सोमवार, ७ मार्च, २०१६

शिव शक्तीचे आकलन


  •  आज महाशिवरात्र. संपूर्ण देशभरात विशेषत: उत्तर भारतात या दिवसाला फार महत्व आहे. शिवरात्र ही प्रत्येक महिन्यातच येत असते. पण माघ महिन्यात आलेल्या वद्य शिवरात्रीला महाशिवरात्र म्हणून ओळखले जाते. सर्वत्र सार्वजनिक सुट्टीचा आणि उत्सवाचा हा दिवस असतो. या दिवशी सर्व शिवभक्त शंकराचे दर्शन घेतात.
  •       महाशिवरात्रीला शंकराची पूजा करुन रुद्राभिषेक व उपवास करतात. या दिवशी बेलाच्या पानाला विशेष महत्त्व असते. अनेक ठिकाणी महाशिवरात्रीची जत्राही भरते. एकेका हिंदू देवतांची स्वत:च्या आवडीची फळे-फुले कोणती ते ठरलेले आहे. शंकराला बेलाचे त्रिदल आणि धोत्र्याचे फूल प्रिय आहे.
  •     महाशिवरात्रीविषयी एक कहाणी प्रसिध्द आहे. फार पूर्वी एक शिकारी शिकार करण्याकरितां अरण्यात गेला होता. तो झाडावर दबा धरुन बसला. ते झाड बेलाचे होते. परंतु शिकार करण्याच्या दृष्टीने झाडाच्या फांद्या आड येऊ लागल्या. म्हणून त्याने बेलाची पाने तोडण्यास सुरवात केली. त्या झाडाखाली शंकराची एक पिंड होती. त्या पिंडीवर आपोआप बेल पडू लागला. इतक्या अवधीत पाणी पिण्यासाठी एक हरिणी आली. त्या शिकार्‍याने तिच्यावर नेम धरला. याची हरिणीला चाहूल लागली. तेव्हा तिने शिकार्‍याला सांगितले की माझी लहान बाळे घरी आहेत. त्यांना मी भेटून सूर्योदयापूर्वी पुन्हा इकडे येते. मग माझी शिकार कर. शिकार्‍याने तिचे म्हणणे कबूल केले. हरिणी परत येण्याची तो वाट पाहू लागला. रात्रभर झाडावर राहिल्याने त्याला आपोआपच उपवास घडला. शिकार्‍याला सांगितल्याप्रमाणे हरिणी तेथे हजर झाली.
  • तिचा प्रामाणिकपणा पाहून शिकार्‍याचे अंतःकरण द्रवले. त्याला तिची दया आली व तिला मारायचे नाही असे त्याने ठरवले. या सर्व गोष्टीमुळे शंकर शिकार्‍यावर प्रसन्न झाले. त्यांनी शिकार्‍याला व हरिणीला विमानांत बसवून उध्दरून नेले. म्हणून जे लोक महाशिवरात्रीचे व्रत करतील ते सदैव सुखी रहातील असे म्हंटले जाते. शंकराच्या कथा फार रोजक आणि रंजक आहेत. त्यातील गूढ अर्थ सहज सोपा नाही. शंकर म्हणजे शिवतत्व आहे. त्या शिवतत्वाला समजून घेणे फार महत्वाचे आहे.
  •     आपल्याकडे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वांनी उपवास करण्याची पध्दत आहे. सकाळी स्नान वगैरे करून शंकराला जाऊन बेलाची पाने व कवठ हे फळ शंकराला वाहिले जाते. आंब्याला या सुमारास मोहोर येतो. महाशिवरात्रीला शंकराला आंब्याचा मोहोर वाहण्याचीही प्रथा आहे. हाताने तयार केलेल्या कापसाच्या दोर्‍याच्या ७५० वाती करून शंकराच्या देवळात किंवा घरातील देवापुढे या वाती तुपांत भिजवून लावल्या जातात. उत्तर भारतात या दिवशी खसखस व थंडाई घालून भांग पिण्याची पध्दत आहे. घरोघरी उपवासाचे पदार्थ म्हणून साबुदाणा खिचडी, रताळी, बटाटे, विविध फळे वगैरे खाण्याची प्रथा आहे. या दिवशी जागरणालाही फार महत्व आहे.
  •     हे सगळं झालं पुराणातील किंवा छापील कथाभागातील कथानक. पण शंकर हे तत्व म्हणजे शास्त्र आहे. शास्त्र हे कधीच खोटे ठरत नाही. शास्त्र सत्य आहे, सुंदर आणि म्हणूनच त्याला शीवस्वरूप मानलेले आहे. आपल्याला ज्या गोष्टी दिसतात, ज्या देवस्वरूप आपण मानतो त्या अग्नी, आकाश, जल, वायू या सगळ्यांमध्ये शीव शंकर आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजेच शंकर आहे. आगीला हात लावला तर त्या अग्निकडे कसलाही भेदभाव नसतो. कोणीही हात लावला, कळत नकळत हात लावला तरी त्याला चटका लागणारच. त्यामुळे अग्निपासून आपण उब मिळवायची की चटके बसवून घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. पण अग्निकडे कसलाही भेदभाव नसतो. हाच शंकर आहे. या कथेमध्ये त्या शिकार्‍याने कळत नकळत बेलाची पाने पिंडीवर टाकली, चुकून उपवास घडला तरी त्याला त्याचे फळ मिळाले. अशा कथांबाबत सामान्य माणसे, पुरोगामी माणसे नेहमीच टिका करतात. वाईट वागणार्‍या, भक्तीने पूजाही न केलेल्या अनेकांना शंकर वरदान कसा काय देतो? असा प्रश्‍न अनेकजण उपस्थित करतात. पण जल म्हणजे सुष्ट दुष्ट असा विचार न करता सर्वांचीच तहान भागवते. हा माणूस वाईट आहे म्हणून मी त्याची तहान भागवणार नाही असे म्हणत नाही. किंवा एखाद्या सज्जन माणसाने, देवभोळ्या माणसाने पाण्यात उडी मारल्यावर हातपाय हलवले नाहीत तर त्याला ते पाणी वाचवू शकत नाही, बुडवते, पोटात घेते. तसेच हे शिवतत्व आहे. कोणतीही शक्ती ही कोणीही वापरली तरी त्याचा परिणाम सारखाच होत असतो. त्यामुळे ती शक्ती दुष्टांच्या हातात न जात सज्जनांच्या हातात जाण्यासाठी शंकराची आराधना करायची असते. शंकराची शक्ती सज्जन, सभ्य आणि चांगल्या लोकांच्या हातात गेल्यावर दुष्टांचे काहीही चालणार नाही हे साधे तत्व म्हणजे शिवतत्व. विषाचा प्याला कोणीही प्यायला तरी मरण हे येतेच. तिथे सज्जन दुर्जन, गरीब श्रीमंत, लहान मोठा असा फरक होत नाही. म्हणूनच विषाचे संतूलन आपल्या कंठाजवळ करून जो पोटात जाण्यापासून रोखू शकतो तोच शंकर म्हणजे कल्याण करणारा असतो. अशा शंकराची आजच्या दिवशी आराधना करणे म्हणजे आपल्याला शक्ती प्राप्त होते. त्यासाठी या दिवशी जास्तीत जास्त सदगुणी, सज्जन लोक शंकराची आराधना करतात. कन्हैय्याही शंकराची पूजा करेल आणि मोदीही शंकराची पूजा करेल. दोघांनाही शक्ती प्राप्त होवू शकेल. पण ती चांगल्या कार्यासाठी शक्ती लागण्याची गरज आहे. रावणही शिवभक्तच होता, गांधारीही शिवभक्तच होती. पण त्यांच्याकडे गेलेल्या शक्तीचा दुरूपयोग झाला. तशीच शक्ती कन्हैय्यासारख्या लोकांकडे जावू नये ही इच्छा महाशिवरात्रीला व्यक्त केली पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: