मंगळवार, २२ मार्च, २०१६

कुबेराला वैचारिक दारिद्य्र

  • कालच्या ‘लोकसत्ता’मध्ये एक छोटी चौकट टाकून संपादक गिरीश कुबेर यांनी आपला अग्रलेख मागे घेतला आहे. कोणत्याही संपादकावर अशी नामुष्की येणे ही अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी आहे. त्याचप्रमाणे कसल्या तरी दबावाला बळी पडून कुबेरांनी अग्रलेख मागे घेतला, हे कुबेरांचे वैचारिक दारिद्य्र म्हणावे लागेल. कुबेराला कधी दारिद्य्र्र येत नाही असे आपल्या संस्कृतीत म्हटले जात असले तरी वैचारिक दारिद्य्र्र येवू शकते, हे या घटनेवरून दिसून आले आहे. त्याचप्रमाणे मराठी वृत्तपत्रसृष्टीत कोणत्याही संपादकाला आपला अग्रलेख मागे घेण्याची वेळ येणे, हा एक नवा काळा इतिहास म्हणावा लागेल. पण हे नेमके कशामुळे झाले याचाही अभ्यास करण्याची गरज आहे.
  • ज्या हिंदू धर्मातील असहिष्णूतेबद्दल सर्व अहिंदू लोक तावातावाने बोलतात, प्रसार माध्यमांवर तावातावाने बोलतात, त्या अहिंदू लोकांच्या असहिष्णूतेचे काय? असा प्रश्‍न आज कोणीही विचारत नाही. सध्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा जोरदार डंका पिटला जात आहे. देशद्रोही ओवेसी असो, नाही तर भारतद्रोही कन्हैया. त्यांनी केलेल्या देशद्रोहाबद्दल सगळी माध्यमे, भोंदू पुरोगामी पुढे येवून आंदोलने करतात. पण एका नामांकीत वर्तमानपत्राचा अग्रलेख परत घेण्याची वेळ आलेली असताना आजच्या या क्षणापर्यंत एक आमचा दैनिक सांजवात सोडला तर कोणी त्याची दखल घेत नाही. यावरून वर्तमानपत्र किती मुर्दाड झाली आहेत, हेच दिसून येते. म्हणजे ओवेसीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कन्हैय्याला अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे पण लोकसत्तासारख्या एका मोठ्या वर्तमानपत्राच्या संपादकाला आपली मते मांडायचा अधिकार नाही. मग कसे म्हणायचे याला लोकशाहीचा चौथा स्तंभ? 
  • .इथे कुबेरांची मते बरोबर की चुकीचा हा प्रश्‍नच नाही. त्यांची मते काहीही असतील. त्याचे समर्थन वा विरोध हा मुद्दाही वेगळा आहे. पण त्यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांना परत घ्याव्या लागल्या यासारखे दुर्दैव कोणते? तसे कोणाही संपादकाच्या नशिबी येवू नये, हीच त्या संत मदर टेरेसा चरणी प्रार्थना.
  • वास्तविक ज्या विषयावर कुबेरांनी अग्रलेख लिहीला, त्या विषयाला हात घालणे किंवा त्याचे सडकून टिका करीत वाभाडे काढणे, हे भारतीय सेक्युलर माध्यमातले भयंकर पाप आहे. कारण संतपद बहाल होणार्‍या मदर टेरेसा काही हिंदू धर्मातल्या नाहीत आणि म्हणूनच त्यांच्या चमत्कार वा साक्षात्कारी शक्तीला कुठल्याही विज्ञानाची जोड असण्याचे कारण नाही. त्या हिंदू नाहीत इतकीच गोष्ट त्यांच्या बाबतीतले कुठलेही अतिरेकी दावे सत्य मानायला पुरेसे असतात. हे सेक्युलर सत्य कुबेर विसरले आणि म्हणूनच त्यांना माफ़ी मागण्याची नामुष्की आलेली आहे.
  • याच कुबेरांनी यापूर्वी अनेक हिंदू संत, बाबा किंवा महाराजांवर सडकून टिका केलेली आहे. तेव्हाही हजारो वाचकांच्या भावना दुखावलेल्या होत्या.  पण त्याला उत्तर देण्याचे, त्यावर खुलासा करण्याचे साधे सौजन्य कुबेरांनी कधी दाखवले नाही. कारण वाचकांच्या भावना पायदळी तुडवण्यासाठीच असतात, यावर अशा पुरोगामी विचारवंतांची अगाध श्रद्धा असते. फ़क्त एक अपवाद आहे, ज्यांच्या भावना आपण पायदळी तुडवत आहोत, ते वाचक श्रोते धर्माने व जन्माने हिंदू असावे, ही ती अट आहे. त्यामुळेच आजवर कुबेरांना कधी ‘क्षमस्व’ म्हणायची वेळ आली नाही. कारण भावना हिंदूंच्याच दुखावतील, याविषयी कुबेर काटेकोर होते. पण काल गुरूवारी  ख्रिश्चनांच्या भावना दुखावतील, असे कुबेर लिहून गेले आणि त्यांना अग्रलेख मागे घेण्याची वेळ आली. यातच या देशाला हिंदूस्थान म्हणणार्‍यांचे नाक कापले आहे. शिवसेनेसारखे भोंदू पक्ष औरंगाबादला संभाजीनगर म्हणतात, भारताला हिंदूस्थान म्हणतात पण त्याच हिंदूस्थानात इतके अराजक माजले आहे की एका संपादकाला आपला अग्रलेख मागे घेवून माफी मागावी लागली आहे त्याबाबत शिवसेना मूग गिळून गप्प आहे. अर्थात कुबेरांच्या पूर्वीच्या कर्माचे हे फळ असेल कदाचित. पण यावरून एक दिसून आले की हिंदूंच्या भावना कोणीही दुखावल्या तर चालतात, ‘बाकी कोणाच्या’ दुखावता कामा नये.
  • मागे याकुब मेमनच्या फ़ाशीविषयी असेच कुबेर असेच काहीसे बरळले होते. त्यावरून संतप्त प्रतिक्रीया उमटल्या होत्या. तेव्हाही त्यांना माफ़ी मागण्याची संधी उपलब्ध झालेली होती. पण तिथे चुक मान्य करण्याऐवजी आपल्या लेखाचे समर्थन केले. मग असे समर्थन कालच्या अग्रलेखाबाबत का केले नाही? त्याचे उत्तर देण्याइतके त्यांच्याकडे मुद्दे नव्हते का? का त्यांना वैचारिक दारिद्य्र्र आले होते? हिंदू धर्मावर, भारतावर टिका केली, वाटेेल ते बोलले तरी कोणी अवाक्षर काढत नाही, पण बाकी कोणाबद्दल बोलले तर लगेच हंगामा होतो. हिंदू धर्म काय रस्त्यावर पडला आहे? कुबेरांनी आपला वैचारिक खजिना इथे रिकामा करायचा सोडून शेपूट घातली. त्यापेक्षा त्यांनी आपल्या संपादक पदाचा राजीनामा दिला असता तर ते महान ठरले असते. पण गरीब पोटार्थ्यासारखे त्यांचे वागणे हे माध्यमांना शोभणारे नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा म्हणून कोणतेही केतकर, वागळे, देसाई असले फेकू पत्रकार आज त्यांच्या बाजूने राहणार नाहीत. कारण सगळे संधीसाधू, हिंदूद्वेषी आहेत. त्यामुळे ‘एकाला एक आणि दुसर्‍याला दुसरा’, न्याय देणारी ही त्यांची प्रवृत्ती आहे. अशा परिस्थितीत आपला लढा कुबेरांनी न लढता शेपूट घातले हे त्यांचे वैचारिक दारिद्य्रच म्हणावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: