- पाच वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधून नेस्तनाबूत झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला कन्हैयामुळे पुन्हा संजिवनी मिळाली आहे असे वाटू लागले आहे. दशावतारावर विश्वास नसलेल्या या डाव्यांना आता कम्युनिस्टांसाठी कोणी तारणहार आला आहे असा साक्षात्कार झाला आणि त्याचा जन्म तुरुंगात झाला असे वाटू लागले. त्यामुळे डाव्यांनी आता हा कन्हैया मोदीराज संपवणार असे स्वप्न पडू लागले. म्हणजे कन्हैय्याने काही संघापुढे आव्हान निर्माण केले नाही तर डाव्यांपुढेही केले आहे हे लक्षात घेतलेच पाहिजे. कन्हैया कुमारनं फक्त संघ परिवारालाच डिवचलेलं नाही, तर त्यानं प्रस्थापित भारतीय कम्युनिस्ट नेतृत्वाची मतीही गुंग केली आहे.
- कन्हैया कुमार हा ‘२१ व्या शतकातील डाव्यां’ची भाषा बोलत आहे. भारतातील प्रस्थापित कम्युनिस्ट चळवळीला ही भाषा येतेच कुठे? ते अजूनही दोन शतके मागेच आहेत. भारतातील डाव्यांची चळवळ अजूनही ‘सोव्हिएत युनियन’च्या काळात वावरत आहे. त्यामुळे रशियात पाऊस पडला की भारतात छत्री उघडायची एवढंच त्यांना माहिती आहे. कन्हैया कुमार हा ‘ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन’ या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या युवक शाखेचा नेता आहे. म्हणून त्याला आता डोक्यावर घेतले जात आहे. त्याच्या रूपाने आपल्या पक्षात नवा अवतार उगवला असे भाकपला वाटू लागले आहे. म्हणजे तृणमूल कॉंग्रेसने दोन दशकांची उखडून टाकलेली सत्ता आता पुन्हा मिळेल असे स्वप्न सिताराम येचुरींना पडू लागले आहे.
- भारतात कम्युनिस्टांचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे डावे कम्युनिस्ट, उजवे कम्युनिस्ट, डाव्यांमधले उजवे अशा अनेक जाती या पक्षात आहेत. ‘उजव्या’ कम्युनिस्टांशी हाडवैर असलेल्या ‘डाव्या’ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला फारसे रुचलेले नाही.
- संघ परिवाराला कम्युनिस्टांचं वावडं तर आहेच. त्यात नवल काहीच नाही. पण डाव्यांमधील अनेक जातींनाही अंतर्गत शत्रू आहेत. डाव्यांना ‘संपवणं’ हे संघाचं आणि उजव्या कॉंग्रेसादी पक्षांचे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. म्हणूनच राहुल गांधी हे जरी कन्हैय्याच्या पंगतीला बसले असले तरी डाव्यांच्या पानात काही पडू न देण्याची खबरदारी हे कॉंग्रेसवाले करणार. त्यामुळे कन्हैय्याचा अवतार झाला तरी त्याच्या मांडीला मांडी लावून घात करण्यासाठी कॉंग्रेस आणि लोकशाही मार्गाने पराभव करण्यासाठी भाजप सक्रीय झाला आहे. त्यामुळे ही मिळालेली संजिवनी आगामी प. बंगाल निवडणुकीत कितपत खरी ठरते यावर डाव्यांचे भवितव्य अवलंबून राहील. ही संजिवनी मिळाली नाही आणि तो एरंडच ठरला तर डावे पक्ष भारतातून पार संपून जातील. त्यांना उजव्यांशी सोयरिक करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
- आज हा ‘डावा’ विचार तसा राजकीयदृष्ट्या कमकुवत झाला असूनही दूरगामी दृष्टीनं संघाला तो धोका वाटत असतो. कारण संघाची विचारधारा ही सनातन तत्वावर अवलंबून आहे. साप म्हणू नये धाकला या न्यायाने डावे पक्ष छोटे आहेत म्हणून संघ दुर्लक्ष करणार नाहीत. आगीची ठिणगी लहान आहे म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण ती ठिणगी केव्हा वणवा लावेल हे सांगता येत नसते. त्यामुळेच अशा ठिणग्या आणि हिरवी सापाची पिल्लावळ नष्ट करण्यासाठी उजवे आक्रमकच राहणार. कन्हैय्याला नको इतकी प्रसिद्धी मिळण्याचे कारण ती ठिणगी पेटवणे आणि विझवणे हा डाव्या उजव्यांमधील साप मुंगसाचा खेळ आहे.
- ‘जेएनयू’ हे भारतातील ‘डाव्यां’ना वैचारिक अधिष्ठान देणारं केंद्रं आहे. हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुला प्रकरणानं संघाची जी कोंडी झाली होती, ती फोडण्याचा एक भाग म्हणून अफझल गुरूच्या नावानं ‘आझादी’च्या घोषणा देण्याचं निमित्त करून ‘जेएनयू’चे प्रकरण त्यापेक्षा मोठे करणे हे राजकारण आहे. डाव्यांनी आधी केले त्याला उजव्यांनी सडेतोड उत्तर दिले. यात रोहित वेमुला खर्या अर्थाने मेला तर कन्हैय्याचा बळीचा बकरा केला आहे. एकूणच मानवता, समान हक्क यासाठी आग्रही असल्याचे नाटक करणारे डावे काही कमी बदमाश नाहीत तर आपल्या हितासाठी एखादे अवतारकार्य घडवण्यातही त्यांनी आज धन्यता मानली आहे.
- गेला महिनाभर माध्यमांचा पुरेपूर वापर करून खोट्यानाट्या प्रचाराची राळ उडवून देऊन, पोलिस व प्रशासकीय यंत्रणेचा मनसोक्त वापर करून डाव्या उजव्यांनी देशाला वेठीस धरण्याचा प्रकार चालवला आहे. जामिनावर सुटका झाल्यावर कन्हैया कुमारनं ‘रोहित वेमुला’चं नाव घेत भाषण केल्यानं नुसत्या ‘डाव्या’ वैचारिक वर्तुळातच नव्हे, तर एकूण भारतातील तरुणाईच्या जगतात जी एक उत्साहाची लहर पसरली, त्यानं संघाला अस्वस्थ केलं आहेच पण त्याच्यामुळे डाव्यांना पडू लागलेली दिवा स्वप्ने काही खरी ठरणारी नाहीत. याचा फायदा तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी उठवणार आणि प.बंगालच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्यावर डावे सारवासारव करणार हे निश्चित.
मंगळवार, १५ मार्च, २०१६
डाव्यांचे स्वप्नरंजन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा