मंगळवार, २९ मार्च, २०१६

सुप्रिया सुळेंनी सूत्र का घेतली?

  •   सध्या राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये नेत्यांचा दुष्काळ पडला आहे. दुष्काळ म्हणजे असे की कोणाचा कोणाशी सबंध नाही. संत्र्याची साल बाजूला केल्यावर आतल्या फोडी अलग होतात तशी अवस्था राष्ट्रवादीची झाली आहे. अनेक पक्षांचा पक्ष अशी त्याची अवस्था झाली आहे. त्यामुळे पक्षाचे नेते वेगळेच काहीतरी करतात. जितेंद्र आव्हाडांच्या कार्यक्रमाचा पक्षाशी संबंध नसतो. सुनील तटकरे काय करतात हे कोणाला माहित नसते. अजित पवार अजून सक्रिय आहेत असे वाटत नाही. त्यामुळे केंद्रातील राजकारणात पाठवलेल्या सुप्रिया सुळे महाराष्ट्रात आता लक्ष घालू लागल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांची तीच तर डोकेदुखी नाही ना? पण पक्षातील नेते आपल्या पक्षाला अडचणीत आणतील म्हणून त्यांनी थेट सूत्र आपल्या हातात घेतली आहेत असे दिसते.
  •     पक्षाध्यक्ष आणि राष्ट्रीय नेते शरद पवार सध्या फ़ारसे क्रियाशील नाहीत.  अजितदादा सिंचन घोटाळा चौकशीच्या भवितव्यामुळे मौन धारण करून बसले आहेत. छगन भुजबळ तुरूंगात गेल्याने त्यांनी मौन धारण केले आहेे. त्यामुळे सुप्रिया सुळेंना पदर खोवून आणि कंबर कसून मैदानात उतरावे लागले. पक्षाच्या नेत्या प्रवक्त्यांना बाजूला सारून सुप्रिया सुळेच सध्या किल्ला लढवताना दिसत आहेत. भुजबळांना अटक झाल्यावर त्यांनी सर्वांनाच अटक करा आम्ही मराठे घाबरत नाही, अशी जाहिर ग्वाही दिलेली होती. त्यामुळे सध्या सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पक्षश्रेष्ठी झालेल्या दिसत आहेत.  पक्षाच्या भूमिका व धोरणे त्यांच्याच वक्तव्यातून उघड होतात असे दिसत आहे. म्हणजे राहुल सोनिया गांधी बोलल्यावर ते चुकीचे असले तरी कोणी त्यावर भाष्य करत नाही ही कॉंग्रेसची प्रथा आता राष्ट्रवादीतही सुरू आहे. त्यामुळेच लेकी वारशाने पवारांचे प्रमुखपद त्यांच्या हयातीतच सुप्रिया सुळे सांभाळू लागल्या आहेत असे दिसते. नुकताच बारामतीमध्ये त्यांनी सरकारला दिलेला इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी आता गंभीरपणे घेतला पाहिजे. दुष्काळ व पाणीटंचाई यावर तात्काळ उपाय झाले नाहीत, तर थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात गुरे आणून बांधायची धमकी सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे. अर्थात राष्ट्रवादीच्या दावणीस असलेली गुरे कुठे मोकाट सुटली असतील, तर आधी शोधावी लागतील हे सुप्रिया सुळेंना समजून घ्यावे लागेल.  त्यांची काही गुरे मोकाट झाली, म्हणूनच त्यांना कोंडवाड्यात टाकावी लागली हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. या लायनीत आणखीही काही गुरे सापडू शकतात याची जाणिव त्यांना झाली असावी. म्हणजे भाजपच्या किरीट सोमय्यांनी गणपतीपूर्वी जलसंपदा विभागातील भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात जावे लागेल असा इशारा दिला आहे. याचा अर्थ सुनील तटकरे, अजित पवार हे आता लक्ष होतील यात शंकाच नाही. त्यामुळे सत्तेत असताना उधळलेली, धरणात मुतणारी ही गुरं अगोदर कोंडवाड्यात गेली तर वर्षावर त्यांना कोण येवू देणार हा प्रश्‍नच आहे. 
  • सरकारने त्या गुरांकडे दुर्लक्ष केले म्हणून तर कोर्टाला त्यांचा बंदोबस्त करावा लागला. भुजबळ यांच्या विरोधातली कारवाई सरकारने केलेली नाही, तर कोर्टाने नेमलेल्या खास चौकशी पथकामुळे त्यांना गजाआड जावे लागले आहे. भुजबळांच्या अटकेमुळे सैरावैरा झालेल्या सुप्रिया सुळेंना आता पक्षात कोणाला बरोबर घ्यावे याचा प्रश्‍न पडला आहे. कारण स्वच्छ चारित्र्याचा नेता मिळणे आज त्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे सगळी सुत्र आपल्याकडे घेवून त्यांनी सरकारविरोधात लढाई सुरू केली आहे.
  •   राष्ट्रवादीवरच्या अजंड्यात नसलेले कार्यक्रम राबवणारे जीतेंद्र आव्हाड यांना तर अनेकांच्या वावरातून हाकलून बाहेर काढले आहे. मागच्या महिन्यात सांगली येथे आव्हाड यांनी अश्लाघ्य भाषा वापरली आणि त्यांना व्यासपीठावर घुसून काही लोकांनी मारहाण केली होती. त्यानंतर अनेकजागी त्यांच्या अशाच आगावूपणामुळे खुद्द अजितदादांच्या नाकी दम आला होता. विधानसभेत चिक्की विकायचा उद्योग आव्हाडांनी केला आणि त्यात तेलगीच्या विषयाला फ़ोडणी दिल्याने भुजबळांना संताप अनावर झाला होता. तेव्हा दादांना हस्तक्षेप करून आव्हांडांना वेसण घालावी लागली होती. आता त्यांनी पुण्याच्याच फ़र्ग्युसन कॉलेजात धमाल केली म्हणून प्रकरण हातघाईवर आले. त्यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. वास्तविक फ़र्ग्युसन कॉलेजचा मामला विद्यार्थ्यांचा होता, तिथे आव्हाडांना जायचे काही कारण नव्हते. पण राष्ट्रवादीच्या अशा मोकाट गुरांना कुठेही हिरवळ दिसली, मग त्यात तोंड खुपसण्याची सवय असते. आव्हाडांचे तसेच काहीसे झालेले आहे. अशा लोकांना वेळच्या वेळी लगाम लावावा लागतो. तो लगाम लावण्यासाठीच आता सगळी सूत्र माझ्याकडे आहेत असा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला आहे. सुप्रिया सुळेंचा इशारा हा सरकारला, मुख्यमंत्र्यांना नसून आपल्याच पक्षातील लोकांना आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आपलीच खोंडं आपल्या हातात नाहीत, त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी आता वर्षावर जावे लागणार की काय अशी शंका आल्याने त्यांनी हा इशारा दिला असण्याची दाट शक्यता आहे. पण राष्ट्रवादीतील कोणत्याही नेत्यावर त्यांचा आता विश्‍वास उरलेला नाही हेच यातून स्पष्ट झाले आहे. कारण सगळी नेतेमंडळी मोकाट सुटलेल्या गुरांसारखी उधळली आहेत. त्यापैकी अनेकांना कोंडवाड्यात जावे लागणार याची जाणिव झाल्यानेच त्यांनी हा इशारा  दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: