राजकारणातील घराणेशाही हा मुद्दा बरेच दिवस मागे पडला होता. तो पुन्हा एकदा नव्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काढला आहे. गेली दोन अडीच दशके घराणेशाहीचे राजकारण हा फार मोठा पगडा भारतीय लोकशाही आणि राजकारणावर होता. अर्थात हे जनतेने स्वीकारलेले होते. कारण, लोकशाही असली तरी डोक्यातील राजेशाही आणि सरंजामशाही अजूनही उतरलेली नाही, हेच त्याचे कारण. यापासून कोणताही पक्ष चुकलेला नाही हेही तितकेच खरे. नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे नाव न घेता, घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली. भारत गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे. इथे पंतप्रधानांचा मुलगा पंतप्रधान होतो, मुख्यमंत्र्याचा मुलगा मुख्यमंत्री. यामुळे काही ठरावीक लोकांच्या हातात पैसा आला, तर बाकी सगळा देश गरीबच राहिला. हे आता बदलायला हवे, लोकशाहीसाठी ते घातक आहे, अशी घणाघाती टीका नितीन गडकरी यांनी केली. भारतीय जनता युवा मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते.पण, घराणेशाहीची ही परंपरा बदलणे मतदारांच्या हातात आहे, राज्यकर्त्यांच्या नाही. मतदारांनी जोपर्यंत ही सरंजामशाही नाकारलेली नाही, तोपर्यंत यात बदल होणे शक्य नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर काही काळाकरिता लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले होते, पण त्या पदासाठी इंदिरा गांधींनी अगोदरच तयारी करून ठेवली होती. कारण, राजेशाहीच्या वातावरणातून भारत बाहेरच पडला नव्हता. राजे आणि संस्थानिकांच्या राजवटीची सवय इतकी अंगवळणी पडली होती की, राजाच्या माघारी त्याचा पुत्रच गादीवर येणार हे निश्चित होते. त्यालाच राज्यकारभार द्यायचा, त्यालाच राज्याभिषेक होणार हे ठरलेले होते. तोच प्रकार स्वातंत्र्यानंतरही सुरू राहिला. त्यामुळे ही सरंजामशाहीची प्रवृत्ती तशीच सुरू राहिली. हा बदल तेव्हाच झाला असता, जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली; परंतु भारतीय मानसिकतेने आणि त्यातल्या त्यात नेहरू गांधी घराण्याचे मांडलिकत्व पत्करलेल्या काँग्रेसी मानसिकतेने त्यातून बाहेर पडू दिले नाही. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर कितीतरी लायक आणि अनुभवी असे लोक पंतप्रधानपदासाठी काँग्रेसमध्ये होते. पण, फारसा अनुभव नसलेल्या राजीव गांधींनाच पंतप्रधानपदी बसवायचे, असा विचार काही लाचार काँग्रेस नेत्यांनी केला आणि यशवंतराव चव्हाणांसारख्या श्रेष्ठ नेत्यांचाही त्या पदासाठी विचार केला नाही. तिथेच लोकशाहीचा खून होऊन घराणेशाहीची बिजे घट्ट केली गेली. सहानुभूती आणि स्वच्छ प्रतिमा, तरुण चेहरा या भांडवलावर राजीव गांधींनी पाच र्वष निभावून नेली. त्यामुळे बापानंतर मुलगा किंवा मुलगी, आईनंतर मुलगा किंवा मुलगी, पतीनंतर त्याची पत्नी किंवा मुलगा, मुलगी ही घराणेशाहीची परंपरा रुजली.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही बारामती या मतदारसंघात दुस-या कोणाचा विचार केला नाही. हा मतदारसंघ झाल्यापासून शरद पवार, अजित पवार आणि पुन्हा शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडेच हा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस लोकशाहीची भाषा करते, पण दुस-या कोणाला संधी देण्याची त्यांचीही मानसिकता नाही. कारण, घराणेशाहीची बिजे खोलवर रुजली आहेत. यावरच नितीन गडकरींनी नेमके बोट ठेवले आहे. महाराष्ट्रातील दुसरा छोटा प्रादेशिक पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हा पक्ष मोठा केला. पण, बाळासाहेबांच्या माघारी त्यांनी उद्धव ठाकरे यांचीच पक्षप्रमुख म्हणून निवड केली. तुलनेने अधिक योग्य असलेल्या राज ठाकरे यांना डावलून आणि ज्येष्ठ शिवसैनिकांना डावलून हे पद दिले गेले. त्यानंतर युवानेते म्हणून उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनाही पुढे करण्यात आले. शिवसेनेतील ज्येष्ठ नेतेसुद्धा जेव्हा या वयाने निम्मा किंवा मुलापेक्षा लहान असलेल्या आदित्य ठाकरेंच्या पाया पडतात, तेव्हा अंगावर शहारा येतो, किती ही लाचारी असा प्रश्न पडतो. ही घराणेशाही सरंजामशाही डोक्यात असल्यामुळे आहे. गडकरी यांनी मारलेला टोला हा फक्त काँग्रेसला आहे असे वाटले, तरी या संपूर्ण मानसिकतेला तो आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८
राजेशाही अजून डोक्यातच आहे!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा