मंगळवार, १५ मार्च, २०१६

मल्ल्याच्या पायघड्यांचा परिणाम


  •   भारतीय स्टेट बँक या बँकांची बँक असणार्‍या बँकेची कार्यपद्धती काय आहे हे सगळ्या जगासमोर आले आहे. या आघाडीच्या बँकेचे तब्बल सात हजार कोटी रुपयांचे कर्ज विजय मल्ल्या या दारू सम्राटाच्या डोक्यावर आहे. त्याचे असतील अनेक उद्योग पण तो फेमस झाला तो दारू सम्राट म्हणूनच. कारण किंगफिशर विमानाने कोणी सामान्य गरीब माणूस प्रवास करणार नाही. पण किंगफिशरची दारू बिअर प्रत्येकाला माहित आहे. त्यामुळे दारू घेवूनच तो घराघरात पोहोचला आहे. अशा विजय मल्ल्याने स्टेट बँकेचा एक पैसाही फेडलेला नाही. आणि बँकाही त्याच्याकडून तो वसूल करू शकलेल्या नाहीत. विजय मल्ल्याचे प्रस्थ हे गेल्या चार दशकात या देशात वाढत गेले. म्हणजे १९८३ मध्ये विठ्ठल मल्ल्या यांचे निधन झाल्यावर विजय मल्ल्याने त्यांच्या युबी या कंपनीचा कार्यभार स्वीकारला. तेव्हापासून त्याची कंपनी प्रचंड भरभराटीला आली. पण त्याची काळी बाजूही आहे हे कोणी लक्षात घेतले नाही. मल्ल्या कंपनीचा चेअरमन झाल्यावर युबी समूहाने आपला व्यवसाय ६० कंपन्यांपर्यंत विस्तारला. १५ वर्षात कंपनीची वार्षिक उलाढाल गेली ती १२ अब्ज डॉलरवर. यामध्ये युबी समूहाच्या किंगफिशर बिअरचा बाजारात वाटा होता ५० टक्के. दुसर्‍या कंपनीच्या बिअर अगदी लंडन पिल्सनरसारख्या कंपनीलाही गाशा गुंडाळावा लागला. किंगफिशर बिअर आजही तब्बल ५२ देशांत विकली जाते. मल्ल्या बिअर कंपनीचीच भरभराट करत बसला असता तर त्याने आणखी झेप घेतली असती. परंतु त्याला विमानसेवा सुरू करण्याची दुर्बुद्धी झाली. 
  •    २००५ मध्ये जागतिकीकरणाच्या रेटयात खासगी विमानसेवांना बहर येणार, हे त्याने अचूक ओळखले होते. परंतु स्पर्धेत खासगी कंपन्यांनी हात धुऊन घेतले, ते किंगफिशरला जमले नाही. त्याचे कारण अर्थातच मल्ल्याचा सारे काही प्रचंड प्रमाणावर करण्याचा स्वभाव हे होते. अवघ्या ८ वर्षात कंपनी दिवाळखोरीत निघाली आणि ७ हजार कोटींचे कर्ज डोक्यावर घेऊन मल्ल्या बसला. ही फार मोठी चूक आहे ती बँकिंग क्षेत्राच्या अपयशाची. भारतीय स्टेट बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी मल्ल्याकरता ज्या लाल पायघड्या घातल्या त्याचा परिणाम होता हा. या लाल पायघड्यांमधील धोक्याचा लाल रंग दिसला नाही. एरवी कोणाही सामान्य आणि प्रामाणिक माणसाच्या कर्तृत्वाचे मातेरे करणार्‍या या बँकींग क्षेत्राने दारूसम्राटाला मात्र सढळ हस्ते मदत केली. आता हात हलवत बसण्याशिवाय त्यांना पर्याय राहिला नाही.
  • पण खरा प्रश्‍न आहे तो हा की, मल्ल्यासाठी बँका एवढया उदार का झाल्या?आज सामान्य माणूस बँकेत गेला तर शिपायापासून सारेच त्याला गुरकावतात. कर्मचारी हजारो नियम दाखवून त्याच्याकडून शेकडो कागदांवर शेकडो सह्या घेतात. परंतु मल्ल्याला याची काहीच झळ न बसता स्टेट बँकेसारख्या मुख्य आणि आघाडीच्या बँकेने ७ हजार कोटींचे कर्ज दिले. एरवी कर्ज देताना बँका कर्जदाराची पात्रता तपासतात. मल्ल्याच्या बाबतीत त्यांनी काय पात्रता तपासली ? त्याच्या दारूच्या बाटलीला तारण ठेवले काय? एवढे कर्ज घेऊन आणि विमानसेवा चालवतानाही प्रचंड झगमगाट करूनही मल्ल्याची किंगफिशर कंपनी बाजारात टिकाव धरू शकली नाही. बँकांनी वसुलीसाठी त्याला तगादा लावला नाही. तो तगादा पाच-पंचवीस हजार रुपयांचे कर्ज घेणार्‍या शेतकर्‍याच्या मागे लावायचा. मल्ल्यासाठी बँका नुसत्या उदार झाल्या नाहीत तर त्याने कर्जफेड करू शकत नसल्याचे सांगत काखा वर केल्यावर चक्क त्याच्या कर्जाची पुनर्बाधणी करून दिली. म्हणजे त्याचे काही कर्ज भांडवलात रूपांतरित केले. तरीही अखेरीस मल्ल्याची कंपनी बुडालीच आणि त्याचा मालक म्हणून मल्ल्या बुडायच्या ऐवजी बँकांच्या नाकातोंडात पाणी गेले.
  •   आज मल्ल्याला कर्ज देण्यासाठी बँकांनी इतका अतिउत्साह का दाखवला? त्याच्या किंगफिशर कंपनीने कधीही एका तिमाहीतही नफा मिळवला नव्हता.  बँका मल्ल्याला कर्ज देण्यात नको तितके सौजन्यशील होत्या आणि दिलेल्या कर्जाचा शेवटी उपयोग काय होतो आहे, याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले, हे सत्य आहे. मल्ल्याचा कर्जबुडवेपणा समोर आल्यावरही एकाही बँकेने त्याच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली का नाही? भारतीय बँकिंग व्यवस्था ही प्रभावशाली प्रवर्तकांच्या हातचे बाहुले बनली आहे हे यातून दिसले आहे.   अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अर्थमंत्री जेटली यांनी नुकतेच आम्हाला खूप बँका नकोत, परंतु मजबूत बँकिंग हवी आहे, असे म्हटले आहे. पण हे सगळे पाहिल्यावर लक्षात येते की त्याच्या नेमकी उलट स्थिती सध्या बँकांची आहे. काही थोडे कर्ज चुकवता आले नाही म्हणून हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांना कर्जमाफी द्या म्हटले तर सरकारचे डोळे पांढरे होतात. पण मल्ल्याप्रमाणे अनेक मोठया कंपन्यांनी बँकांचे तब्बल तीन लाख कोटी रुपये बुडवले आहेत. एवढे मोठे बुडित कर्ज घेऊन बँकिंग मजबूत होणार कसे? आज अशा कर्जबुडव्या धनदांडग्यांना धडा शिकवला नाही तर बँका आपला विश्‍वास गमावून बसतील. बँका धनदांडग्यांच्या दास बनून राहतात आणि सामान्य माणसासाठी सावकारी पाश सोडतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी बँकांनी पुढे आले पाहिजे. मल्ल्याने बुडवलेली ७ हजार कोटी रुपये ही रक्कम सामान्य करदात्याची आहे. ती बुडवण्याचा अधिकार कोणालाही नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: