गुरुवार, ३ मार्च, २०१६

अरविंद सावंत, मराठा नावाचा प्रांत कुठे आहे?

  •   देशभक्त आणि देशद्रोही असा वाद देशभरात उफाळला असतानाच, आता शिवसेना खासदाराच्या मागणीमुळे नवा वाद उभा राहण्याची चिन्हं आहेत. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राष्ट्रगीतामध्ये बदल सूचवला आहे. सावंत यांनी राष्ट्रगीतातील ‘सिंध’ या शब्दाला आक्षेप घेतला आहे. त्याऐवजी ‘सिंधू’ हा शब्द वापरावा असं त्यांनी सूचवलं आहे. यावरून अरविंद सावंतांचे डोकं फिरलंय का असाच प्रश्‍न पडल्याशिवाय राहणार नाही. केवळ भारतीय जनता पक्षाला आणि मोदींना विरोध करण्यासाठी देशात फूट पाडण्याचे शिवसेनेचे हे कारस्थान आहे. स्वत:चे कसलेही कर्तृत्व नसणार्‍या या शिवसेना खासदारांनी मोदी लाटेव्यतिरीक्त निवडून येवून दाखवावे आणि मगच सिंध प्रांतावर गप्पा माराव्यात. ज्यांना मुंबईतील मानखुर्द आणि आसपासच्या झोपडपट्टी पलिकडे काही माहित नाही त्यांनी देशाच्या इतिहासात लुडबूड करू नये. न दिसणारा सिंध प्रांत हटवण्यास पुढे आलेल्या सावंतांनी आपल्या मतदारसंघातील अनधिकृत झोपड्या आधी दूर कराव्यात. हे राष्ट्रगीत ज्यांनी लिहीले आहे त्या रविंद्रनाथ टागोरांपेक्षा सावंत स्वत:ला शहाणे समजतात की श्रेष्ठ?
  • भारतीय राज्यघटना लिहील्यानंतर या घटनेमध्ये राष्ट्रीय ध्वज तिरंगा, राष्ट्रगीत निश्‍चित केले गेले. घटनापुरूष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या अभ्यासाने हे निश्‍चित केले आहे. असे असताना शिवसेना खासदार अरविंद सावंत हे काय स्वत:ला बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा श्रेष्ठ समजतात काय? आपली लायकी काय आणि आपण करतोय काय याचा विचार त्यांनी केला पाहिजे. ही भूमिका एकट्या अरविंद सावंत यांची आहे की शिवसेनेची आहे, उद्धव ठाकरे यांची आहे हे जाहीर सांगण्याची वेळ आलेली आहे. देश स्वातंत्र्यानंतर ज्या सिंधी समाजाने आणि सिंध प्रांतातील लोकांनी फार मोठा त्याग केलेला आहे त्यांच्याशी गद्दारी करण्याचे काम स्वातंत्र्याशी संबंध नसलेल्या, स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या शिवसेना आणि त्यांच्या पक्षातील असे सुमार खासदारच करू शकतात. त्यामुळे ही भूमिका शिवसेनेची आहे की नाही हे जाहीर करून त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली पाहिजे.
  •    अरविंद सावंत यांनी लोकसभा सभागृहात नियम ३७७ नुसार आपला मुद्दा मांडला. देशाचे महान कवी रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत लिहिलं आहे. मात्र भारतात ‘सिंध’ प्रांत अस्तित्त्वात नसल्याने त्याऐवजी ‘सिंधू’ हा शब्द वापरला जावा, असं सावंत म्हणाले. सावंत यांनी हा काही नवा विषय मांडलेला नाही. यापूर्वी अनेक मूखार्ंंनी असा युक्तीवाद केलेला होता. पण तो त्यात्यावेळी न्यायालयाने हाणून पाडला होता. पण जुनाट आणि बुरसटलेल्या विचारांच्या शिवसेनेच्या खासदारांना सामाजिक प्रश्‍न, नागरी प्रश्‍न यापेक्षा हा प्रश्‍न महत्वाचा वाटला यावरूनच त्यांची लायकी दिसून आली आहे.
  • राष्ट्रगीतातील पंजाब, सिंध, गुजरात, मराठा या ओळीतील ‘सिंध’शब्दाबाबत सावंत यांचा आक्षेप आहे. ‘सिंध’ नावाचा कोणताच प्रांत भारतात नाही, त्यामुळे संसदेने राष्ट्रगीतातील या शब्दाबाबत पुनर्विचार करावा, असं सावंत यांनी नमूद केलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर अरविंद सावंत यांनी ट्विट करूनही याबाबत आपलं म्हणणं स्पष्ट केलं. संसदेत २४ जानेवारी १९५० रोजी पारित झालेलंच योग्य राष्ट्रगीत गाणे गरजेचं आहे. त्यामुळेच ‘सिंध’ या शब्दाऐवजी ‘सिंधू’ हा शब्द वापरला जावा, असं ट्विट सावंत यांनी केलं आहे. अर्थात राष्ट्रगीतातील ‘सिंध’ या शब्दावर पहिल्यांदाच आक्षेप आहे असं नाही. यापूर्वीही अनेकांनी अनेकवेळा हा आक्षेप घेतला आहे. पण सिंध हा भारतीय स्वाभीमान आहे, भारतीय संस्कृतीशी संबंधीत असताना त्या सिंधचे सिंधू करणे किंवा तो शब्द हटवणे ही या प्रांताशी केलेली प्रतारणा ठरेल. मराठीचा खोटा अभिमान सांगणारे शिवसेनेचे हे नेते मग पंजाब सिंध गुजरात मराठा यातील मराठा ऐवजी महाराष्ट्र शब्द वापरा अशी का मागणी करत नाहीत? मराठा नावाचा तर प्रांत कुठेच अस्तित्वात नाही. गुजरात आहे, पंजाब आहे. पण मराठा नावाचा प्रांत कुठे आहे? उलट मुंबईतील मराठीच हटवण्याचे काम शिवसेनेने केले आहे. त्यामुळे अक्कल नसताना नको तो वाद अरविंद सावंत यांनी निर्माण करू नये. सावंतांच्या या चुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी माफी मागीतली पाहिजे. 
  •   नोबेल पारितोषिक विजेते कवी रवींद्रनाथ टागोर यांनी १९११ मध्ये लिहिलेल्या ‘जन,गण मन’ला १९५० मध्ये राष्ट्रगीताचा मान मिळाला. संसदेच्या मंजुरीने ‘जन,गण मन’ हे राष्ट्रगीत देशाला बहाल करण्यात आलं. मात्र यातील सिंध हा पाकिस्तानमधील प्रांत आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच याबाबत प्रश्न विचारले जात होते. २००५ साली संजीव भटनागर या राष्ट्रीय स्केटिंगपटूने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत, सिंध हा प्रांत पाकिस्तानात असल्याने तो शब्द राष्ट्रगीतातून वगळण्याची विनंती केली होती. या याचिकेला सरकारने आव्हान देत, सिंध हा शब्द प्रांत दर्शवणारा नाही, तर संस्कृती दर्शवणारा असल्याचा युक्तीवाद केला होता. तसंच जर हा शब्द वगळला, तर देशात राहणार्‍या सिंधी बांधवांच्या भावना दुखावतील, असंही सांगितलं होतं. कोर्टाने हा युक्तीवाद ग्राह्य मानत, राष्ट्रगीतातील बदलाला नकार दिला होता. असं असताना कसलाही अभ्यास नसलेल्या, कसलीही अक्कल नसलेल्या सावंतांनी हा वाद कशासाठी उकरून काढला आहे? 
  •  २०११मध्ये मुंबईतील निवृत्त प्राध्यापक श्रीकांत मालुष्टे यांनीही अशीच याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्यांचीही मागणी सिंध शब्धाऐवजी सिंधू वापरण्यात यावं अशीच होती. मात्र ही याचिकाही हायकोर्टाने फेटाळली होती. त्यासाठी कोर्टाने २००५ साली सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा दाखला दिला होता. २०१५ मध्ये मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारकडे राष्ट्रगीतातील सिंध की सिंधू कोणता शब्द योग्य, याबाबतचं स्पष्टीकरण द्यावं, असा आदेश दिला होता. २०१३ मध्ये महाराष्ट्रातील शाळेच्या पाठ्यपुस्तकांतील राष्ट्रगीतामध्ये सिंध शब्दाऐवजी सिंधू हा शब्द वापरण्यात आला होता. त्याविरोधात मुंबईतील मुलुंड इथल्या दक्षता शेठ यांनी याचिका दाखल केली होती. तसंच सर्व पुस्तकं परत मागवण्याची मागणी केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान २०१५ मध्ये हायकोर्टाने सरकारला हे आदेश दिले होते. इतके सगळे असताना महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या, दुष्काळ, अवकाळी, बेरोजगारी अशा प्रश्‍नांवर बोलायचे सोडून नको तो वाद उकरून काढून शिवसेना आणि सावंतांनी आपला बावळटपणा दाखवून दिला आहे. याचा निषेध होण्याची गरज आहे. कारण तोच तो विषय अकारण उकरून काढून शिवसेना आणि सावंतांनी न्यायालयाचाही अवमान केलेला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: