९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड झालेली आहे. ही अत्यंत सुखद आणि समाधानकारक बातमी रविवारी मिळाली आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता, निवड न करता, ती एकमुखाने व्हावी, असा निर्णय याच वर्षी झाला आणि त्याचा योग्य तो परिणाम दिसून आला. लेखनापेक्षा असाहित्यिकांची जी मांदियाळी होती, ती थांबून ख-या अर्थाने साहित्यिक असलेल्या संशोधक वृत्तीच्या विदुषीला हा मान मिळाला याचा आनंद आहे. त्यामुळे निवड पद्धतीने मिळालेल्या अध्यक्षपदाचा मान एका नामांकित, प्रथितयश महिलेला मिळाला, ही फार मोठी गोष्ट आहे. साहित्यक्षेत्रात डॉ. अरुणा ढेरे यांचे योगदान आहेच तसे, त्यामुळे योग्य व्यक्तीची निवड झाली आणि तीही निवडणूक न होता याचा महाराष्ट्राला आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे साहित्य संमेलनातील राजकारणाला आता पूर्णविराम मिळाला, असे समजायला हरकत नाही. अरुणा ढेरे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ साली पुणे येथे झाला. तेथेच त्यांचे एम. ए. तसेच पीएच.डी.पर्यंतचे सर्व शिक्षण झाले. साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, भारतीय संस्कृती, प्राचीन साहित्य इत्यादींचे व्यासंग असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे या कन्या होत. बालपणापासून साहित्याची आणि समीक्षेची वैचारिक पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे. आपल्या वडिलांचा वारसा योग्य पद्धतीने जपत त्यांनी आपली कारकीर्द घडवली. साहित्यक्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यामुळे योग्य कर्तृत्वाचा गौरव या निवडीने झाला आहे.डॉ. अरुणा ढेरे या पुणे विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील विद्यावाचस्पती म्हणजेच डॉक्टरेट आहेत. पुणे विद्यापीठात त्यांनी प्राध्यापिका म्हणून १९८३ ते ८८ या काळात काम केलेले आहे. पण, शिकता शिकता शिकावे, या न्यायाने त्यांनी आपल्या पेशाचा योग्य वापर केला. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी कवयित्री म्हणूनही नावलौकिक मिळवला. अरुणा ढेरे यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. सुनीता देशपांडे यांच्या निकटच्या सहवासातून अरुणा ढेरे यांची वैचारिक आणि साहित्यिक बैठक अधिक समृद्ध झाली आहे. सहा कवितासंग्रह, तीन कादंबरिका, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तकं अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. याशिवाय स्फूट लेखसंग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते. त्यांचा विस्मृतिचित्रे हा ग्रंथ अतिशय गाजला. स्वातंत्र्यपूर्व काळातील विशेष कारकीर्द घडविलेल्या महिलांवर त्यांनी विशेष लेखन केलेले आहे. मराठी साप्ताहिके, मासिके, वृत्तपत्रे यांचे त्यानी संपादन केलेले आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्याच्या संस्कृती आणि साहित्यविषयक समित्यांमध्ये ढेरे यांनी सदस्या म्हणून सहभाग नोंदविलेला आहे. लोकसाहित्य समिती, साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था अशा ठिकाणी समिती सदस्यत्वाचे म्हणून त्यांनी काम केलेले आहे.मराठी भाषा आणि या भाषेतील उत्तम साहित्य समाजापुढे येण्यासाठी ढेरे या कार्यरत असतात. त्यांच्या प्रकाशित साहित्यामध्ये वैचारिक पुस्तकांचा समावेश आहे. यात अंधारातील दिवे, उंच वाढलेल्या गवताखाली, उमदा लेखक – उमदा माणूस, याचा उल्लेख करावा लागेल. याशिवाय उर्वशी, कवितेच्या वाटेवर, काळोख आणि पाणी, जाणिवा जाग्या होताना, जावे जन्माकडे ही संपदा फार मोठी आहे. तसेच त्यांची झेप-त्यांचे अवकाश, पावसानंतरचं ऊन, प्रकाशाचे गाणे, प्रतिष्ठेचा प्रश्न, प्रेमातून प्रेमाकडे, महाद्वार, लोक आणि अभिजात लोकसंस्कृतीची रंगरूपे, विवेक आणि विद्रोह, डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार, विस्मृतिचित्रे, शाश्वताची शिदोरी ही विशेष ग्रंथसंपदा आहे. स्त्री आणि संस्कृती या पुस्तकालाही वाचकप्रियता लाभली आहे. त्यांच्या कविता संग्रहांमध्ये निरंजन, प्रारंभ, मंत्राक्षर, यक्षरात्र या मराठी, तर बंद अधरो से या हिंदी कवितासंग्रहाचा समावेश आहे. त्यांच्या कथासंग्रहामध्ये अज्ञात झ-यावर, काळोख आणि पाणी, कृष्णकिनारा, नागमंडल, प्रेमातून प्रेमाकडे, मन केले ग्वाही, मनातलं आभाळ, मैत्रेय, रूपोत्सव, लावण्ययात्रा, वेगळी माती, वेगळा वास या कथासंग्रहांना चांगला प्रतिसाद वाचकांकडून मिळाला. त्यामुळे त्या रा. चिं. ढेरे यांची कन्या म्हणून नाही, तर स्वत:ची ओळख निर्माण करू शकल्या. अत्यंत प्रतिभासंपन्न असलेल्या या विदुषीने संपादन केलेली ग्रंथसंपदाही महत्त्वपूर्ण आहे.यामध्ये स्त्री-लिखित मराठी कविता, स्त्री-लिखित मराठी कादंबरी यामध्ये १९५० ते २०१० या सहा दशकांतील ११ लेखिकांच्या कादंब-यांचा परामर्श त्यांनी घेतला आहे. इंदिरा या इंदिरा संतांच्या कवितांच्या संग्रहाला डॉ. अरुणा ढेरे यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक मान्यवर पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये नागपूरच्या डॉ. अनंत व लता लाभसेटवार न्यासाच्या वतीने अमेरिकेतल्या डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान तसेच सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार हा महत्त्वाचा आहे. याशिवाय लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार, पुण्याच्या साहित्यदीप प्रतिष्ठानचा साहित्यदीप पुरस्कार, मसापचा २०१७ सालचा ग्रंथ पुरस्कार – स्त्री-लिखित मराठी कविता या पुस्तकाला मिळाला. मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे शिवाजी सावंत साहित्य पुरस्कार गेल्याच वर्षी त्यांना मिळाला होता. महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणा-या मराठी विषयावरील उपयुक्त ग्रंथांची निवड करणा-या ग्रंथ निवड समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. त्यात आता हे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्याने त्यांच्या कारकिर्दीचा ख-या अर्थाने सन्मान झाला, असे म्हणता येईल. डॉ. अरुणा ढेरे या हसतमुख आणि अत्यंत प्रगल्भतेने आपले विचार मांडतात. त्यामुळे त्यांना वाचणे जितके आनंदमय असते, तितकेच त्यांची व्याख्यानेही आनंद देऊन जातात. गेली पंचवीस वर्षे महाराष्ट्रातील नामांकित वसंत व्याख्यानमालांमधून त्या विविध विषयांवर व्याख्याने देत असतात. यात त्यांनी काही वर्षापूर्वी देवांचे संसार या विषयावर केलेली मांडणी महिलांसह तमाम रसिकांना खूप आवडली होती. त्यामुळे ख-या अर्थाने एका थोर विदुषीला हा मान लाभला आहे.
गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८
योग्य निवड
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा