मंगळवार, २९ मार्च, २०१६

कन्हैयाचे प्रमोशन थांबवा

  •     
  •  हैद्राबादमध्ये एका कार्यक्रमात डाव्यांचा हिरो कन्हैयाच्या अंगावर चप्पल फेकली गेली. त्यामुळे डावे पक्ष म्हणे दुखावले आहेत. पण ज्याची जोड्याने मारण्याचीच लायकी आहे त्याच्यावर काय फुले उधळायची काय? जो देशद्रोहाच्या खटल्यामधील आरोपी आहे, जो जामिनावर सुटला आहे, त्याला संपूर्ण देशाचा दौरा करण्याची परवानगी मिळतेच कशी? तो संपूर्ण देश नासवेल आणि देशात अंदाधुंदी माजवू शकतो. कन्हैया देशातील तरूणांना भडकावून देशात दंगली घडवू शकतो. अशा व्यक्तिला, देशद्रोहाच्या गुन्ह्यातील जामिनावर सुटलेल्या व्यक्तिला देशभर फिरायची परवानगी न्यायालयाने कशी काय दिली? अशा परिस्थितीत त्याचे काही बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? डावे पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतात. आपल्या स्वार्थी राजकारणासाठी ते कन्हैय्यालाही काही करू शकतात. त्यामुळे त्याला देशभर हिंडण्यापेक्षा संरक्षणात एका जागीच का थांबवून ठेवले नाही? न्यायालयानेच यावर कारवाई करण्याची गरज आहे.
  •    वास्तविक पाहता महिन्यापूर्वी देशातील किती लोकांना कन्हैया ठाऊक होता? दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांशिवाय किती जणांना कन्हैयाचे विचार माहीत होते? कन्हैयाकुमार हा बिहारच्या अनोळखी भागातील एका सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. आज केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांत त्याचे नाव चर्चेत आले आहे. त्याने केलेल्या एका कामामुळेच तो चर्चेत आला. या बहुचर्चित नावात लोकांना काही शक्यता वाटत आहेत. काहींच्या मनात नव्या आशा जागत आहेत. या शक्यता आणि आकांक्षांबाबत येणारा काळच काय ते सांगेल. परंतु तो देशद्रोहाच्या गुन्ह्यासाठी अटक आहे हे विसरून कसे चालेल? भारत विरोधी घोषणा देणारा  तो एक देशद्रोही आहे. त्यामुळे या देशातील कोणा देशप्रेमी व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला, चप्पल फेकली तर त्यात अशक्य काहीच नाही. म्हणूनच त्याला ठिकठिकाणी हिंडण्यापासून परावृत्त करण्याची गरज आहे. त्याला जामिन मिळाला आहे तर त्याने दिल्ली सोडता कामा नये.
  •    जेएनयूतील या विद्यार्थ्याने देशाच्या राजकीय वर्तुळातसुद्धा खळबळ उडवून दिली आहे. या विद्यार्थी नेत्याच्या कारवाया आणि विचारांबाबत बरेच काही बोलले गेले आहे. त्याच्याशी सहमती आणि असहमती असे दोन्ही प्रकारचे स्वर घुमत आहेत. तो किती खरा? किती चूक? याविषयी चर्चा होतच राहतील. बरेच प्रश्‍न उपस्थित होत आहेत. आणखी उपस्थित होतील, परंतु ९ फेब्रुवारीला जेएनयूत टीव्ही कॅमेरा नसता तर कोणा कन्हैयाला अशा तर्‍हेने बहुचर्चित होणे व महत्त्वपूर्ण ठरणे शक्य झाले असते का? जो मुलगा संसदेवर हल्ला करणार्‍या अफझल गुरूचे समर्थन करतो, त्याची पुण्यतिथी साजरी करतो त्याला कुरवाळणारे डावे पक्ष किती देशद्रोही आहेत हे यातून दिसून आले. अशा व्यक्तिला देशात मोकाट हिंडू देेणे म्हणजे आपल्या पायावर कुर्‍हाड पाडून घेण्याचा प्रकार आहे.
  •   एखाद्याची प्रतिमा घडवणे वा बिघडवण्याचे काम वाहिन्यांच्या माध्यमातून सध्या चोवीस तास चालू आहे. कन्हैया हाही एका रात्रीत झालेला हिरो आणि खलनायक आहे. कन्हैया प्रकरणात ध्वनिचित्रफितीशी छेडछाड करून हवे तसे साध्य करण्याच्या काही वाहिन्यांच्या प्रयत्नांचे किस्से आता लोकांच्या तोंडावर आहेत. या प्रयत्नांची निर्भत्सना होत आहे.  परंतु माध्यमे आपल्या जीवनात सतत हस्तक्षेप करण्यात सक्षम ठरत आहेत.  माध्यमे एखाद्या व्यक्तीला ‘हिरो’ बनवत आहेत तसेच ‘व्हिलन’ही बनवत आहेत. योग्य आणि अयोग्य विचारांना पसरवण्याचे प्रभावी माध्यम बनली आहेत माध्यमे! माध्यमांच्या वाढत्या ताकदीमुळेच राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या भूमिकेवर चर्चा होणे स्वाभाविक व गरजेचे वाटत आहे. अशा परिस्थितीत सध्या वाहिन्यांचे प्रतिनिधी त्या कन्हैयाच्या मागे मागे धावत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे. हैद्राबादमध्ये त्याला मज्जाव केला, त्याच्यावर चप्पल फेकली. काय कारण आहे इतकी प्रसिद्धी देण्याची? मुळात त्याला मोकाट फिरू दिला हेच चुकीचे आहे. जामिनावर सुटलेल्या देशद्रोही गुन्हेगारांना असे हिंडता येते काय? याचा शोध पोलिस आणि न्यायालयाने घेतला पाहिजे. पण त्याच्यावर चप्पल फेकली गेली यापेक्षाही त्याला असे मोकाट फिरू दिले जात आहे त्यामागे काही षडयंत्र नाही ना हे तपासावे लागेल.  अशा परिस्थितीत वाहिन्या त्याचे महत्व फार वाढवत आहेत. जगातील इतर शक्तींप्रमाणेच माध्यमांचा परिणामसुद्धा त्यांचा वापर कोणत्या उद्देशाने केला जातो त्यावर अवलंबून असतो. एक काळ असा होता की माध्यमे ही चळवळ होती. आज माध्यमांच्या एका चळवळीचे व्यवसायात रूपांतर झाले आहे. त्यामुळे खमंग, लोकांना हादरवून टाकेल असे फिल्मी सादरीकरण केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कन्हैयाचे होत असलेले सादरीकरण. ही स्थिती खरोखरच चिंताजनक आहे. याच मानसिकतेमुळे ‘सबसे पहिले आणि सबसे तेज’चे वावटळ उठते आणि ‘सबसे अलग’ दाखवण्याची गरज माध्यमांना वाटू लागते. ही प्रबळ माध्यमे काही मोजक्या हातांमध्ये मर्यादित आणि केंद्रित होत आहेत. ही स्थिती धोकादायक आहे. याच प्रवृत्तीतून निर्माण झालेला धोका म्हणजे कन्हैयाचे प्रमोशन. सध्या न्यायालयाने जामिनावर सोडलेल्या या कन्हैय्याचे चालवलेले प्रमोशन थांबवले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: