औद्योगिक गुंतवणुकीत नेहमी अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राला कर्नाटकने मागे टाकल्यावरून शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. अर्थात शिवसेनेच्या या टीकास्त्राला काडीचाही अर्थ नाही. याला आततायीपणाच म्हणावे लागेल. कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्र का घसरला, असा सवाल शिवसेनेने केला आहे. त्याला उत्तर एकच आहे, ते म्हणजे सत्तेत भाजपबरोबर शिवसेना आहे. सत्तेची फळं चाखायची, लाभ उठवायचा, स्वत:ची तुमडी भरायची आणि ढेकर दिल्यावर सरकारला शिव्या घालायच्या. असल्या शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेमुळेच गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे, हे शिवसेनेने लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे शिवसेनेच्या या मतांकडे कोणीही ढुंकून बघणार नाही, हे निश्चित.शिवसेना म्हणते, गुजरात विकासाचे मॉडेल संशयाच्या भोव-यात सापडले असून, तिथेही गुंतवणूकदारांची संख्या घटली आहे. कर्नाटकात गेल्या दहा वर्षापासून बिगर भाजप शासन सत्तेवर आहे व महाराष्ट्र, गुजरातेत भाजपचे मेक इन इंडिया राज्य आहे. तरीही या दोन्ही राज्यांची औद्योगिक, आर्थिक घडी विस्कटलेली दिसते. या शिवसेनेच्या टिपण्णीला काहीही अर्थ नाही. गुजरात हे विकासाचे मॉडेल होते ते नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना. आता ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी संपूर्ण देशाचा विचार केला पाहिजे. त्यामुळे समतोल विकास साधण्यासाठी जिथे गुंतवणूक कमी आहे, विकास कमी आहे, तिकडे लक्ष देणे हे स्वाभाविक आहे. त्यातच कोणताही सत्ताधारी जिथे आपली सत्ता आहे त्यापेक्षा जिथे सत्ता नाही, तिथे विकासकामे करून तो भाग आपल्या सत्तेखाली आणण्याचा प्रयत्न करतो. कोणताही आमदार, नगरसेवक विरोधकांच्या भागातील कामे तातडीने करून तिथल्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. आपली कार्यक्षमता दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. ही साधी गोष्ट शिवसेना नेत्यांना माहिती नाही. अर्थात त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते. वातानुकूलीत गाडीत फिरून या गोष्टी समजत नाहीत. शिवसेना पक्षप्रमुखांनी साधी महापालिकेचीच नाही, तर महाविद्यालयीन निवडणूकही लढवलेली नाही, त्यामुळे त्यांना कामाचा काहीच अनुभव नाही. साहजिकच ते अशी वक्तव्ये करतील यात काहीच शंका नाही. मात्र, यामुळे कर्नाटकात भाजपची केंद्रात सत्ता आल्यानंतर, मोदी सरकारच्या काळात गुंतवणूक वाढली आहे, हे दिसून आले आणि शिवसेनेने त्याची कबुली दिली आहे हे महत्त्वाचे. या आधीच्या सरकारच्या काळात ती होत नव्हती, हे विशेष दिसून आले आहे. पण, शिवसेनेचा अभ्यास कमी पडतो हे यातून स्पष्ट होताना दिसते आहे.अर्थहीन टीका करताना शिवसेना म्हणते की, भाजपच्या विकासाचे अजगरी वेटोळे महागडय़ा मेट्रोभोवतीच पडले आहे. काही उद्योगपतींच्या सोयीसाठी अवनी नावाच्या वाघिणीस मारले जाते. मेट्रोचा प्रकल्प होत असताना, तो विकासात किंवा गुंतवणुकीत धरायचा नाही, असे शिवसेनेचे मत आहे काय? मेट्रोमुळे मुंबई महाराष्ट्रात गुंतवणूक झाली आहे किंवा तो विकासाचा भाग आहे हे शिवसेनेला मान्य नाही का? मेट्रोमुळे मुंबईकरांची सोय झाली नाही, असे शिवसेनेला वाटते का? असे असेल, तर लाखो प्रवासी दररोज मेट्रोने प्रवास करतात तो काय नॅशनल पार्कमधील लुटुपुटुच्या रेल्वेप्रमाणे करतात की, माथेरानच्या राणीप्रमाणे गंमत म्हणून प्रवास करतात? पण, महाराष्ट्रात जर कमी गुंतवणूक होत असेल किंवा काही कमतरता, अडथळे असतील, तर त्याला कळत-नकळत, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शिवसेनाच जबाबदार आहे हे लक्षात घेतले पाहिजे. शिवसेनेच्या दुटप्पीपणामुळे गुंतवणूकदार महाराष्ट्रात यायला घाबरतात. कारण, भाजपने कुठला प्रकल्प आणला, तर सरकारमध्येच राहून शिवसेना त्याला विरोध करणार. ही भीती, दहशत गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाली असावी, हे शिवसेनेने लक्षात घेतले पाहिजे. शिवसेना वरवर म्हणते आहे की, कर्नाटकने झेप घेतली याचे दु:ख नाही. पण, महाराष्ट्र का घसरला याचीच टोचणी असल्याची खंत आहे. शिवसेनेला कर्नाटकच्या विकासाची सल आहे. पण, कर्नाटकने तिथल्या भाषेसाठी धरलेला आग्रह शिवसेनेला दिसत नाही. इथल्या मराठी शाळा, मराठी भाषा मरत असताना त्याबाबत कर्नाटकचे अनुकरण करावे, असे सेनेला वाटत नाही. कारण, सेनेच्या नेत्यापासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळय़ांच्या मुलांनी इंग्रजी भाषेत शिकायचा विडा उचलला आहे. केवळ टीका करून काही होत नाही, तर विकासाचा काही कार्यक्रम हाती असावा लागतो. कोणत्याही गोष्टीला विरोध करणे सोपे आहे, पण त्याच्यासाठी पर्याय सुचवण्यासाठी अभ्यास असावा लागतो. तो नसला की, आततायीपणा केला जातो.शिवसेनेने म्हटले आहे की, काम कमी व बोलणे-डोलणे जास्त असा प्रकार भाजपशासित राज्यांबाबत दिसत असेल, तर विकासाच्या डोक्यावर खिळा मारण्याचाच हा प्रकार आहे. जगभरातील राष्ट्रप्रमुखांना मोदी हे गुजरातेत घेऊन जातात व स्वराज्याचे मार्केटिंग करतात. पण, जपानची बुलेट ट्रेन सोडली, तर नवा कोणता उद्योग येत आहे. मुंबईतील अनेक व्यापार, मुख्यालये, डायमंड बाजार अहमदाबाद, बडोदा, सुरतला नेले आहेत. मग हे उद्योग गुजरातला गेल्यावर शिवसेना का विरोध करते? ते उद्योग जाण्यापूर्वीच थांबवले असते, तर त्यात शिवसेनेची भूमिका प्रामाणिक आहे असे म्हणता येईल. म्हणजे बलात्कार होताना डोळय़ाने पाहायचे आणि नंतर बलात्का-याच्या नावाने शंख करत बसायचे, असाच प्रकार शिवसेनेबाबत दिसून येतो. तो घडत असताना त्याला विरोध केला असता, तर त्याला पुरुषार्थ म्हणतात. पण, फक्त नामर्द आणि मर्दाची औलाद असले शब्द भाषणात वापरणारे प्रत्यक्षात कुठलीच मुर्दुमकी गाजवताना दिसत नाहीत. त्यामुळे आता रामनाम जपण्याचा प्रकार करावा लागत आहे, हेच खरे. याला रामनाम जपना पराया माल अपना म्हणतात; परंतु अगोदर काहीतरी विकासाचे मॉडेल स्वत:जवळ असावे लागते, ते आपल्याकडे काहीच नाही अन् दुस-याच्या मॉडेलला नावे ठेवण्यात काय अर्थ आहे? त्या वाघिणीसाठी गळा काढणा-या शिवसेना पक्षप्रमुखांनी आपल्या बालहट्टापायी मुंबईत पेंग्वीन आणले आणि ते हवामानामुळे मेले, त्याबाबत शोक व्यक्त केला होता का, याचे उत्तर द्यावे.