१८ ऑक्टोबरला दसरा झाला. दसरा होऊन दोन आठवडे झाले, तरी दिवाळीच्या बाजारपेठेत कुठेही चैतन्य दिसत नाहीये. हे कुठेतरी निराशाजनक चित्र आहे. यामागची नेमकी कारणे काय आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. कपडा बाजार, सराफी बाजार, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, मिठाईची दुकाने या सगळीकडे निरुत्साह दिसत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असताना, त्याचे तीव्र पडसाद कुठेतरी बाजारपेठेत उमटलेले दिसत आहेत. अर्थव्यवस्थेला चैतन्य देण्याची ताकद ही दिवाळीमध्ये असते. पण, आज सगळीकडची क्रयशक्तीच कमी झालेली दिसून येते आहे. हे चित्र बदलण्याची शक्यताच दिसत नाही. यामागचे कारण आज उद्योग व्यवसायात आलेली मंदी, खासगी नोकरदारांची पैशाअभावी आणि अनियमित पगाराअभावी झालेली ओढाताण यामुळे लोकांच्या हातात पैसा खेळताना दिसत नाही. पैसाच नसल्यामुळे लोक खरेदीसाठी बाहेर कसे पडणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे केवळ दुष्काळी भागातच नाही, तर मुंबईसारख्या मोठय़ा शहरातील बाजारपेठेतही हा सूर उमटलेला दिसत आहे. बाजारपेठेत जेव्हा खरेदी- विक्री उलाढाल कमी होते, तेव्हा त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतो.दर वर्षीच्या तुलनेत ३० टक्केही व्यवसाय व्यापा-यांचा झालेला दिसत नाही. हे चांगले चित्र नाही. १९७२ च्या दुष्काळानंतर अशी परिस्थिती दिसत आहे. त्या काळात इंदिरा गांधींची एकाधिकारशाही होती आणि त्यांनी नुसतीच गरिबी हटावची घोषणा दिली. पण, लोकांच्या हातात पैसाच नव्हता. साखरेपासून रॉकेलपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी रांगा लागत होत्या. पण, लोकांना पैसे नसल्यामुळे किमान गरजाही भागवता येत नव्हत्या. त्या काळात झालेली दिवाळी म्हणजे शिमगाच होता. आता तशीच अवस्था पुन्हा दिसत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्याचा बोलबाला करत असताना दुसरीकडे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय गरीब होण्याची वेळ आलेली आहे. हातात पैसा नसल्यामुळे बाजारपेठेकडे माणसे वळताना दिसत नाहीत. त्यामुळे कापड व्यापारी, सुवर्ण व्यापारीच नाही, तर किराणा मालाचे व्यापारीही उदासीन आहेत. नेहमीप्रमाणे दिवाळी नाही, म्हणून व्यापारी चिंताग्रस्त आहेत. दिवाळीपूर्वी पगार वेळेत होणे, बोनस मिळणे ही आपल्याकडे परंपरा होती. आज दिवाळी म्हणजे काय हे गरिबांना सांगायचे अवघड झाले आहे. आई -वडिलांनी आपल्या मुलांना दिवाळीत काय काय आनंद असतो, हे सांगायचे कसे असा प्रश्न पडला आहे. झोपडपट्टी, गरीब कुटुंबात अत्यंत दयनीय अवस्था आहे. दिवाळीला चांगले नवे कपडे येतील, चांगले चुंगले गोडाधोडाचे लाडू, करंजी, चिवडा, चकली असे पदार्थ बनतील, किल्ले बनवले जातील, त्यावर मातीची चित्रे ठेवली जातील, आकाशकंदील आणि पणत्यांची रोषणाई होईल, दारापुढे रांगोळी काढली जाईल, असे आई-वडिलांनी लहान मुलांना सांगितले असेल. हे जर दिवाळीत मुलांना दिसले नाही, तर कसली दिवाळी म्हणून हीच मुले विचारतील.म्हणजेच ज्याप्रमाणे हे सरकार अच्छे दिन आनेवाले है म्हणत नुसतीच वाट बघायला लावते आहे. तोच प्रकार दिवाळी येणार आहे, हे गरीब आई-वडिलांना आपल्या मुलांना सांगून फसवण्याची वेळ येत आहे. याचे कारण, पगार वेळेवर न होणे, बोनस नसणे, हातात खर्चाला पुरेसा पैसा नसणे आणि क्रयशक्ती कमी झाल्यामुळे लोक बाजारपेठेत जाऊ शकत नाहीत. बहुतेक दुकानदार सांगत आहेत की, दर वर्षी जादा कामगार आम्ही दुकानात दिवाळीसाठी ठेवतो. या वर्षी नेहमीच्या कामगारांनाच काम नाही, अशी अवस्था आहे. कापड व्यापारी, इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत तात्पुरत्या स्वरूपात सेल्समनची सोय केली जाते. यंदा अशा तात्पुरते काम करणारांना कामाची संधीच नाही. कारण, बाजारपेठेत शुकशुकाट आहे. सराफी व्यापारही मंदीत आहे. सोन्याचा वाढता दर याचे कारण असले, तरी त्याहीपेक्षा लोकांकडे पैसा नाही हे जास्त भयानक आहे. सगळी सोंगे आणता येतील, पण पैशाचे सोंग आणता येत नाही, अशी अवस्था आहे. पूर्वी एक महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळायचा. वर्षभराच्या एकूण पगाराच्या ८.३३ टक्के इतका बोनस दिला जायचा. हा ८.३३ बोनस म्हणजे एक महिन्याचा पगार असायचा. आजकाल सामान्य माणसाला पगार ३० ते ४० हजारांच्या घरात असतो. म्हणजे बोनसची रक्कम त्या तुलनेत ३० ते ४० हजार असणे अभिप्रेत आहे. पण, बहुतेक संस्था या ५ ते १० हजार सानुग्रह अनुदान देतात. या एवढय़ाशा पैशात सामान्य माणूस काय काय म्हणून करणार? मुलांना कपडे खरेदी करणार की, फराळाचे जिन्नस बनवण्यास आपल्या गृहलक्ष्मीला पैसे देणार?पै-पाहुणा आला, तर त्याचे स्वागत कसे करणार, अशा अनेक चिंता त्याला आहेत. त्यामुळे त्याने खरेदीकडे पाठ फिरवलेली दिसते. सामान्य माणसांची कमी झालेली क्रयशक्ती ही बाजारपेठेची चिंता आहे. अर्थशास्त्रामध्ये बचतीच्या विरोधाभासाचा एक सिद्धांत आहे. तो सिद्धांत इथे लागू पडतो. अर्थशास्त्राने नेहमीच आपल्याला खरेदीवजा बचत असा संदेश दिला आहे. किमान गरजा पूर्ण करून असलेल्या साधनसंपत्तीची बचत करावी, असे अर्थशास्त्र सुचवते. या बचतीच्या विरोधाभासाचा सिद्धांत तितकाच महत्त्वाचा आहे. लोकांनी तेवढी बचत केली, तर तेवढय़ा बचत केलेल्या पैशांच्या खरेदीची शक्ती कमी होते. तेवढय़ा बचतीच्या पैशांची खरेदी न झाल्यामुळे तेवढी मंदी बाजारपेठेवर येत असते. यासाठी बाजारपेठेत चैतन्य राहण्यासाठी हातातील सगळा पैसा खर्च करावा, बचत करू नये, असे हा सिद्धांत सांगतो. पण, प्रत्यक्षात आज परिस्थिती इतकी विचित्र आहे की, बचत सोडा खर्चायला लोकांना पैसे नाहीत. त्यामुळे माणसांची क्रयशक्ती ठप्प झालेली आहे. आज केवळ दुष्काळामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागच अडचणीत आलेला नाही, तर सामान्य माणूस, शहरी गरीब माणूस, नोकरदार, व्यापारी सगळेच अडचणीत आले आहेत. लाखो-कोटय़वधींची उलाढाल करणारे व्यापारी हजारांत, लाखांत आले आहेत. प्रत्येकाचे नफ्याचे आणि उलाढालीचे प्रमाण कमी झाल्यामुळे व्यापार-उद्योगावर अवलंबून असलेल्या नोकरशाहीची क्रयशक्ती आणखी कमी होत आहे. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे.
शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८
दिवाळीवर दुष्काळाचे सावट
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा