भारतीय राजकारणात आज सर्वात अनुभवी आणि दिग्गज कोण असतील, तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार. राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि केंद्रातील महत्त्वाची पदे भूषवणारे आणि ५० वर्षाहून अधिक काळ राजकारणात असलेले शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीत महाभारत युद्धातील भीष्म पितामहप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या समोर येणार आहेत. त्याचवेळी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे सरसावले आहेत, तर ‘इस जंगल के हम दो शेर’ अशा पद्धतीने आपल्याच धुंदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह वावरताना दिसत आहेत. त्यामुळे या आगामी काळातील राजकारणात आपल्याला इसापनीतीतील सिंह, बैल आणि कोल्हा ही गोष्ट पाहायला मिळणार हे निश्चित आहे.भारतीय जनता पक्षाने गेल्या साडेचार वर्षात काय केले यापेक्षा काय नाही केले याला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महत्त्व असणार आहे. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाचा २०१४ चा जाहीरनामा भाजपला धोकादायक ठरू शकतो. या निवडणुकीत भाजपने सर्जिकल स्ट्राईक, परदेशी गुंतवणूक, स्वच्छता अभियान, आयुष्मान भारत अशा योजनांचा बाजार मांडायचा प्रयत्न केला तरी त्यांनी जाहीर केलेल्या रोजगार निर्मिती, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होणार, परदेशातील काळा पैसा भारतात आणणार या त्यांच्या ‘अच्छे दिन आनेवाले है’च्या आश्वासनांचे काय झाले हा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित होणार आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी ‘राफेल, राफेल’ करून कंठशोष करत आहेत. हे राफेलचे विमान नेमके कसे जमिनीवर आणायचे हे राहुल गांधींच्या लक्षात येत नाही. त्याचवेळी पंतप्रधानपदाची सुप्त इच्छा मनात बाळगून विरोधी पक्षांची समविचारी पक्षांची आघाडी करू पाहणारे शरद पवार हे ऐनवेळी काय गोंधळ घालतील हे सांगता येत नाही. म्हणूनच इसापनीतीतील शह-काटशहांच्या गोष्टींपेक्षा मोदी-अमित शाह यांची ही निवडणुकीची कथा अधिक रंजक असेल. त्यात महत्त्वपूर्ण भूमिका शरद पवार आणि राहुल गांधींची असेल यात शंकाच नाही.इसापनीतीतील या कथेत वनराज सिंह आजारी पडलेला असतो. त्याच्या अंगाला प्रचंड दरुगधी येत असते. त्या सिंहासमोर एकदा एक बैल आणि कोल्हा सिंहाची तब्ब्येत बघायला येतात. आजारी पडलेला असला तरी सिंहच तो. परंतु हे बैलाला काय माहिती? कोल्हा मात्र धूर्त असतो. आजारी असला तरी जंगलचा राजा सिंह आहे, त्यापुढे आपली ताकद किती आहे याची जाणीव त्या कोल्ह्याला असतेच. सिंह दोघांनाही विचारतो, गेल्या काही दिवसांपासून मी आजारी आहे. त्यामुळे माझ्या अंगाला दरुगधी येते आहे का? त्यावर कोल्हा म्हणतो, मला काही दिवसांपासून खूप सर्दी झालेली आहे. त्यामुळे मला कसलाच वास येत नाही. याचे उत्तर आज तरी मी देऊ शकणार नाही. पण हाच प्रश्न बैलाला विचारल्यावर बैल अगदी भोळसटपणे उत्तर देतो. ‘शी शी खूपच दरुगधी सुटली आहे तुमच्या अंगाला. अगदी बसवत नाही इथे.’ हे ऐकल्यावर सिंह संतापतो आणि एकच पंजा मारून बैलाच्या नरडीचा घोट घेतो. कधी कधी खरे बोलणे घातक असते, त्यापेक्षा ‘मौनं सर्वार्थ साधणं’ ही भूमिका योग्य असते. याचे ज्ञान कोल्ह्याला असल्यामुळे तो सर्दीचे नाटक करतो आणि स्वत:चा बचाव करतो. हीच कथा आपल्याला आगामी लोकसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे. यातील सिंह कोण, कोल्हा कोण आणि बैल कोण हे वेगळे सांगायची गरज नाही.नरेंद्र मोदींची लाट संपली की, अजूनही आहे हे लोकसभा २०१९ च्या निवडणूक निकालापर्यंत कोणीच सांगू शकणार नाही. कितीही निवडणूकपूर्व अंदाज आले तरी ते खरे असतीलच असे नाही. गुजरातमध्ये संख्याबळ कमी झाले, पोटनिवडणुकीत पराभव झाला आणि कर्नाटकात यशाने हुलकावणी दिली असली तरी भाजपची लाट पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे हे सांगणे धाडसाचेच होईल. अशा परिस्थितीत मोदींच्या विरोधात रान उठवण्यासाठी नेमके कोणते मुद्दे पुढे आणले पाहिजेत आणि काय केले पाहिजे याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे भांबावलेले दिसतात. कोणते मुद्दे उचलायचे हे शरद पवार आताच सांगणार नाहीत. त्यामुळे अविश्वासाच्या ठरावानंतर आता २०२४ ची तयारी करा, असे सांगणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताकदीला आव्हान देणे तितकेसे सोपे नाही हे सर्वच पक्षांनी ओळखलेले आहे. त्यामुळेच सर्व पक्ष एकत्रित येऊन आपण या सिंहाला टक्कर देऊ, कोंडीत पकडू अशी रणनीती आखली जात असताना त्या शिकारीचे नेतृत्व राहुल गांधींकडे जाऊ नये यासाठी मात्र प्रत्येकजण जागृत आहे.कारण ‘शिकार खुद यहा शिकार हो गया’ असे काही होऊ नये म्हणून प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. परंतु एकीकडे आघाडीचे, समविचारी पक्षांचे एकीकरणाचे प्रयत्न सुरू असतानाच राहुल गांधी मात्र एकटेच शिकारीला बाहेर पडले आहेत. इथेच त्यांची फसगत होताना दिसते आहे. आज राहुल गांधींशिवाय अन्य कोणताही पक्ष राफेलबाबत इतक्या स्पष्टपणे मोदी सरकारवर बोलत नाही. पण राहुल गांधींनी मात्र गेले तीन महिने सातत्याने राफेल राफेल नावाने गजर चालवले आहे. राफेल, मोदी, अंबानी यांच्याशिवाय कोणताही विषय राहुल गांधी बोलायला तयार नाहीत. अंबानींना ३० हजार कोटी रुपये दिले इथपासून ते चौकीदार चोर है म्हणेपर्यंत राहुल गांधी आदळआपट करत आहेत. सर्वच विरोधी पक्षांना बरोबर घेऊन जायचा विचार असला तरी काँग्रेस अध्यक्षांच्या बाजूने कोणताही पक्ष राफेलवरून बोलताना दिसत नाही. आजूबाजूला खासगीत बोलतील पण राहुल गांधींप्रमाणे जाहीरपणे कोणीही बोलत नाही. कारण मित्र पक्षातील अनेक कोल्हे या बैलोबाला बोलते करून बळीचा बकरा बनवत नाहीत ना, असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. म्हणूनच ही निवडणूक म्हणजे इसापनीतीतील सिंह, कोल्हा आणि बैलाची कथा बनताना दिसते आहे.राफेल करारावरून राहुल गांधींनी हल्ले चढवले असले, तरी शरद पवारांनी त्यावर अत्यंत सावध भूमिका घेतलेली दिसते. मोदींनी या व्यवहारात भ्रष्टाचार केला, अंबानींचा फायदा केला किंवा कसलीच टीका शरद पवारांनी केलेली नाही. या प्रकरणात मोदींनी भ्रष्टाचार केलेला नाही, अशी क्वीनचिटच त्यांनी दिली आणि हळूच संयुक्त संसदीय समितीमार्फत हवे तर चौकशी करावी आणि त्या चौकशीला मोदींनी सामोरे जावे अशी पुष्टी जोडली. ही सावध केलेली प्रतिक्रिया म्हणजे दरुगधी असलेल्या सिंहाला मला सर्दी झालेली आहे, असे सांगण्याचाच प्रकार आहे, तर राहुल गांधी मात्र दरुगधी सुटली म्हणून नाक दाबून घेत आहेत.देशात मोदींची लाट आहे की नाही, यापेक्षा निवडणुका जिंकायची चटक भाजपला लागलेली आहे. ऐनवेळी कोणते मुद्दे उकरून काढून कोणत्या घोषणा करायच्या आणि कसली भावनिक लाट निर्माण करायची हे तंत्र भाजपला विशेषत: मोदी-शाह जोडीला चांगले जमले आहे. त्यामुळे बोलेल त्याचा एरंड खपतो, पण न बोलेल त्याचा गहूही खपत नाही, या व्यापारी न्यायाने राहुल गांधींचे दात त्यांच्या घशात घालून आपला माल कसा चोख आहे हे दाखवून काँग्रेसला धडा शिकवण्यात ते माहीर आहेत.राफेलबाबत नेमका काय व्यवहार झाला, करारात कशी बदलाबदली झाली याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आपली भूमिका मांडायला सांगितले. सरकारने अगोदर बंद पाकिटातून भूमिका मांडली, नंतर व्यवहाराचीही माहिती दिली. त्याचवेळी राफेलच्या निर्मितीसाठी दसॉल्टने स्वत:हून अनिल अंबानींच्या कंपनीची निवड केली होती. केवळ अंबानींशीच नव्हे, तर अन्य ३० कंपन्यांशी आमचा करार झाला आहे, असे स्पष्ट करतानाच, मी खोटं बोलत नाही. तशी माझी ख्याती नाही आणि सीईओ पदावरच्या माणसाला तसे करताही येत नाही, अशा शब्दांत दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. अनिल अंबानींच्या कंपनीशी झालेल्या कराराबाबत आम्ही या आधीही निवेदन दिले आहे. त्यात काहीही खोटे नाही. काँग्रेस पक्षाने आमच्या कंपनीविरुद्ध केलेले आरोप दुर्दैवी आहेत. काँग्रेस पक्षाशी आमचे खूप जुने संबंध आहेत. नेहरू पंतप्रधान असताना १९५३ मध्ये आम्ही भारत सरकारशी पहिला करार केला होता. अन्य पंतप्रधानांसोबतही आम्ही काम केले आहे. आम्ही भारतासोबत काम करतो. कोणत्याही पक्षासाठी काम करत नाही, असे ट्रॅपियर म्हणाले आणि राहुल गांधींच्या आरोपांना चांगलीच चपराक बसली होती. तरीही यावरून ते मागे न हाटता मोदींची चोरी पकडली गेली, असे म्हणत राहिले.परंतु न्यायालयाला सगळी माहिती सरकारने दिल्यानंतर आता त्यावर काहीही बोलणे योग्य नाही हे अन्य पक्षांनी विशेषत: शरद पवारांनी ओळखले आणि काहीही भाष्य करण्यास तूर्तास नकार दिला. आता काँग्रेसने हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजवणार असे म्हटले असले तरी यातून काँग्रेसचीच अधिक नाचक्की होण्याची शक्यता आहे. म्हणजे शरद पवारांच्या खेळीने राहुल गांधींची प्रतिमा मोदींपुढे खुजी होईल, आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी असणार नाहीत, यासाठी ही भूमिका फायद्याची ठरेल. साहजिकच कसेही झाले तरी राहुल गांधींचा पराभव अटळ करून ठेवला आहे. नको त्या वेळी नको ते बोलून राहुल गांधींना इसापनीतीतील बैलोबा केले तर सर्दीचे नाटक करून दोघांशीही मैत्रीचा एक्का पवारांनी हातात ठेवला आहे.मोदींच्या पंजाने राहुल गांधींना बाजूला करून स्वत:ची बाजू भक्कम करायचे धोरण आखतानाच शरद पवारांनी मोदींशी मैत्री आणि आघाडीचे पंतप्रधानपदाचे दावेदार या दोन दगडांवर सुरक्षित पाय ठेवला आहे.