मंगळवार, १५ मार्च, २०१६

यशवंतरावांनंतरचा महाराष्ट्र


  1.   सातारा जिल्ह्याचा इतिहास ज्यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय अपूर्ण राहतो ते म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुध्दा होते. पण याहीपलीकडे यशवंतराव फार वेगळे होते. ते त्यांच्या आजच्या जयंतीनिमित्ताने आठवण्याची गरज आहे.
  2.  यशवंतराव चव्हाण हे तत्कालीन सातारा जिल्हा आणि आता सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावात हेन्द्रे पाटील कुटुंबात त्यांचा जन्म झाला. 
  3. े बालपणीच पितृछत्र गमावले आणि आईच्या संस्कारात आणि शिकवणुकीतून त्यांची जडणघडण होत गेली. चव्हाण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यात सक्रिय सहभागी होते
  4.  १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. मात्र १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले. 
  5.   महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना यशवंतरावांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या. त्या आजही भारतीय लोकशाहीत महत्वाच्या आहेत. त्यामध्ये पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात त्यांनी केली. 
  6.   आर्थिक विकासासाठी केंद्राप्रमाणे राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ यशवंतरावांनी केला. कोल्हापूर प्रकारच्या बंधार्‍यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. ही यशवंतरावांच्या कारकीर्दीतील महाराष्ट्राला असलेली फार मोठी देणगी आहे.
  7.    यशवंतरावांनी महाराष्ट्रात सहकाराला फार मोठी चालना दिली होती. त्यांच्या काळात त्यांनी १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना केली होती. साखर कारखाने हे महाराष्ट्राच्या समृद्धीचे लक्षण होते.  मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना यशवंतराव चव्हाणांच्या कारकीर्दीत झालेली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग नोंदवून यशवंतरावांनी कृषी विकासाला प्राधान्य दिले होते. मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्वकोश मंडळाची स्थापना करून यशवंतरावांनी सांस्कृतिक विकासात भर घातली होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते ना.धों. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.    ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात.
  8. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला जे दिले आहे ते नंतरचा कोणताही मुख्यमंत्री देवू शकला नाही. किंवा त्यांच्यापुढे एक पाऊल टाकून काम करणे कोणालाही शक्य झाले नाही. नंतर सगळे विकासापेक्षा राजकारणात अडकले. त्यासाठी यशवंतरावांनी निर्माण केलेल्या संस्थांचाच राजकीय अड्डा केला गेला.
  9. यशवंतरावांनी सहकारी साखर कारखान्यातून समृद्धी दाखवली. स्वयंपूर्णता दाखवली. आज साखरकारखाने कर्जबाजार झाले आहेत. यशवंतरावांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निर्मिती प्रबळ लोकशाहीच्या निर्मितीसाठी केली. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी नवनवे नेते तयार करण्यासाठी संधी निर्माण करण्यासाठी या संस्थांची निर्मिती केली. पण आज या सगळ्यांचा बाजार झाला आहे. ज्याच्याकडे पैसा आणि ताकद आहे तोच या संस्थांवर वर्चस्व गाजवू शकतो असे चित्र निर्माण झाले आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण होण्याऐवजी सत्तेतून सत्ता निर्माण करण्याचे तंत्र विकसीत झाले आहे. यातून घराणेशाहीचा जन्म निर्माण झाला आहे. त्यामुळे यशवंतरावांनंतरच्या महाराष्ट्राचे स्वरूप गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराने बरबटलेला महाराष्ट्र असा प्रकार झाला आहे. यशवंतराव गेले आणि महाराष्ट्रात विकासाचा विचार करणारे नेते संपले. नंतर सगळे झाले ते स्वविकासाचे नेते. 
  10. उद्योग, रोजगारासाठी, लघुउद्योगाच्या विकासासाठी महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळासारखी महामंडळे निर्माण केली. पण यशवंतरावांनंतर या एमआयडीसीची अवस्था वाईट झाली. कारखानादारांना असुरक्षित वातावरण तयार झाले आणि उद्योग बंद झाले. सरकारच्या ज्या जमिनी कारखानदारीसाठी दिल्या आणि औद्योगिक वसाहती निर्माण केल्या त्या जागी टॉवर, अनधिकृत बांधकामे निर्माण झाली आणि कारखानदार बिल्डर झाले. हे भयानक चित्र निर्माण करण्याचे काम यशवंतरांनंतरच्या महाराष्ट्रात घडले. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा एकदा यशवंतरावांच्या दृष्टीतून पुढे येणार्‍या नेत्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: