गुरुवार, ३ मार्च, २०१६

अलिकडच्या काळातील संत


 शेगावच्या श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन सध्या साजरा होतो आहे. महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा आहे. पण चमत्काराने लोकांना नमस्कार करायला लावणार्‍या परंपरेतील गजानन महाराज शेगाव आणि साई बाबा शिर्डी हे अलिकडच्या काळातील संत आहेत. त्यापूर्वीच्या संतांचे काम महान असले तरी ते खूप जुन्या काळातील होवून गेले. पण गजानन महाराज आणि साईबाबा यांना पाहणारेही अनेक लोक होवून गेले आहेत. संतांच्या चमत्काराच्या कथा नेहमीच सुरसपणे सांगितल्या जातात. पण चमत्कारापलिकडे जावून संतांना जाणून घेणे फार महत्वाचे असते.  काम, क्रोध, मोह, मत्सर व अहंकार यांनी वेढलेल्या मानवाला चिंता आणि विवंचनापासून मुक्ती मिळवण्याकरीता योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ईश्वराच्या आराधनेतून मानवाला सन्मार्गावर आणण्याचे महान कार्य संत करीत असतात.  असेच एक संत २३ फेब्रुवारी १८७८ रोजी महाराष्ट्रातील शेगावी प्रकट झाले, ते म्हणजे श्री गजानन महाराज. या गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करणारे हजारो लाखो भक्त आज महाराष्ट्रात आहेत.    शेगांवातील दोन सज्जन बंकटलाल आणि दामोदर यांनी एक तरुण दिगंबर विदेही व तेज:पुंज मूर्ती देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्टया पत्रावळीतील शितं वेचून खात असताना पाहिली. नंतर गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या हौदातील पाणी पिऊन निघुन गेली. तेव्हा त्यांची लक्षणं पाहून हे थोर संत व योगीपुरुष असल्याची जाणीव बंकटलालांना झाली. त्या नंतर महाराजांचे विविध लिलाप्रसंग अनेक भक्तांनी अनुभवले. आता तसं पाहिलं तर रस्त्यावरच्या उष्ट्या पत्रावळी खाण्यात कसला आला आहे चमत्कार? फार पूर्वीपासून लग्न कार्यात जेव्हा पत्रावळीवर जेवणं असायची तेव्हा अगदी सातार्‍यातील जुन्या सुयोग मंगल कार्यालय नाहीतर कोणत्याही कार्यालयाबाहेब फेकण्यात येणार्‍या पत्रावळीत सांडलेले उष्टे खाणारी भिकार्‍याची लहान लहान मुले अनेकांनी पाहिली असतील. यापेक्षा गजानन महाराजांनी काहीतरी वेगळे केले होते हे निश्‍चित. पण या चमत्कारीक प्रकट दिनामुळे तमाम मराठी माणसांना एक संत पहायला मिळाले हे निश्‍चित.  बार्शीटाकळी येथील श्री गोविंद महाराज टाकळीकर हे शेगांवातील मोटे यांच्या श्री महादेवाच्या मंदिरात कीर्तन करीत असताना त्यांना श्री गजानन महाराज हे सिध्दपुरुष आहेत हे जाणवले. महाराजांनी टाकळीकरांच्या बेफाम घोड्याला शांत केले. कीर्तन सुरू होण्याआधी बंकटलाल आणि पितांबरने महाराजांना झुणका भाकर आणून दिली. त्यानंतर महाराजांच्या  आज्ञेवरून पितांबराने नाल्यात तुंबा बुडवून त्यांच्यासाठी पाणी आणले. पण आश्चर्य म्हणजे तुंब्यातील पाणी स्वच्छ झाले होते. असे अनेक चमत्कार गजानन महाराजांनी केले तेव्हाच लोकांनी त्यांना संत म्हणून स्विकारले होते. संतपद काही एकाएकी लाभत नसते. त्या संतपदाला पोहोचण्यासाठी असंख्य यातना सहन कराव्या लागतात. त्या गजानन महाराजांनी सहन केल्या असतील. पण या घटनेनंतरबंकटलालांना त्यांच्या बद्दल आत्मीयता, आदर वाटल्याने त्यांनी महाराजांना त्यांच्या घरी नेऊन आंघोळ घालून त्यांची पूजा केली. एकदा श्री गजानन महाराजांना पहाटे चिलीम पेटवण्यासाठी विस्तव हवा होता. त्यांनी जानकीराम सोनाराकडे विस्तवाची मागणी केल्यावर सोनाराने नकार दिला. तेव्हा श्री महाराजांनी विस्तवाविना चिलीम पेटवली. अक्षय तृतीयेच्या दिवशी जानकीरामच्या घरी आलेल्या अतिथींच्या पानात वाढलेल्या चिचवणीत अळ्या आढळल्याने सर्व अतिथी पानावरून उठून गेले. हे चमत्कार फारच रंजक असे आहेत. पण अतिंद्रिय शक्तींना आपली ताकद दाखवून देण्यासाठी हे करावे लागते. गजानन महाराजांस चिलीम ओढण्यासाठी विस्तव न दिल्याने ही घटना घडली हे जाणून जानकीरामने आपली चूक कबूल केली व महाराजांची क्षमा मागितली व तत्क्षणी चिचवणीतील अळ्या नाहीशा झाल्या. अशा प्रकारे श्री गजानन महाराजांच्या लिलांचा अनुभव अनेकांना आला. त्यांची महती सर्वदूर जावू लागली. कोरड्या विहिरीत जलाशय निर्माण करून भास्कर पाटील आणि गावकर्‍यांना महाराजांनी थक्क केले. आज संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडत असताना असे महाराजांसारखे संत उपलब्ध नाहीत यावरून या राज्यात संत सज्जनांचाही दुष्काळ आहे असे वाटते. गजानन महाराजांचे शेगाव हे मराठवाड विदर्भ या भागास जवळचे. तेथेच आज शेतकरी पाण्यावाचून अडचणीत आहेत. अशावेळी महाराजांसारखा एखादा संत या भूमीत असता तर सरकारची गरजच नव्हती. सहज दुष्काळ हटवला गेला असता. पण दुष्कर्म करणार्‍या माणसांची संख्या वाढली म्हणून की काय ही परिस्थिती ओढवते आहे. अशावेळी संतांचे स्मरण करूनच माणसांना शांतता लाभेल हे लक्षात घेतले पाहिजे. बंकटलालने कणसे खाण्यासाठी महाराजांना आणि काही गावकर्‍यांना मळ्यात नेले असताना  कणसे भाजण्यासाठी आग पेटविल्यामुळे मधमाशा पोळयातून बाहेर पडल्याने सगळ्यांनी धूम ठोकली. मात्र महाराज शांतपणे त्याच जागी बसले. शरीराला यत्किंचितही इजा झाली नाही.  हरी पाटलांसारख्या कुस्तीगिराच्या शक्तीचे महाराजांनी गर्वहरण केले. मारुती मंदिरात पाटलाच्या मुलांनी पाठीवर उसाचा मार दिला असता महाराजांनी हातानी रस काढला आणि सर्वांना प्यायला दिला. महाराजांच्या आशीर्वादाने अनेक वर्षे संतती नसणार्‍या खंडू पाटलाला पुत्ररत्न प्राप्त झाले. या सर्व घटनाव्यतिरीक्त कुष्ठरोग बरा होणे, भाकरी प्रसादाने महान कामगिरी होणे. स्त्रियांच्या डब्यातून रेल्वेप्रवास करणे, मृत कुत्रा जिवंत होणे या लिलांव्दारे महाराजांची थोरवी सर्वांना जाणवत होती. या थोरवीने गेली शंभर वर्ष महाराष्ट्रावर मोहीनी घातली आहे. यातल्या अनेक चमत्कारांना नेमका चमत्कार काय त्यात आहे हे सामान्य माणसांना समजत नाही. पण तरीही श्रद्धेने माणसे त्यांना शरण जातात. त्यांना त्याचे फळ मिळते हे निश्‍चित. पण अलिकडच्या काळातील गजानन महाराज हे सुजाण समाजाला आपले वेगळेपण दाखवणारे संत होउन गेले हे निश्‍चित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: