मंगळवार, २९ मार्च, २०१६

थेंब थेंब वाचवा

  • राज्यात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे  होळी व रंगपंचमी हे सण शास्त्रापुरतेच साजरे करण्याचे आवाहन अनेकांनी केले आहे. अनेकांनी हे आवाहन प्रेमाने केले तर राज ठाकरे यांनी ते धाकानेही केले आहे. होळी व त्यानंतर येणार्‍या रंगपंचमीत पाण्याचा वारेमाप वापर करण्यात येतो. सध्याच्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रतीकात्मक पद्धतीने हे सण साजरे करण्याचे आवाहनही केले आहे. त्या आवाहनला प्रतिसाद देण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणजे यावर्षी १९७२ पेक्षा भयानक दुष्काळ आहे असे म्हटले जात आहे. पण तसे नेहमीच बोलले जाते. आपल्याकडे दुष्काळ हा नियोजनाचा आहे हे १९७२ पासून दिसून आले आहे हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे १९७२ पर्यंत असलेली मर्यादीत लोकसंख्या, स्वराज्याची जेमतेम पंचवीशी होती. त्यामुळे तोपर्यंत पाणी पुरेसे होते. नंतर मात्र गध्दे पंचवीशी सुरू झाली आणि नियोजन बिघडत गेले. ते बिघडलेले नियोजन सुधारण्यासाठी अशा आवाहनांना प्रतिसाद देण्याची गरज आहे.
  • आयुष्य हे पाण्यासारखे असते. ते पाण्यासारखे अखंड प्रवाहित राहिले पाहिजे, असे आचार्य अत्रे म्हणत असत.  पाणीवजा मानवी जीवसृष्टी ही संकल्पनाच करता येत नाही. अशा या पाण्याशिवाय मराठवाडा, विदर्भ आदी राज्यांतील भाग वंचित आहेत. भरपूर पाणी असूनही नियोजनाचा दुष्काळ असणार्‍या सातारा नगरपालिकेतही आता मंगळवारी पाणी पुरवठा करण्यात येणार नाही असे जाहीर केले आहे. कोकणातही कधी नव्हे ती यावर्षी  पाणीसाठयात चिंताजनक घट झालेली आहे. सर्वसाधारणत: राज्यातील दुष्काळी भागात जानेवारीत टँकरने पाणीपुरवठा क्वचित होतो. पण गेल्या काही वर्षात राज्यात पावसाने दडी मारल्याने सगळीकडेच पाण्याची बोंबाबोंब आहे. राज्यातील ग्रामीण भागात पाण्याची समस्या तीव्र रूप धारण करीत असताना शहरी भागातही आता पाणीकपात करण्यात येत असल्याने ‘पाणी वाचवा, पाणी निर्माण करा’, असे संदेश नागरिकांना द्यावे लागत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षात राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळाने होरपळत आहेत. अशा भीषण परिस्थितीत सरकारने शेतकर्‍यांच्या मदतीला तातडीने धावून जाणे आवश्यक आहे. मात्र आपल्याकडे त्याचे राजकारणच जास्त होताना दिसत आहे. मात्र राज्याच्या जलसंपदा विभागाने उशिरा का होईना, रेनडान्स व जलतरण तलावांवर बंदी घालण्याचे आदेश दिलेले आहेत. रेनडान्स असो किंवा तरणतलाव हे भौतिक सुखाची साधने आहेत. राज्यातील मोठा भूभाग दुष्काळाने होरपळत असताना हे चोचले गेल्या काही दिवसांपर्यत पुरवले जात होते. आता सरकारने त्यावर बंदी आणली हे चांगलेच झाले.  डिसेंबरपासून राज्यातील शहरी भागात १४ टक्के पाणीकपात सुरू झाली. त्यानंतर त्याचे प्रमाण वाढवण्यात आले. तेव्हाच जर सरकारने तरणतलावांवर, वॉटरगेमवर बंदी घातली असती तर आजच्या इतकी भीषण पाणीटंचाई जाणवली नसती. पण उशीरा का होईना पण होळीच्या निमित्ताने त्यावर बंदी घातली हे छान झाले.  आता याचप्रमाणे बगिचातील कारंजी, शौचालयातील विनाकारण वाहते नळ, गॅरेज, बांधकाम आदींकरिता वापरासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, असे आदेश सरकारने देण्याची गरज आहे. ते केल्यास अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. 
  •   शहरी भागात शौचालयात फ्लशसाठी मोठया प्रमाणात पाण्याचा वापर होतो. अनेक महापालिका या वापरासाठी पिण्याचे पाणीच पुरवते. ते बंद करून सिडकोप्रमाणे पुनर्वापर केलेले पाणी पुरवता येईल का याची चाचपणी करण्याची खरी गरज आहे.  घरात वॉश बेसीनमध्ये दात, तोंड धुताना नळ सुरू ठेवून पाण्याचा जो मोठया प्रमाणात वापर होतो, तो टाळता येऊ शकतो. पण त्यासाठी सजगता आवश्यक आहे. ती नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांनी जनजागृतीच्या माध्यमातून करदात्यांच्या कानीकपाळी मारण्याची आवश्यकता आहे. करमणुकीच्या कार्यक्रमात सध्या लोकप्रिय असलेल्या झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात मंगळवारी पाण्याचा थेंब थेंब वाचवणार्‍या आणि नळांची गळती थांबवण्यासाठी सेवाभावातून घरोघर प्बंबर घेऊन जाणार्‍या कार्यकर्त्याची ओळख करुन दिली. हे फार मोठे काम आहे. त्याचे अनुकरण होणे गरजेचे आहे. पण होळीच्या निमित्ताने मोठया प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. विशेषत: होळीच्या दुसर्‍या दिवशी शहरी भागात रंगपंचमीच्या नावाने हा पाण्याचा अपव्यय करण्यात येतो. त्यावर आळा घालण्यासाठीच्या उपाययोजना सरकारने योजल्या याचे स्वागत केले पाहिजे. पाणी ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. त्यामुळे या अमूल्य पाण्याचा वापर कसा काटकसरीने करता येईल, याकडे कटाक्ष असला पाहिजे. निसर्गाने पाणी दिले. पण त्याचा वापर जपून करण्याचे तारतम्य गमावून बसल्याने पाण्याची नासाडी मोठया प्रमाणात होतच असते. ही पाण्याबाबतची निरक्षरता घालवण्यासाठी जलसाक्षर होण्याची आवश्यकता आहे. पाणी आपल्याला निर्माण करता येत नाही. त्याची साठवण करून संवर्धन मात्र करता येते. तेवढेही कष्ट आपण घेणार नसू तर आपल्यासारखे दुर्दैवी कोणी नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: