मंगळवार, २९ मार्च, २०१६

लाटेचा विषय सोडा

  •     
  •  चार राज्यातील निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर राजकीय भाकीतकार, विश्‍लेषकांना उत आला आहे. मोदी लाट ओसरली म्हणून सध्या सगळे विरोधक, भोंदु पुरोगामी, डावे आपलाच विजय होणार म्हणून गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. पण त्यांच्या भ्रमाचा भोपळा कधी फुटेल हे सांगता येत नाही. म्हणजे दोन वर्ष झाली की मोदी लाट ओसरली असे म्हणताना आत्ता लाटेची गरजच काय आहे? हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ओसरली असेल तर ऐन निवडणुकीत २०१९ ला ती पुन्हा मोठी होऊनही येईल हे लक्षात घेण्याचीही गरज आहे. आत्ता ओसरली असे वाटत असेल तर ते नैसर्गिकच आहे. आत्ता कोणत्याही लाटेची त्यांना गरज नाही हे त्यातील वास्तव आहे. पण ज्याप्रमाणे भरतीची वेळ आल्यावर लाट कोणाचेच ऐकत नाही, त्याप्रमाणे निवडणुकीच्या काळात ती पुन्हा येवू शकते. तेव्हा कोणाही विश्‍लेषक, डावे, पुरोगाम्यांचे बांध त्या लाटेला थोपवू शकणार नाहीत.
  • दोन वर्षात मोदी लाट ओसरत आली हे कोणी नाकारू शकत नाही. पण तो काळाचा महिमा असतो. पण सरकारविषयी नाराजीचा राजकीय लाभ उठवताना विरोधकांनीही आपापल्या कुवतीच्या पलिकडे जाऊन उतावळेपणाचे राजकारण करण्यात धोका आहे. मोदी लाट ओसरली असली तरीही सरकारवर प्रेम करणारे, समाधान व्यक्त करणारेही या देशात आहेत हे विसरून कसे चालेल?
  •   दिल्ली आणि बिहारमधील भाजपाचा पराभव हे त्यांच्या मुर्खपणाचे परिणाम आहेत. त्याला आपल्या डावपेचांचे यश समजून गेल्या काही महिन्यात मोदी विरोधकांनी चालविलेला अतिरेक म्हणजे बेडकाने फुगून बैलाएवढे होण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. राहुल गांधी यांची वक्तव्ये किंवा मागल्या दोन महिन्यातील विविध विद्यापीठासह संस्थांमध्ये पेटवण्यात आलेला देशद्रोह देशप्रेमाचा विवाद, हा पुरोगामी राजकारणाचा अतिरेक आहे. 
  •   मोदी विरोधातले राजकारण करायला काहीही हरकत नाही. पण ते करताना आपल्यावरच ते डाव उलटणार नाहीत, याचेही भान राखायला हवे ना? इथेच विरोधकांचे भान सुटलेले दिसते. बिहार दिल्लीतला भाजपाचा पराभव म्हणजे मतदार हिंदूत्वाच्या विरोधात जाऊन पुरोगामी राजकारणाला भुकेला असल्याच्या समजूतीने जी नाटके रंगलेली आहेत, तिचे दुष्परीणाम अखेर मोदींना लाभदायक ठरू शकतात. 
  • दुसरी गोष्ट अशी की दिल्लीतही जर भाजपने आपचे म्हणजे केजरीवालांचे पानीपत केले असते तर ते देशभर फिरायला मोकाट सुटले असते. त्यामुळे एका छोट्याशा दिल्लीत त्यांना बंदिस्त करून ठेवले म्हणजे केजरीवालवर नजरही ठेवता येईल. इतके साधे हे गणित आहे. मोठे युद्ध जिंकण्यासाठी छोटी लढाई हरायची असते, त्यातला हा प्रकार आहे. केजरीवाल आणि नितिशकुमार यांना त्यांच्याच जागी ठेवल्याने आपल्याला बाकी ठिकाणी उपद्रव राहणार नाही. उलट लालूंच्या संगतीने नितिशकुमारचे मातेरे झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या लोकांच्या हातात सत्ता दिल्यावर काय होते हे दाखवण्यासाठी मोदींनी हा विजय बहाल केला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
  •     पण दिल्ली बिहारमुळे मोदी लाट संपली असे म्हणून नको ते राजकारण पुरोगामी, डावे, कॉंग्रेसवाल्यांनी सुरू केले आहे. ते त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. सातत्याने चालू असलेल्या राष्ट्रप्रेमाच्या हेटाळणीने सामान्य माणसाच्या मनात कुठल्या प्रतिक्रिया उमटतात, त्याचे भान मोदी विरोधकांना राहिलेले नाही. विरोधक इतक्या टोकाला जाऊन देशाला तिलांजली देणार असतील, तर कसाही असला तरी मोदी वा भाजपा बरा; असा एक समज रुढ होऊ शकतो. किंबहूना होत चालला आहे. याचे भान विरोधकांनी ठेवले पाहिजे.
  •   मोदी विरोधात जाऊन देशविरोधी घोषणांचे समर्थन,  घातक आहे. 
  • लोकसभा निवडणूकीने भाजपाला व प्रामुख्याने नरेंद्र मोदी यांना जनतेचा कौल मिळाला होता. त्याला लोकांच्या सदिच्छा म्हणतात. लोक क्रमाक्रमाने तुमच्याकडे यायला लागलेले असताना राजकीय लबाडी वा भामटेगिरीची गरज नसते. लोक तुम्हाला आजमावत असतात. अशावेळी अन्य पक्षाचे आमदार फ़ोडण्याचे किंवा नेते पळवून आणायची गरज नसते. 
  •  भाजपाने बिहार व दिल्लीत आपल्याकडे येणार्‍या जनतेला चुचकारण्यापेक्षा अन्य पक्षातल्या बंडखोरांना आमंत्रित करून वा फ़ोडून बहुमतापर्यंत जायचा मोह बाळगला. त्यात झालेल्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागली होती, हे दुसरे कारण होते. त्यामुळे दिल्ली आणि बिहारमधील विजय हा विरोधकांचा नव्हता तर तो भाजपच्या चुकीच्या धोरणाचा पराभव होता. या पराभवातून भाजपने काहीच बोध घेतला नसेल असे नाही. त्यामुळे मोदी लाट संपली म्हणून गाफिल राहणार्‍या विरोधकांचे मनसुबे कधी उधळले जातील ते सांगता येत नाही. भाजपाला अजून देशव्यापी प्रतिसाद मिळालेला नाही. लोकसभेतील बहुमत हा आकडा असला तरी देशातल्या अनेक राज्यात अजून भाजपाला बस्तान बसवता आलेले नाही. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना जेव्हा बहुमत होते तेव्हा सर्व राज्यांतून त्यांना कौल मिळाला होता. मोदींना बहुमत असले तरी ठराविक राज्यांमधून मोठा कौल आणि काही राज्यांतून अजिबात कौल नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आजच्या चार राज्यांतील निवडणुकांतील त्यांचे २०१४ चे यश पाहता त्यापेक्षा थोडा जरी आकडा वाढला तरी भाजपचा शिरकाव असेल हे लक्षात घेतले पाहिजे. प. बंगालमध्ये शून्यावर असलेल्या भाजपचा पराभव झाला तर काहीच फरक पडणार नाही. पण भाजपने एक जागा जरी जिंकली तरी ती विरोधकांना धोक्याची घंटा असेल हे लक्षात घेतले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: