गांधी, नेहरू हे नाव काँग्रेस आणि भारतीय राजकारणातून कमी करण्यासाठी, त्यांचे अवास्तव महत्त्व कमी करण्यासाठी वल्लभभाई पटेल या काँग्रेसच्याच नेत्याचे काम किती महान होते हे सांगण्याचे धोरण भाजपने आखले. त्याचाच एक भाग म्हणजे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा पुतळा आहे.देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुजरातमधील साधू बेटावर नुकतेच झाले. हा पुतळा म्हणजे भाजपची एक राजकीय खेळी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याचाच अर्थ भारतीय जनता पक्षाचा घाव कुठेतरी काँग्र्रेसच्या वर्मी बसलेला आहे. काँग्रेस पक्षातील घराणेशाही आणि व्यक्तिस्तोमावर हा घाला असल्याचे काँग्रेसजनांना जाणवल्याने त्यांनी यावर टीका केलेली दिसते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मोदींच्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा पुतळा राजकीय स्वार्थासाठी उभारल्याची टीका केली आहे. त्यामुळे भाजपला जे करायचे होते ते त्यांनी साध्य केले हे निश्चित.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उभारून दाखवला. त्याचे भूमिपूजन, पायाभरणी हे अत्यंत नियोजनबद्धपणे केले. हा पुतळा उभारण्यासाठी देशभरांतून मला लोखंड, पोलाद दान करा असे आवाहन काही वर्षापूर्वी पंतप्रधान मोदींनी केले होते. त्याला प्रतिसादही मिळाला होता. ते त्यांनी करून दाखवले. म्हणजे फक्त पुतळा उभारणी नाही तर तो कोणाचा उभारला जाणार आहे, कुठे उभारला जाणार आहे, कसा उभारला जाणार आहे, तो एवढा उंच का केला जाणार आहे, याचा गाजावाजा गेली चार वर्षे पंतप्रधान मोदींनी केला होता. हे फार मोठे नियोजन होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या पुतळ्यावर जवळपास ३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या पुतळ्याच्या पायथ्याशी सरदार पटेलांनी वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय आहे. ‘पद्मभूषण’प्राप्त शिल्पकार राम सुतार यांनी या पुतळ्याची संरचना तयार केली आहे. हे सगळे नेमके कशासाठी होते याची जाणीव हा पुतळा उभारल्यावर सर्वाना झाली. ती काँग्रेसला नेमकी बोचली म्हणून काँग्रेसने थयथयाट सुरू केलेला दिसून येतो.फक्त ३३ महिन्यांत २५० अभियंते, ३४०० मजुरांनी या पुतळ्याची निर्मिती केली आहे. या पुतळ्याच्या एका बाजूला अभयारण्य आहे, तर दुसरीकडे नर्मदा नदी आहे. भौगोलिक स्थिती आणि या पुतळ्याचे सौंदर्य पाहता या पुतळ्यामुळे या परिसरातील पर्यटन वाढेल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. म्हणजेच गुजरात कायम चर्चेत राहील याची पुरेपूर दक्षता घेतलेली दिसते. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे भूमिपूजन २०१३ मध्ये झाले, तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते; परंतु पंतप्रधान झाल्यावरही त्यांनी तो प्रकल्प पूर्ण केला. या भूमिपूजनानंतर पुढील वर्षी म्हणजे बरोबर २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाले, भाजपचे सरकार झाले. आता साक्षात पुतळा उभा झाला आहे. त्यामुळे त्याचेही नियोजन २०१४ प्रमाणे केले आहे. २०१३ ला भूमिपूजन, २०१४ ला सरकार, आता २०१८ ला पुतळ्याचे अनावरण म्हणजे पुन्हा २०१९ ला मोदीशासित भाजपचे सरकार येणार का, या भीतीने काँग्रेसला पोटशूळ उठेल यात नवल ते काय? पण त्याहीपेक्षा पंतप्रधान मोदी आणि भाजपने यामागे फार मोठे राजकारण दिसून येते.तो घाव नेमका काँग्रेसच्या वर्मी लागल्याने काँग्रेसने त्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यास सुरुवात केली. अर्थात आता काँग्रेसचा विरोध असल्याचे भासवले जात असले तरी तो चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला कुठेही विरोध नाही झाला, वाद नाही झाला, तर तो नियमित वेळेत तयार झाला. या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा केवढा परिणाम आहे हे लक्षात घेतले पाहिजे. ही युनिटी देशासाठी आहे की नाही हे माहिती नाही, पण हा भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढवण्याचा एक भाग होता हे यातून स्पष्ट दिसून येते आहे. या पुतळ्यासाठी शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांनीही आपल्याकडील लोहदान दिले होते. ते लोखंड वितळवून, त्याचा रस काढून या पुतळ्यात किती गेला याचा हिशोब कोणी करणार नाही. पण आमचे योगदान आहे हे समाधान अनेक लोहदात्यांना मिळेल; परंतु या लोखंडाने फार मोठी पाचर काँग्रेसच्या वर्चस्वाला मारली आहे, हे निश्चित.एखादा पुतळा उभारून काँग्रेसचे वर्चस्व कसे कमी होईल, असा प्रश्न अनेकांना पडेल कदाचित. पण त्यातील वास्तव फार महत्त्वाचे आहे. या पुतळा उभारणीनंतर अपेक्षित प्रतिक्रिया काँग्रेसजनांकडून आल्याच. तेच भाजपला अपेक्षित होते. तीच भाजपची या राजकीय खेळीतील जीत म्हणावी लागेल. म्हणजे अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यावर टीका केली. पण शशी थरूर यांनी महात्मा गांधींचा पुतळा एवढा मोठा का नाही उभा केला, असा प्रश्न उपस्थित केला. हाच भाजपचा डाव होता. हा प्रश्न राहुल गांधींकडून केला गेला असता तर आणखी मजा आली असती. पण काँग्रेसचे जे पटकन रिअ‍ॅक्ट होणारे बोलघेवडे आहेत त्यापैकी शशी थरूर, मणीशंकर अय्यर, दिग्विजय सिंग, कपिल सिब्बल, पी. चिदंबरम यांपैकी कोणीतरी हा मुद्दा उपस्थित करणार हे भाजपला माहिती होतेच, तो शशी थरूरांनी केला.प्रत्यक्षात या पुतळ्यामुळे गुजरात, गांधी, पटेल आणि मोदी यांचीच नावे चर्चेत राहणार आहेत याची सोय केलेली आहे. हे तीनही नेते गुजरातचे होते. गुजरातचे नाव यामुळे मोठे होईल. त्याचप्रमाणे काँग्रेस जी गांधी-नेहरू या नावाभोवती फिरते आहे, त्यामध्ये गांधी-नेहरूंपेक्षाही सरदार पटेलांना मोठे करून ठेवले आहे. आज तरी सरदार पटेलांइतका मोठा पुतळा या देशातच नव्हे तर जगातही कुठेच महात्मा गांधींचा नाही की नेहरूंचा नाही. त्यामुळे पटेलांचे वजन वाढवून काँग्रेसमधला नेहरू-पटेल वाद बाहेर काढण्याची संधी यातून भाजपला मिळाली आहे. हा गुजराती व्यवहारीपणा आहे.सरदार पटेल हे काँग्रेसचे नेत होते. ते महात्मा गांधींचे शिष्य होते. शिष्याचा पुतळा गुरुपेक्षा मोठा कसा असे प्रश्न यातून काँग्रेसने उभे केले. आता गुरुपेक्षा चेला मोठा झाला पाहिजे ही भारतीय संस्कृती आहे, आपला शिष्य आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ व्हावा असे वाटणे ही भारतीय संस्कृती आहे. पण या संस्कृतीचे काँग्रेसला विस्मरण झालेले आहे हे दाखवण्यातही भाजप यातून यशस्वी झालेली आहे.महात्मा गांधी हे राष्ट्रपिता. त्यांचे दोन शिष्य म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल. एक छाताडावर कोमल गुलाबाची फुले लावून हिंडणारे, तर दुसरे पोलादी पुरुष. कोमल गुलाब आणि मजबूत लोखंड अशा या दोन व्यक्तिमत्वांच्या स्पर्धेत गुलाबाने लोखंडाचा काटा काढला. त्या काळात कदाचित नेहरुंच्या ऐवजी सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते. पण ज्या संस्थानांमध्ये, सरंजामशाहीमध्ये भारत गुरफटला होता, ती संस्थाने विलीन करणे, त्यांचे एकत्रीकरण करून स्वतंत्र भारतात त्यांचा समावेश करण्याची जबाबदारी वल्लभाई पटेल यांच्यावर पडली आणि त्या गडबडीत पंतप्रधानपदाची माळ नेहरुंच्या गळ्यात पडली. काँग्रेसकडून आपल्याच माणसांचे खच्चीकरण करण्याचे काम तेव्हापासून सुरु झाले. याला चोख उत्तर देण्याचे काम भाजपकडून पंतप्रधान मोदींकडून होताना दिसते आहे.‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, एकता दौड, यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस आहे. नेहरु आणि पटेल हे एकाच तोडीचे, एकाच पक्षाचे नेते होते तर पंडित जवाहरलाल नेहरूंचा वाढदिवस दरवर्षी १४ नोव्हेंबरला बालदिन म्हणून साजरा केला जातो. मग सरदार पटेल यांचा का नाही असा वाढदिवस साजरा केला गेला? सरदा वल्लभभाई पटेल यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच इंदिरा गांधींच्या हत्येचा दिवस आहे. तीच इंदिरा गांधींची पुण्यतिथी आहे. त्यामुळे ३१ ऑक्टोबर हा इंदिरा गांधींचा स्मृतीदिन म्हणून साजरा होऊ लागला. सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा पूर्णपणे पुसून टाकण्याचा प्रयत्न काँग़्रेसकडून सातत्याने झाले. त्याला मोदींनी या पुतळ्याच्या माध्यमातून उत्तर दिलेले आहे.पंडित नेहरु आणि सरदार पटेल हे दोघे महात्मा गांधींचे डावे उजवे खांदे होते, डावे उजवे हात होते. मग शरीराचा एक भाग खुजा आणि दुसरा भाग फक्त कार्यान्वीत असेल तर चालेल कसे? म्हणजे गांधी हत्येनंतर ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदी घातली होती, त्याच पटेलांचा एवढा उदोउदो भाजप किंवा संघ किंवा मोदी कसे काय करू शकतात? तर यामागे ‘लोहा लोहे को काटता है’ हेच उत्तर आहे.एखादी रेषा काढलेली असेल, तर ती न पुसता लहान करायची असे कोणी सांगितले तर त्याला उत्तर एकच असते. ते म्हणजे त्या रेषेशेजारी दुसरी मोठी रेषा काढणे. आज गांधी, नेहरु हे नाव काँग्रेसच्या आणि भारतीय राजकारणातून कमी करण्यासाठी, त्यांचे अवास्तव महत्व कमी करण्यासाठी वल्लभभाई पटेल या काँग्रेसच्याच नेत्याचे काम किती महान होते हे सांगण्याचे धोरण भाजपने आखले. त्याचाच एक भाग म्हणजे हा पुतळा आहे. या पुतळ्याच्या पायथ्याशी गुलाबाची फुले आणि ६० प्रकारची फुले आहेत. गुलाब हे नेहरुंना प्रिय होते. मुले आणि फुले यांच्यात ते रमायचे. त्यामुळे त्यांना पायाशी ठेऊन पटेल यांचे महत्व वाढवण्याचे काम भाजपने केले आणि आपली राजकीय खेळी यशस्वी केली आहे.