मंगळवार, २२ मार्च, २०१६

ुडत्याचा पाय खोलात

  • दोन दिवसांची कोठडी लाभलेल्या छगन भुजबळ यांना आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. पुन्हा कोठडी वाढवून घेतली जाईल किंवा त्यांना जामिन दिला जाईल. कदाचित त्यांना आजारपण येऊन एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागेल. कारण आपल्याकडे मोठ्या लोकांसाठी तुरुंग नसतात. त्यांच्यासाठी कोठडी म्हणजे हॉस्पिटलाईज होणे हा पर्याय असतो. आता कालपर्यंत धडधाकट असणार्‍या या नेत्यांना अचानक काय होते, त्यांना ऍडमिट केले पाहिजे असा सल्ला, प्रमाणपत्र कोण देते, ते खरे असते का? हा संशोधनाचा विषय आहे. पण काही झाले तरी अखेर छगन भुजबळ यांना अटक झालीच. हेच छगन भुजबळ ज्यांच्यामुळे अल्फा टिव्हीवर हल्ला करून मोडतोड केली म्हणून त्यांच्या कार्यकत्यार्ंंनी काय असते राष्ट्रवादी हे दाखवून दिले होते. याच प्रकरणामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपद गमवावे लागले होते. हेच ते छगन भुजबळ की जे गृहमंत्रीपद मिळाल्यावर पोलिस यंत्रणा आपल्या मालकीची आहे असे समजून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच तुरुंगात टाकण्यास सज्ज झाले होते. त्यामुळे तुरुंगवास हा त्यांना मिळालाच पाहिजे असे प्रत्येकाला वाटणे साहजिक आहे. अर्थात त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आततायीपणा केला, निदर्शने केली. पण त्याचेही बिंग फुटले. मोर्चाला माणसे मिळेनात म्हणून कोल्हापुरात चक्क पेन्शनसाठी मोर्चा आहे असे सांगून फसवून माणसे गोळा केली आणि त्यांच्या हातात भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधाचे फलक दिले. त्यामुळे या खोटेपणाने काम करणार्‍या राष्ट्रवादीचा चेहरा आणखी एकदा समोर आला आहे. पण भुजबळांची अवस्था मात्र बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे हे निश्‍चित.
  • १ फ़ेब्रुवारी रोजी भुजबळांचा पुतण्या समीर भुजबळ याला अटक झाली होती. वास्तविक याची सुरूवात राष्ट्रवादी व कॉग्रेस यांचे सरकार सत्तेत असतानाच झालेली होती. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार विरोधी पोलिस विभागाकडे केलेल्या तक्रारीच्या आधारावर ही कारवाई झालेली आहे. म्हणूनच त्याला सत्तांतराचा परिणाम म्हणता येणार नाही. मूळातच किरीट सोमय्या यांची तक्रार भुजबळ सत्तेत असतानाची आहे. पण अर्थातच त्या तक्रारीवर फ़ारशी कारवाई झालेली नव्हती. पोलिस विभागाने भले तपास केलेला असेल. पण त्या पुढली कारवाई करण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक आहे. ती मिळू शकलेली नव्हती. पण ते प्रकरण मग कोर्टात गेले आणि हायकोर्टानेच ताशेरे झाडल्यावर हालचाली सुरू झाल्या.
  • त्याच्याही आधी भुजबळांचे अत्यंत विश्वासातले एक सहकारी अशा तक्रारी घेऊन जगासमोर आलेले होते. तिथेच भुजबळांचे भवितव्य ठरून गेले होते. कारण त्यांच्याविषयी बोभाटा करणारे गृहस्थ कोणीतरी एक नव्हते, तर भुजबळांनाही ठाऊक नसतील इतक्या भुजबळांच्या व्यवहाराचे तपशील ठाऊक असलेली ही असामी होती. सुनील कर्वे या व्यक्तीनेच भुजबळांच्या भानगडींना प्रथम वाचा फ़ोडलेली आहे. हे गृहस्थ चार्टर्ड अकौंटंट असून भुजबळांच्या शिक्षण साम्राज्याचे प्रारंभिक काळातील संयुक्त संस्थापक आहेत. सहाजिकच त्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टपासून अन्य अनेक व्यवहारात भुजबळांनी ज्या हेराफ़ेरी केल्या असतील, त्याचे नेमके तपशील कर्वे यांना ठाऊक असणार. कुठल्याही मोठ्या आर्थिक व्यवहारात अशा अकौंटंटच्याच सल्ल्याने गोष्टी होत असतात. त्याचे कायदेशीर अर्थ जितके त्या अकौंटंटला ठाऊक असतील, तितके कागदावर सह्या करणार्‍याला कधी कळू शकत नाहीत. म्हणूनच कर्वे यांनी धर्मदाय आयुक्ताकडे तक्रार केली, तिथूनच भुजबळ गोत्यात जायला सुरूवात झालेली होती. 
  • फ़ेब्रुवारी महिन्यात आपण फ़रारी नसल्याचे भुजबळांनी अमेरिकेतून जाहिर केलेले होते. मायदेशी परतल्यावर आपण कुठल्याही चौकशीला सामोरे जाऊ, असा खुलासा त्यांनी केलेला होता. त्यामुळेच मायदेशी परतलेल्या भुजबळांची चौकशी कधी होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या अटकेनंतर शरद पवारांनी भुजबळांच्या पाठीशी आहोत असे म्हटले असले तरी ते ती चूक करणार नाहीत. कारण महाराष्ट्र सदन प्रकरणी भुजबळ गोत्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यावर पक्षाकडून त्यांचे कोणी समर्थन केले नव्हते. त्यामुळे भुजबळांनी पक्षाला इशारा दिला होता. ज्या काही निर्णयाबद्दल आपल्याला जबाबदार धरले जात आहे, ते आपले एकट्याचे निर्णय नसून, मंत्रिमंडळाचे सामुहिक निर्णय आहेत. हा इशारा किंवा बाण नेमक्या जागी लागला होता. त्यामुळे या अटकेनंतर पवारांकडून सूडबुद्धीचा आरोप झालेला आहे. पण वास्तवात यातला कुठलाही निर्णय राजकीय पातळीवर झालेला नाही आणि प्रशासकीय निर्णयात राजकीय हस्तक्षेप झालेला नाही. हायकोर्टाच्या आदेशानुसार कारवाया होत आहेत. सरकारने मनात आणले, तरी त्यात हस्तक्षेप होऊ शकणार नाही. 
  • आजवर भुजबळांनी जे काही उद्योग केले आहेत, त्यातून त्यांना सोडवू शकणारा किंवा मार्ग दाखवणारा जो कोणी असेल, त्याच्याशी जपून रहायला हवे. म्हणजेच त्याला दुखावू नये इतके भान राखले पाहिजे. पण इथे अतिशय विश्वासातल्या आपल्या अकौंटंटलाच भुजबळांनी दुखावलेले आहे. तिथून त्यांची घसरगुंडी सुरू झाली. ज्यांचे व्यवहार अधिक गुंतागुंतीचे असतात, त्यांना तर बायको वा प्रेयसीपेक्षाही अशा हिशोबनीसाचे रुसणे परवडणारे नसते. भुजबळांना त्याचेच भान राहिलेले नाही. ज्याला एका शिक्षण साम्राज्याच्या स्थापनेतला हिस्सेदार म्हणून सोबत घेतले, त्यालाच झटकून भुजबळांनी आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली होती. कर्वे यांच्या तक्रारीनंतर अन्य प्रकरणे बाहेर येत गेली आणि आता तर भारत सरकारच्या सक्तवसुली संचालनालयानेच टाकलेल्या सापळ्यात भुजबळ फ़सले आहेत. त्यातून त्यांना सहीसलामत कोण बाहेर काढू शकणार आहे? गेल्या पंधरा वर्षात फ़ुलेे शाहू आंबेडकरांच्या नावावर काय गोंधळ घातला गेला, त्याची लक्तरेच चव्हाट्यावर येणार आहेत. अर्थात त्यातून पवार साहेब कितपत सोडवू शकतील, हे पाहणेच मनोरंजक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: