सध्या देशात नामांतराचे वेध प्रत्येक पक्ष संघटनांना लागलेले आहेत. आपली ताकद दाखवण्यासाठी वेगवेगळी शहरे, रेल्वे स्थानके यांना नवी नावे काय असावीत, याबाबत एक चढाओढ लागलेली दिसते. थोडक्यात, आपले अस्तित्व दाखवण्यासाठी असे राजकारण सुरू झाले आहे. हे थोडेफार हास्यास्पद होताना दिसते आहे. उत्तर प्रदेशात फैजाबादचे अयोध्या झाले. अर्थात अयोध्या हे पुराणकालापासून सुरू असलेले आणि परिचित असलेले नाव आहे. अवध किंवा अयोध्या हे पूर्वीपासूनचे नाव होते. मोगल राजवटीत त्याची तोडमोड होऊन फैजाबाद झाले होते. त्यामुळे ते नाव बदलले गेले म्हणण्यापेक्षा मूळ नाव त्या शहराला दिले गेले. गदिमांनीही आपल्या गीतरामायणात शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी असेच वर्णन केलेले होते. तसेच सर्वच रामायण आणि पुराणकाळात तेच नाव प्रस्थापित होते. त्यामुळे हे नाव बदलले नाही, तर मूळचे नाव दिले गेले आहे. अलाहबादचे प्रयागराज झाले, तेही पूर्वीपासून त्याचा पुराणाशी संबंध आहे. इतिहासाशी संबंध आहे. काशीयात्रा, प्रयागयात्रा अशी त्रिस्थळी यात्रा करण्याची आपली परंपरा आहे.त्यामुळे प्रयागला जाण्याची परंपरा असल्यामुळे त्याचे नंतर मोगल राजवटीत अलाहाबाद नाव केले गेले. ते बदलून त्याला मूळचे असलेले प्रयागराज नाव दिले गेले. यापूर्वीही अनेक नावे अपभ्रंश होऊन वापरली जात होती. त्यापैकी मुंबईचा अपभ्रंश करून बंबई, बॉम्बे असे म्हटले जात होते. उत्तर भारतीयांनी त्याला बंबई करून चित्रपटसृष्टीमुळे ते अधिकच गाजले. मै बंबई का बाबू, बॉम्बे टू गोवा, सलाम बॉम्बे, इहै बंबै नगरिया को देख बबुआ, अशा बॉलिवूडमधील वर्णनांनी सुंदर मुंबईची बंबई झाली. त्या मुंबईला तिचे मूळचे नाव मिळवून दिले. दक्षिणेतही मद्रास या तामिळनाडूच्या राजधानीचे नाव असेच काही वर्षापूर्वी बदलले गेले. ते चेन्नई केले गेले. त्या त्या शहरांना त्यांचे मूळ नाव मिळवून दिले गेले. प. बंगालमध्येही वर्षानुवर्षे कलकत्ता नावाने ओळखल्या जाणा-या शहराला बंगाली भाषेच्या पार्श्वभूमीवर कोलकाता असे करण्यात आले. जी नावे बदलली गेली, त्यांना काही ऐतिहासिक वारसा आणि दाखले आहेत म्हणून ती बदलली गेली; परंतु ही नावे बदलली म्हणून आणखी काही नावे बदला, अशा मागण्यांची चढाओढ सुरू झाली. हा अगदी पोरकटपणा म्हणावा लागेल. हातात काही कामे नाहीत म्हणून अशी मागणी करण्याचा सपाटा लावला जात आहे. हे नामांतराचे राजकारण थांबवले पाहिजे.काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, संघटना तर या नामांतराचा खेळ करून राजकारण करताना दिसतात. त्यामध्ये आपण आपल्या आदरणीय व्यक्तिमत्त्वांचा, आदर्शाचा अपमान करून त्यांना संकुचित करतो आहोत, हे ध्यानात घेतले पाहिजे. औरंगाबाद या शहराचे नाव संभाजीनगर करावे, ही मागणी अनेक वर्षाची आहे. ना काँग्रेसच्या काळात त्याची दखल घेतली गेली, ना युतीच्या काळात अजूनही त्याचे नाव बदलले गेले. केवळ एका पक्षाने, शिवसेनेसारख्या संघटनेने त्याचा उल्लेख संभाजीनगर केल्याने औरंगाबादचे नामांतर झाले असे म्हणता येत नाही. त्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होणे अपेक्षित आहे. शिवसेनेने सत्तेत असूनही तशी कधीच मागणी केली नाही, की त्यासाठी प्रयत्न केले नाहीत. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांनी फटाफट निर्णय घेतलेसुद्धा. पण, शिवसेनेच्या निष्क्रियतेमुळे औरंगाबादचा मुद्दा मात्र लांब पडताना दिसत आहे. तसे प्रयत्न दिसत नाहीत. त्यामुळे फक्त नामांतराचे राजकारण करून चर्चेत राहण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसतो आहे. हे कमी म्हणून की काय त्याच धरतीवर पुण्याचे नावही जिजापूर करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली आहे. पुणे हे शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी वसवले असल्यामुळे त्यांचेच नाव या शहराला द्यावे, असे ब्रिगेडच्या नेत्यांचे म्हणणे आहे.१७व्या शतकात पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवण्यात आला होता. पुणे शहर पूर्णपणे बेचिराख झाले होते. तेव्हा छत्रपती शिवराय यांच्या मातोश्री जिजामाता यांनी या पुण्याला नवसंजीवनी दिली. राखेतून शहर उभारले. या कारणामुळेच पुणे शहराचे नाव जिजामातांच्या नावावर असावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने संतोष शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सत्तेत आले. आता त्यांचा मान राखून पुण्याचेही नाव जिजापूर करावे, असे संतोष शिंदे यांचे म्हणणे आहे. या भावना कितीही चांगल्या असल्या, तरी पुणे पुनवडी हे नाव जिजाऊंनीच वसवले होते. त्यामुळे त्यांनीच वसवलेल्या शहराचे नाव बदलणे, हाही जिजाऊंचा अपमानच होईल असे वाटते. त्या थोर राजमातांना पुण्यापुरते मर्यादित करण्याची गरज नाही. त्यांनी वसवलेल्या पुणे शहराचे नाव बदलण्याची गरज नाही. केवळ राजकारणासाठी चर्चेत राहण्यासाठी असे मुद्दे घेऊन आपल्या आदरस्थानांची उंची कमी करण्याचा प्रयत्न करू नये. त्याचप्रमाणे उस्मानाबादचे नाव धाराशिव करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेड अनेक वर्षे करते आहे. ही मागणी रास्त आहे. त्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे गरजेचे आहेत; परंतु या नामांतराच्या नव्या चळवळीत किंवा चुळबुळीत नवे राजकारण होताना दिसत आहे.आता काँग्रेसचे काही विद्वान नेते सगळे मुद्दे संपले आणि देशापुढचे सगळे प्रश्न सुटले म्हणून पारावरच्या वायफळ चर्चा असतात, तशा नामांतराच्या चर्चा करताना दिसतात. यात म्हणे शाह हा शब्द पार्शी असल्याने अमित शाहांचे नावही बदला, असले आचरट सल्ले कोणी देताना दिसतो आहे. हे अगदी खालच्या पातळीवरचे राजकारण होताना दिसते आहे. नावे बदलूनही किती लोक त्याचा वापर करतात, हा प्रश्न वेगळाच आहे. व्हीटीचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस केले, त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे गेल्या वर्षी केले गेले. तरीही अजून अनेक महाभाग व्हीटीचेच तिकीट मागतात. सीएसटी आणि सीएसएमटी या नावावरून महाराजांच्या नावाचा कुठेही जयजयकार होताना दिसत नाही. त्यामुळे नामांतराची राजकारणे न करता, त्याचा योग्य उच्चार होऊन सन्मान कसा होईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८
नामांतराचे राजकारण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा