसच्या रणनीतीनुसार गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या ४४ जागा ते कोणालाही देणार नाहीत. इतर जागांवर ते आघाडी करतील. पण ज्या २२४ जागांवर काँग्रेस उमेदवार दुसºया क्रमांकावर होते, त्या जागा लढवण्यासाठी जोर लावतील. त्यात मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातसारख्या राज्यांचा समावेश आहे. याठिकाणी भाजपविरोधात काँग्रेसच मोठा पक्ष आहे. जर आघाडीत अडचणी आल्या तर प्रादेशिक पक्षांना विधानसभेत मोठा वाटा देऊन लोकसभा २०१९ साठीचा करार ठरू शकतो. काँग्रेस यासाठी लवकरच प्रत्येक राज्यांमध्ये समित्या स्थापन करून प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडीच्या चर्चा करणार आहे. याप्रमाणे ११ अशी राज्ये आहेत, ज्याठिकाणी काँग्रेस लहान मोठ्या २१ प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडी करण्यास तयार आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे काँग्रेसला तृणमूल काँग्रेस साथ देईलच, पण तेथील डाव्या पक्षांचीही ताकद बरी असल्यामुळे काँग्रेसला तृणमूल की डावे याबाबत विचार करावा लागेल. यामध्ये काँग्रेसने कोणाचीही निवड केली तरी अन्य दुसरा पक्ष भाजपला साथ देणार नाही हे तितकेच निश्चित असल्यामुळे काँग्रेस याठिकाणी निश्चिंत असेल. कर्नाटकात सध्या काँग्रेस-जेडीएस बरोबर आहेत. इथे दबावाचे तंत्र वापरूनच काँग्रेस आपले लक्ष साध्य करणार यात शंका नाही. पण इथे जेडीएस बरोबर बहुजन समाज पक्षही आहे. या पक्षाच्या नेत्या मायावतींनी आपला पक्ष काँग्रेस आघाडीत जाणार नाही असेही जाहीर केलेले आहे. कारण आपला ‘यूज अँड थ्रो’ व्हावा असे मायावतींना वाटत नाही. पण कर्नाटकातील बसपची काँग्रेसला चिंता नाही. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये टीडीपी सध्या भाजपतून बाहेर आहे. टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसची मते महाआघाडीत समाविष्ट केली आहेत. त्यांना काँग्रेसने गृहीत धरलेले आहे. मात्र आसाममध्ये काँग्रेसने एआईयूडीएफशी आघाडी केली तरच टिकाव लागू शकेल. नाहीतर तिथे काँग्रेसला संधी नाही. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना वेगळे झाले तरच महाआघाडीची शक्यता निर्माण होऊ शकते. याबाबत युती तुटते कधी याकडे काँग्रेस, राष्टÑवादी हे दोन्ही पक्ष डोळे ठेवून आहेत. पण राष्टÑवादीला बरोबर घेऊनच काँग्रेसला महाराष्टÑात जावे लागेल. तमिळनाडूमध्ये भाजप-अण्णाद्रमुकबरोबर असल्याचे सध्या तरी दिसते आहे. पण अण्णाद्रमुकमध्येच फूट पडलेली आहे. रजनीकांत, कमल हसन यांची राजकीय ताकद म्हणण्यापेक्षा लोकप्रियता याचा लाभ कोण घेऊ शकतो यावर पुढचे गणित ठरेल. परंतु त्यामुळे डीएमके आणि इतर पक्षांना फायदा होऊ शकतो. ओडिशात सत्ताधारी बीजू जनता दल कोणाच्याही बाजुने नाही. भाजप त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू शकत नाही. त्याचा फायदा काँग्रेस घेणार हे निश्चित.येणाºया लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने फार मोठी तडजोड करून आपल्या जागा इतरांना देण्याचे धोरण आखलेले आहे. यासाठी आजपर्यंतच्या इतिहासात लोकसभेला काँग्रेसने किती जागा लढवल्या होत्या आणि आज काय परिस्थिती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. काँग्रेसला पहिला झटका स्वातंत्र्याच्या ३० वर्षानंतर म्हणजे १९७७ ला बसला होता. त्यानंतर दुसरा झटका १९८९ आणि नंतर १९९५ ला बसला. पण १९९५-९६ नंतर काँग्रेसला स्वबळ किंवा एकहाती सत्तेचा अट्टाहास सोडावा लागला आणि भारतीय लोकशाहीने स्वीकारलेल्या आघाडीचा फॉर्म्युला मान्य करावा लागला. परिणामी २००४ ला संयुक्त पुरोगामी आघाडीच्या माध्यमातून सत्तेत येता आले. पण १० वर्षांच्या युपीएच्या या कारभारातील अनागोंदीमुळे काँग्रेसला नाकारणारी लाट निर्माण झाली. त्या लाटेला मोदीलाट असे नाव दिले गेले असले तरी काँग्रेसला नाकारण्यासाठी म्हणून मोदींना यश मिळाले होते हाही त्याचा दुसरा अर्थ समजून घेतला पाहिजे. आता त्याचप्रमाणे मोदींना नाकारण्यासाठी काँग्रेसने महाआघाडी करण्याचे धोरण आखून काँग्रेसने आपल्या जागा अन्य पक्षांना देऊन थोड्या फरकाने गेलेल्या आपल्या दुसºया क्रमांकावरील जागा वाचवण्याचा हा नवा फॉर्म्युला निर्माण केला आहे. ही काँग्रेसची उतरती कळा असली तरी सध्याच्या परिस्थितीत चढती भाजणी दाखवणारा तो एकमेव मार्ग आहे.

काँग्रेसचा आलेख

लोकसभेच्या १९५१-५२ च्या निवडणुका पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने लढवल्या होत्या. त्यावेळी लोकसभेसाठी ४८९ जागांवर काँग्रेसने उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ३६४ उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने ४९४ जागा लढवत ३७१ जागांवर विजय मिळवत घवघवीत यश प्राप्त केले होते. त्यानंतर मात्र काँग्रेसला थोडीफार चढउतार पहावा लागला.१९६२ ची निवडणूक ही तिसºयांना पंडित नेहरुंच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने लढवली होती. त्यावेळी काँग्रेसने ४९४ जागांपैकी ३६१ जागी विजय मिळवला, पण ५७ च्या तुलनेत काँग्रेसला १० जागा गमवाव्या लागल्या होत्या. स्वातंत्र्यापासून पंडित नेहरु हे देशाचे पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्या हातात सत्तेची सूत्र होती, त्याचा फायदा घेत त्यांना यश मिळाले होते. लोकसभेची १९६७ ची निवडणूक ही खºया अर्थाने बदल घडविणारी आणि काँग्रेसला झटका देणारी निवडणूक होती. नेहरुंची कन्या म्हणून वारसाहक्काने आलेल्या इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखालील ही निवडणूक होती. पक्षांतर्गत गटबाजीचा परिणाम झाल्याने काँग्रेसला या निवडणुकीत मोठा फटका बसला असली तरी पूर्ण बहुमत मिळवण्यात यश आले होते. या निवडणुकीत काँग्रेसने ५२० जागा लढवल्या, त्यापैकी २८३ इतके उमेदवार विजयी झाले आणि सत्ता राखली होती.इंदिरा गांधींनी १९७१ च्या निवडणुकीवर पूर्णपणे पकड घेतलेली होती. पक्षांतर्गत गटबाजी मोडून काढत पुन्हा काँग्रेसची ताकद वाढवली होती. यावेळी ५१८ जागा लढवून इंदिरा गांधींच्या काँग्रेसने ३५२ जागांवर यश मिळवले होते. इथंपर्यंत काँग्रेसच्या एकछत्री सरंजामशाहीचा इतिहास होता.मात्र या सरंजामशाहीला दणका बसला तो १९७७ च्या निवडणुकीत. इंदिरा गांधींची काळी कारकीर्द म्हणून ओळख असलेल्या आणीबाणीचा डाग काँग्रेसला लागला होता. या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधींना नाकारण्यासाठी जनमत तयार झालेले होते. फक्त त्यांच्याजागी कोण असा प्रश्न होता. तो जनता पक्षाने सोडवला आणि इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखालील गाय- वासराच्या काँग्रेसला भारतीय लोकशाहीने आता बस्स झाले म्हणून थांबवले. ५४२ जागा लढवून काँग्रेसला फक्त १५४ जागांवर विजय मिळवता आला. काँग्रेसला प्रथमच सत्तेतून बाहेर जावे लागले.१९८० साली जनता पक्षाच्या आत्मघातकी आणि परस्परविरोधी मतांच्या नेत्यांच्या कडबोळ्यामुळे अल्पकाळचे सरकार ठरले. त्यामुळे पुन्हा इंदिरा गांधीनी इंदिरा काँग्रेस नावाने स्थापन केलेल्या आणि नंतर हाच मूळचा काँग्रेस पक्ष असल्याचे शिक्कामोर्तब करून घेतलेल्या पक्षाने पुनरागमन केले. यावेळी पुन्हा ५४२ जागा लढवून इंदिरा काँग्रेसने ३५३ जागांवर यश मिळवले. १९८४ ला मात्र इंदिरा गांधींच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने घेतला आणि ५४२ पैकी ४१५ जागांवर विजय मिळवत पाशवी बहुमत मिळवले, ते पुढे टिकवता आले नाही हा भाग वेगळा. १९८९ ला काँग्रेसने पुन्हा ५४२ जागा लढवून फक्त १९७ जागांवर विजय मिळवला आणि सत्ता गमावली. पण भाजपच्या पाठिंब्यावर असलेले जनता दलाचे हे सरकारही अल्पकाळच टिकले. त्यामुळे १९९१ ला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे संख्याबळ वाढले असले तरी त्याला राजीव गांधींच्या हत्येच्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा मिळाला होता. तरीही स्पष्ट बहुमत नसतानाही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आले. यावेळी ५४५ जागांवर निवडणुका लढवत काँग्रेसने २४४ जागांवर विजय मिळवला होता.ही उतरती कळा तशीच कायम राहिली. त्यानंतर १९९६ साली ५४५ जागा लढवून काँग्रेसने १४० जागा जिंकल्या. १९९८ ला ५४५ जागा लढवून काँग्रेसने १४१ जागा जिंकल्या. १९९९ ला ५४३ उमेदवार देऊन काँग्रेसने १३९ जागा मित्रपक्षांसह जिंकल्या होत्या. २००४ मध्ये आघाडी करून काँग्रेसने ४०० जागा लढवल्या आणि त्यापैकी १४५ जागा जिंकल्या. आघाडीतील मोठा पक्ष ठरून काँग्रेसने युपीए १ हे सरकार स्थापन केले. या निवडणुकीत सोनिया गांधींचा चेहरा होता, तर २००९ च्या निवडणुका या पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या चेहºयामुळे लढवल्या आणि पुन्हा ४०० जागा लढवून काँग्रेसने २०५ जागांवर विजय मिळवला होता. पण काँग्रसने ४०० पेक्षा कमी जागा कधी लढवल्या नव्हत्या आणि १३९ पेक्षा कमी जागा कधी जिंकल्या नव्हत्या. पण २०१४ ला राहुल गांधी हा चेहरा समोर आणून निवडणुका लढवल्या गेल्या अन् काँग्रेस तीन अंकी आकडा गाठू शकली नाही. ४६२ जागा लढवून अवघ्या ४४ जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे काँग्रेसला आता २५० जागा लढवून त्यामध्ये जास्त जागा जिंकण्याचे धोरण आखावे लागत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: