आपल्याकडे कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती होत असते. साथ येत असते किंवा फॅड येत असते; परंतु एखाद्या चांगल्या गोष्टीचे फॅड, फॅशन अनुकरण ठीक आहे, पण वाईट गोष्टीचे झाले, तर ते फार भयानक असते. शेतक-यांच्या एकापाठोपाठ होणा-या आत्महत्या हे त्याचेच द्योतक आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ याला कंटाळून आत्महत्या हाच उपाय आहे, असा समज करून घेतला आणि ती केली की, त्याच्या आसपासच्या लोकांवर त्याचा परिणाम होतो. ती बातमी सर्वत्र पसरली की, त्याचे अनुकरण होते. एकापाठोपाठ शेतकरी आत्महत्या करतात. कारण, या दुष्टचक्रातून त्यांना बाहेर काढण्याची क्षमता सरकारमध्ये नाही की, कोणत्याही समाजव्यवस्थेत नाही. असे अनुकरण हे घातक असते.गेल्या दोन महिन्यांपासून ‘मी टू’ नावाचे एक वादळ आले. त्याबरोबर ‘मी टू’ ‘मी टू’ करत अनेकजण पुढे आले आणि त्याचे अनुकरण होऊ लागले. लाट आली. अशा लाटा आपल्याकडे येतात आणि फार मोठा अनर्थ होत राहतो. म्हणजे फॅशनचे किंवा फॅडचे अनुकरण केले तर मान्य करता येईल की, ही तरुणाई आहे. विराट कोहलीसारखी दाढी ठेवणे किंवा हेअर स्टाईल करणे, यो यो हनी सिंगचा लूक तरुणांनी ठेवणे आणि त्याचे अनुकरण करणे मान्य करता येईल. पण, काही चुकीच्या निर्णयाचे अनुकरण झाले, तर चिंतेची बाब असते. हे सगळे सांगण्याचे कारण राजस्थानातील दोन दिवसांपूर्वीची वेदनादायी घटना.राजस्थानातील रैनी या गावात राहणा-या मनोज मीना, सत्यनारायणन मीना, रितूराज मीना आणि अभिषेक मीना या चौघांनी मंगळवारी रात्री ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. नोकरी मिळत नसल्याने चौघेही निराश होते, असे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. या घटनेवरून राजकारणही सुरू झाले असून, काँग्रेसने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भाजपने देशातील तरुणांवर ही वेळ आणल्याची टीका काँग्रेसने केली आहे; परंतु त्याचे राजकारण थांबले पाहिजेच, पण त्यापेक्षा अनुकरण थांबले पाहिजे याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.राजस्थानातील अलवार जिल्ह्यातील राजगड-रैनी या गावात राहणा-या या चौघांनी मंगळवारी रात्री ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. त्यांचे मित्र राहुल आणि संतोष हे देखील त्यांच्यासोबत होते. त्यांच्या डोळ्यादेखतच या चौघांनी ट्रेनसमोर उडी मारली. राहुल आणि संतोषने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते चौघेही नोकरी मिळत नसल्याने निराश होते. त्यांना शेतीदेखील जमत नव्हती. आपण ओझं म्हणून जगतोय, अशी भावना त्यांच्या मनात आली होती. त्या चौघांनी संतोष आणि राहुलला देखील आत्महत्या करणार का, असे विचारले. पण, त्या दोघांनी नकार दिला. काही जमत नाही किंवा नोकरी मिळत नाही म्हणून अशाप्रकारे आत्महत्या करण्याची वेळ तरुणांवर येणे हे फार धोकादायक आहे. यातील काहींनी आत्महत्या केल्या असल्या, तरी अशा परिस्थितीत काही नोकरी मिळत नाही म्हणून कोणी गुन्हेगारी जगताकडेही वळू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे यावरून एक लक्षात घेतले पाहिजे की, काही न येण्याला आमची शिक्षण व्यवस्था दोषी आहे. व्यवहारात उपयोगी पडणारे आणि रोजगार देणारे शिक्षण आम्ही देत नाही हेच यातून दिसते. त्याचप्रमाणे असलेल्या मनुष्यबळाला आपण संधी देऊ शकत नाही, हे त्या सरकारचे अपयश आहे. अशा परिस्थितीत अशा घटनांची पनुरावृत्ती होऊ न देणे, ही सरकारची जबाबदारी आहे.या घटनेत आत्महत्या केलेल्या तरुणांच्या सोबत असलेल्या मित्रांनी सांगितले की, आम्ही रेल्वे रुळालगत थांबलो होतो. मला भूक लागली होती. आपण घरी जाऊया असे मी त्यांना सांगितले. पण, त्यांनी अर्धा तास थांबायला सांगितले. यानंतर चौघेही मोबाईलवरून कुटुंबीयांना फोन करत होते. थोडय़ा वेळाने सत्यनारायणनने माझ्याकडे सिगारेट मागितली. सिगारेट ओढत असतानाच, ट्रेन आली आणि चौघांनीही ट्रेनसमोर झोकून देत आत्महत्या केली. राहुल आणि संतोषच्या जबाबावरून नोकरी नसल्याने ते चौघे हताश होते आणि यातूनच त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे दिसते. यातील खरे-खोटे काय किंवा नेमके कारण काय हा भाग वेगळा असला, तरी नोकरी नाही म्हणून तरुणांनी आत्महत्या केल्याचे प्रथम वृत्त आहे. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळू शकते. ही प्रेरणा अत्यंत घातक असेल.आता यावरून दुसरीकडे राजकारणही सुरू झाले आहे. राजस्थानात निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचा फायदा राजकीय पक्ष घेण्याचा प्रयत्न करतील. अर्थात या प्रकाराला प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार म्हणावे लागेल. भाजपने पाच वर्षात १० कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. पण, प्रत्यक्षात ८.५ लाख जणांनाच रोजगार मिळाला. केंद्र सरकारमुळेच तरुणांवर ही वेळ ओढावली, असे या घटनेनंतर काँग्रेसने म्हटले आहे. अर्थात यामध्ये सरकारचे अपयश आहेच. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाला रोजगार देता न येणे, हे सरकारचे अपयशच म्हणावे लागेल. सरकार भरपूर घोषणा करते आहे. शासकीय योजनांमधून कर्ज देऊन तरुणांना उद्योगधंद्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल असे सांगते. पण, कोणतीही बँक अशा तरुणांना रोजगारासाठी कर्ज देत नाही, हे वास्तव आहे. सरकारची मुद्रा ही कर्जयोजना पूर्णपणे फसली असून, सरकारी राष्ट्रीयीकृत बँकांच्या कामचुकार धोरणाने या योजनेचा फायदा कोणाला मिळत नाही. त्यामुळे सरकारला फसवी आकडेवारी देण्याकडे बँकांचा कल आहे. किती तरुणांना याचा लाभ मिळाला, अशी आपण माहितीच्या अधिकारात बँकांकडे माहिती मागवू शकत नाही. त्यामुळे बँका कर्ज न देता सरकारची फसवणूक करत आहेत. या असल्या अंध कारभारामुळे ना रोजगार, ना नोकरी. त्यामुळे तरुणांनी आत्महत्या केली. यावरून सरकारने काहीतरी धोरण आखले पाहिजे. नाहीतर, बेकारीला कंटाळून आत्महत्या केली, अशा रोज बातम्या आम्हाला छापाव्या लागतील. असल्या बातम्या छापायला लागू नयेत, यासाठी निर्णय घेतला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा