मंगळवार, २९ मार्च, २०१६

व्हॉटसअपची विश्‍वासार्हता संशयास्पद

  •   
  • आजच्या युगात ‘सोशल मीडिया’चे महत्त्व वाढले आहे हे निश्‍चित. पण महत्व वाढले म्हणजे विश्‍वासार्हता वाढली असे म्हणता येणार नाही. ‘सोशल मीडिया’ या नावाचा प्रकार सगळ्यात प्रभावी ठरलेला आहे आणि तो आता घराघरांत पोहोचलेला आहे. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या यशात या सोशल मिडीयाचा वाटा फार मोठा आहे.  त्याचप्रमाणे २०११ मध्ये उभारलेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाचे यश हे सोशल मिडीयाचे यश होते. सोशल मिडीयाने अनेक चांगली कामेही केली आहेत. मुंबईत मिटर डाऊन हे आंदोलन उभारून टॅक्सी आणि रिक्षाचालकांना धडा शिकवला होता. पण हे सगळे यश सोशल मिडीयातील फक्त फेसबुकचे यश होते. आज अनेकजण व्हॉटसऍपचा वापर सोशल मिडीया म्हणून करत आहेत. बातमीचा स्त्रोत म्हणून करत असले तरी व्हॉटसअपला अजून विश्‍वासार्हता मिळवता आलेली नाही. कारण बर्‍याचवेळा व्हॉटसअप वरून चुकीच्या आणि खोट्या बातम्या अफवा पसरवल्या आहेत. त्यामुळे व्हॉटसअपचा वापर हा न्यूज सोर्स म्हणून करणे टाळलेच पाहिजे.
  •   आज शहर असो किंवा ग्रामीण भाग, इथे सोशल मीडियाने केवळ सामाजिक बदलांमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. मानसिक बदल करण्यामध्येही सोशल मीडियाची भूमिका प्रभावी राहिली आहे. अनेकवेळा ‘खोटं बोला पण रेटून बोला’ या पद्धतीने तेच तेच चित्रीकरण १०० प्रकारे दाखवल्यानंतर त्याचा एक वेगळा परिणाम नकळतपणे होत असतो. शिवाय केवळ विविध वाहिन्याच सोशल मीडियामध्ये आता मर्यादित राहिल्या नसून एस.एम.एस., ब्लॉग, ट्विट, व्हॉट्सऍप, फेसबुक हे सगळे प्रकार आता सोशल मीडियामध्ये आक्रमक झाले आहेत. फेसबुकने तर अशी परिस्थिती निर्माण केली आहे की, अवांतर वाचनापासून आजचा तरुण झपाटयाने तुटत चालला आहे. तो सोशल मीडियाच्या पूर्णपणे आधीन झाला आहे. आजच्या सर्व राजकीय पक्षांना या सोशल मीडियाचे महत्त्व मोठया प्रमाणात जाणवलेलं आहे. पण यामध्ये व्हॉटसअप हा सोशल मिडीया अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यावरून विश्‍वसनीय गोष्टी प्रसारीत होत नाहीत तोपर्यंत त्याचा वापर करणे धोकादायक आहे. अशाप्रकारे अफवा आजवर कधी फेसबुकवर आल्या नव्हत्या. पण व्हॉटसअप हे चुकीच्या बातम्या देणारे तंत्र म्हणून सध्या प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे व्हॉटसअपवरून घेतलेली बातमी केव्हा अंगावर शेकेल आणि त्याचा काय दुष्परिणाम होईल हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे.
  •  आज अनेक वर्तमानपत्र, न्यूज चॅनेल आपला व्हॉटसअप नंबर देत असतात. जेणेकरून सिटीझन जर्नलिझमला प्रोत्साहन मिळेल. परंतु त्याचा दुरूपयोग होताना दिसत आहे. म्हणूनच या माध्यमाचा वापर करताना त्याला अगोदर विश्‍वास संपादन करावा लागेल.
  •     याचे कारण गेल्या दोन वर्षात याच व्हॉटसअपने अनेकांना मारून टाकले आहे. प्रत्यक्षात हयात असताना ती व्यक्ती गेली म्हणून त्यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली आहे. यामध्ये दोन वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतील कथाकार, पटकथा, संवाद लिहीणारा दिग्गज आणि विनोदी व खलनायकाच्या भूमिका करणार्‍या कादरखानचा मृत्यू झाला म्हणून बातमी पसरवली होती. नंतर दोन दिवस ती बातमी व्हायरल झाल्यानंतर ती पोस्ट काढून टाकण्यात आली. मग त्याचे खुलासे आले. तोच प्रकार लोणावळ्याजवळ शक्ती कपूरला अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला अशा फेक बातमीमुळे झाला होता. साधारण दर आठ पंधरा दिवसांनंतर अशीच कोणाची तरी बातमी येते. मराठीतील दिग्गज अभिनेता सचिन खेडेकर याच्या मृत्यूचीही अशीच बातमी आली होती. त्यामुळे फक्त श्रद्धांजली आणि रिप करणार्‍यांची संख्या वाढली. पण ही बातमी पहिल्यांदा कोणी सोडली याचा शोध कधीच घेतला गेला नाही. ज्याप्रमाणे फेक अकौंट, फेक न्यूज सोडल्यावर, अफवा पसरवल्यावर फेसबुकवरून कारवाई केली गेली त्याप्रमाणे व्हॉटसअपवरून अद्याप कधीही अशी कारवाई झालेली नाही.
  • कादरखान, शक्ती कपूर, सचिन खेडेकर हे सेलिब्रेटी आहेत. त्यांना गॉसिपींगची, अफवांची सवय असते. परंतु सामान्य माणसांच्या जगात एखाद्या व्यक्तिच्या निधनाची अशीच बातमी पसरवली गेली तर त्याचे काय परिणाम होतील? किंवा एखाद्या लोकप्रिय आणि मोठ्या व्यक्ति, नेता, राजकीय व्यक्ति यांच्याबाबत अशी बातमी आली तर काय घडेल? फार मोठ्या दंगलीच घडतील. सामान्य माणूस मरून जाईल. त्यामुळे व्हॉटसअपला जोपर्यंत विश्‍वासार्हता कमावता येत नाही तोपर्यंत त्याचा सोशल मिडीया म्हणून वापर होणे चुकीचे आहे. आज अनेकजण या तंत्राचा वापर करत आहेत. अगदी पोलिसही आपला व्हॉटसअप नंबर जाहीर करत आहेत. परंतु पोलिसांनाही चकवा देणारी एखादी बातमी यातून येवू शकते. त्यामुळे व्हॉटसअपवर अवलंबून राहणे हे योग्य नाही. व्हॉटसअपला सोशल मिडीयाची प्रतिष्ठा प्राप्त होणे शक्य नाही. जी विश्‍वासार्हता फेसबुकची आहे ती व्हॉटसअपची नाही. त्यामुळे या व्हॉटसअपवर काही बंधने घालण्याची आवश्यकता आहे. शक्य तितक्या लोकांनी ते बंदच करावे हे उत्तम. कारण जर तुमच्याबाबतही एखादी अफवा कोणी पसरवू शकतो. म्हणून त्याला बाय बाय करणेच योग्य ठरेल. मोदींनी हे तंत्र यशस्वी करून दाखवले असले तरी ते सर्वांना फायदेशीर ठरेल असे नाही.
  •  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: