भारतात सातत्याने घोटाळे होत असतात. त्यात राजकीय नेत्यांची नावे जोडली जातात. त्या सर्वच घोटाळ्यांचा उल्लेख करणे शक्य नसले तरी काही महत्त्वाच्या घोटाळ्यांकडे नजर टाकली, तर लक्षात येईल की घोटाळा झाल्यावरही अनेकजण गुण्यागोविंदाने राहू शकतात. घोटाळा केल्यानंतर कोणी संपत असता, तर आज काँग्रेस संपवायला राहुल गांधींची मदत मोदींना घ्यावी लागली नसती. म्हणून इतिहासातील काही घोटाळे नमुनादाखल पाहणे मनोरंजक ठरेल.गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. राफेल करारात घोटाळा झाला, भ्रष्टाचार झाला असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींना ३० हजार कोटी रुपये दिले असा आरोप ते सातत्याने करत आहेत. त्याचपाठोपाठ सीबीआयच्या अधिका-यांच्या बदल्या, त्यांना पदावरून हटवणे यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. राफेल घोटाळा हा याच सीबीआय अधिका-यांच्या मार्फत उघड होईल या भीतीपोटी सीबीआय अधिकारी बदल्या केल्या गेल्या, पदावरून हटवले गेले, असे राहुल गांधींचे म्हणणे आहे. राहुल गांधींनी ही तार छेडल्यावर बाकीची तुणतुणी तशीच वाजायला लागली आणि सुरात सूर मिसळू लागली. त्यामुळे हा खरोखरच घोटाळा आहे काय, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. यासाठीच या देशातील घोटाळ्यांची परंपरा समजून घेणे आवश्यक आहे.स्वातंत्र्यानंतर सर्वात पहिला गाजलेला घोटाळा हा १९४८ साली झाला होता. त्यावेळी अर्थातच पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते हे वेगळे सांगायची गरज नाही. पण स्वातंत्र्यानंतर खादीतून सत्तेत आलेल्या काँग्रेसच्या कारकिर्दीतील हा एक मजेशीर घोटाळा. हा घोटाळा जीप घोटाळा म्हणून ओळखला जातो. पाकिस्तानने जेव्हा काश्मीरवर आक्रमण केले तेव्हा त्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी ४६०३ जीप खरेदी करणे आवश्यक आहे, असे सरकारला वाटले. त्याप्रमाणे तत्कालीन ब्रिटनमधील उच्चायुक्त कृष्णा मेनन यांच्या मध्यस्थीने ब्रिटनकडून जीप खरेदीचा व्यवहार ठरवला. त्याप्रमाणे ३०० पौंड प्रति जीप या दराने १५०० जीप खरेदीचा व्यवहार ठरवला. त्यातील पहिल्या २०० जीपसाठी ८० लाख रुपयांची तरतूद केली गेली. या जीप पैसे दिल्यानंतर त्वरित समुद्रमार्गाने येणार होत्या. पण प्रत्यक्षात त्या येण्यास खूप वेळ लागला. पैसे दिल्यानंतर १० महिन्यांनंतर या जीप आल्या. मात्र त्या फक्त १५५ होत्या. २०० जीपचे पैसे दिले गेले आणि १५५ जीप आल्या. त्यावर पंडित नेहरूंनी जाऊदे जेवढय़ा आल्या आहेत तेवढय़ा स्वीकारा आणि चालवा असे धोरण राखले. सैन्यासाठी कोणतीही सामग्री खरेदी करायची असेल तर असा भ्रष्टाचार करा, असा कारभार केला पाहिजे याची सुरुवात इथून झाली. १९५५ साली गोविंद वल्लभभाई पंत गृहमंत्री असताना पंडित नेहरूंच्याच काळात याच प्रकरणात कृष्णा मेनन यांना क्लीनचिट दिली गेली. हा घोटाळा फाईल बंद केला गेला. नंतर त्यावर कोणी काही बोलले नाही. कृष्णा मेनन नंतर संरक्षण मंत्रीही बनले. ही आहे आपल्या घोटाळ्याची परंपरा.पंडित नेहरूंच्या काळातील जीप घोटाळ्यानंतर लष्करासंबंधी झालेला मोठा घोटाळा म्हणजे बोफोर्स घोटाळा. हा घोटाळा अर्थातच पंडितजींचे नातू तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष आणि पंतप्रधान अशी दोन पदे भूषविणारे राजीव गांधी यांच्या काळात घडलेला आहे. स्वीडनची शस्त्रास्त्र बनवणारी कंपनी बोफोर्सकडून १.३ अब्ज डॉलरला तोफांची खरेदी करणे असा व्यवहार ठरला होता. त्याची रक्कमही भारत सरकारने अदा केली होती. हा व्यवहार अतिशय फुगवून सांगण्यात आला होता. या व्यवहारात राजीव गांधी, सोनिया गांधी यांचे इटलीतील नातेवाईक क्वात्रोची याने फार मोठी दलाली मिळवली होती. अर्थात त्याच्या नावावर असलेली ही दलाली गांधी कुटुंबीयांसाठीच होती हे अलिखित होते, असाही आरोप होता. हा व्यवहार होण्यासाठी क्वात्रोचीच्या माध्यमातून १.४२ हजार कोटींची लाच देण्याचाही प्रकार घडला होता. या प्रकरणामुळेच राजीव गांधींची सत्ता गेली होती. हा भ्रष्टाचार इतका स्पष्ट होता की, त्यामुळे काँग्रेसमधून बंडखोरी करून व्ही. पी. सिंग बाहेर पडले आणि हातात सायकल घेऊन रस्त्यावर आले. त्यामुळे ते अचानक हिरो बनून पुढे देशाचे पंतप्रधानही झाले. पण त्यानंतरही राजीव गांधींच्या मागचे शुक्लकाष्ठ संपले नाही. मात्र १९९१ च्या निवडणुकीत राजीव गांधींची हत्या झाली. त्यानंतर त्यांचे या खटल्यातून आरोपी म्हणून नाव वगळण्यात आले.परंतु या महाघोटाळ्याने भारताची जगभर नाचक्की झाली होती. बोफोर्स दलाली प्रकरण हे तेव्हापासून या देशातील सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे प्रकरण म्हणून गणले जाते. आजही भ्रष्टाचाराला उपमा किंवा तुलना ही बोफोर्सशीच केली जाते. म्हणजे पुलंच्या हरितात्यामध्ये ज्याप्रमाणे गोरेपणाचा मापदंड हा यमी होता, तसा भ्रष्टाचाराचा मापदंड हा बोफोर्स बनला. एखादा भ्रष्टाचार किती मोठा तर तो बोफोर्सइतका किंवा त्यापेक्षा कमी अशीच मोजदाद होऊ लागली. पण यातून सगळे सहीसलामत सुटले. कोणालाही शिक्षा नाही, सगळे उजळ माथ्याने काम करू लागले. काँग़्रेस त्यानंतर पुन्हा तीन वेळा सत्तेवर आली. एकदा नरसिंहराव यांना पंतप्रधान केले तर दोन वेळा डॉ. मनमोहनसिंग झाले. जनता विसरली की सगळे निर्दोष.संरक्षण विभागाशी संबंधित हे दोन मोठे घोटाळे काँग्रेस सरकारच्या कारकीर्दीत झाल्यानंतर एक पुढचा घोटाळा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात घडलेला आहे. अटलबिहार वाजपेयी सरकारमध्ये संरक्षण मंत्री असलेल्या जॉर्ज फर्नाडीस यांच्या कारकीर्दीत हा घोटाळा घडला. अर्थात यामध्ये वाजपेयी किंवा भाजपचे कुठेही नाव नव्हते. या घोटाळ्याचे नाव आहे बरॅक मिसाईल घोटाळा. भारताने इराकडकून बराक मिसाईल खरेदीची योजना आखली होती. या व्यवहारात पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार असलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विरोध दर्शवला होता. त्यापूर्वीच इस्त्राईलकडून १.१५० कोटी रुपये खर्च करून भारताने क्षेपणास्त्रे घेतलेली होती. त्यामुळे या कराराची आवश्यकता नसल्याचे कलाम यांनी कळवले होते. डीआरडीओने आक्षेप घेतलेला असतानाही हा व्यवहार केला गेला. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष असलेल्या समता पार्टीच्या नेत्यांनी हा व्यवहार करण्यास भाग पाडल्याने समता पार्टीचे खजिनदार आर. के. जैन यांना अटक करण्यात आली होती. संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नाडीस यांनी कलाम यांच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होता. यात गैरव्यवहार नव्हता, पण गरज नसताना खरेदी केल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे याला घोटाळा म्हटले जाते, भ्रष्टाचारात त्याचा समावेश नाही. मात्र सिद्धांत आणि चारित्र्यावर विश्वास असणा-या वाजपेयी सरकारच्या काळात घडलेला हा घोटाळा होता.राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्याच काळात आणि जॉर्ज फर्नाडीस संरक्षण मंत्री असतानाच घडलेला आणखी एक घोटाळा म्हणजे शवपेटीका घोटाळा. कारगील युद्धात मृत झालेल्या सैनिकांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे रवाना करण्यासाठी शवपेटीकांची खरेदी केली होती. त्यामध्ये झालेल्या घोटाळ्यात काही लष्करी अधिकारी आणि अमेरिकन ठेकेदाराचा समावेश होता. या घोटाळ्यातही जॉर्ज फर्नाडीस यांचे नाव आले होते. त्याचा कलंक राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या १९९९ ते २००४ या काळातील सरकारला लागला होता. विरोधकांनी हाच मुद्दा २००४ च्या निवडणुकीत मोठा करून सरकार खेचले होते.जॉर्ज फर्नाडिस संरक्षण मंत्री असताना आणखी एक तहलका झाला. तो म्हणजे ‘तहलका डॉट कॉम’ या वेब पोर्टलने केलेले स्ट्रींग ऑपरेशन. त्यापूर्वी पत्रकारीतेत असे काही असते हे कोणालाही माहिती नव्हते. पण या तहलकाने फार मोठा तहलका माजवला होता. शस्त्रास्त्र खरेदीत लष्करी अधिकारी आणि नेते लाच घेतात हे दाखवून देण्याचा तहलका माजवला गेला होता. यामध्ये काही लष्करी अधिकारी, भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना लाच देताना दाखवण्यात आले होते. बोगस कंपनीचे दलाल बनून आलेल्या पत्रकारांनी हा तहलका माजवून फार मोठा धक्का संपूर्ण देशाला दिला होता. नव्यानेच आलेली चॅनेल्स, वृत्तवाहिन्यांना दाखवायला फार मोठा मसाला यातून मिळाला होता. यावर जॉर्ज फर्नाडीस आणि त्यांच्या निकटवर्तीय जया जेटली यांच्याकडेही संशयाची सुई वळाली होती. जॉर्ज फर्नाडीस यांनी त्यावरून राजीनामाही दिला होता. पण हा घोटाळा किंवा स्ट्रींग ऑपरेशन हा काल्पनिक आणि न घडलेला घोटाळा म्हणून गणला गेला.त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात २००९ मध्ये एक गैरव्यवहार झाला होता. दारुगोळा फॅक्टरीतील खरेदी व्यवहारातील अनियमिततेबद्दल संचालक मंडळातील सुदीप्तो घोष यांना सीबीआयने अटक केली होती. यात सरकारचा थेट कुठेही संबंध नव्हता. या व्यवहारात २ भारतीय आणि ४ परदेशी कंपन्यांचा समावेश होता. त्यांना संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांनी काळ्या यादीत टाकले होते. यानंतर लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांच्या काळात २०१२ मध्ये लष्करासाठी ट्रक खरेदीच्या व्यवहारात गैर कारभार झाल्याचे पुढे आले होते. यामध्ये ट्रकच्या दर्जाबाबत प्रश्न उप्स्थित केला गेला होता.हे सगळे जरी घोटाळे लष्करासंबंधी असले तरी पंडित जवाहरलाल नेहरुंच्या काळात झालेला जीप घोटाळा आणि राजीव गांधींच्या काळातील बोफोर्स महाघोटाळा एवढा मोठा घोटाळा आजवर या देशात घडलेला नाही. त्यामुळेच काँग्रेसच्या काळात घडलेल्या घोटाळ्यांपेक्षा महाभयंकर घोटाळा हा राफेल खरेदी घोटाळा आहे हे सांगण्याचा राहुल गांधी आटापिटा करत आहेत. परंतु मुळात हा घोटाळा आहे की नाही याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे काँग्रेसचा विक्रम, नेहरु आणि राजीव गांधींचा विक्रम सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोडतील याची भिती राहुल गांधींनी बाळगायचे कारण नाही. अर्थात ज्या पद्धतीने हा एकच मुद्दा घेऊन राहुल गांधी आक्रमक झाले आहेत, ते पाहता मतदार संभ्रमीत होऊ शकतात हे निश्चित. त्यासाठी मोदी सरकारने संयुक्त संसदीय समीतीच्या चौकशीला सामोरे जावे आणि ‘दूध का दूध, पानी का पानी’ करुन दाखवावे हेच उत्तम.