राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय जनता पक्ष विरोधी आघाडी उघडली आहे. त्यादृष्टीने गुरुवारी दिल्लीत त्यांनी फारूख अब्दुल्ला, चंद्राबाबू नायडू यांच्याशी भेटीगाठी घेतल्या. या भेटीनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत लोकशाही बचाओ अशी घोषणाही दिली. या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे ती वाचवा, अशी त्यांनी साद घातली. पण, जेव्हा- जेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या परिवारातील पक्ष अडचणीत येतात, सत्तेपासून दूर जातात, तेव्हा-तेव्हा शरद पवारांनी वाचवा-वाचवा, बचाओ-बचाओ अशी साद घातलेली आहे.१९९५-९६ साली नरसिंहराव सरकारचा पराभव झाला आणि काँग्रेसची सत्ता गेली. त्यानंतर काही काळ अस्थिरता निर्माण झाली. १३ दिवसांचे वाजपेयींचे सरकार नंतर ११ महिन्यांचे देवेगौडा सरकार आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल यांचे सरकार ही अल्पकाळातील अस्थिर सरकारे अस्तित्वात आल्यानंतर पुन्हा निवडणुका लागल्यावर भारतीय जनता पक्षाची हवा होती. आता भाजपला बहुमत मिळाले, तर काँग्रेसला पुन्हा संधी नसणार आहे हे त्यावेळी शरद पवारांच्या लक्षात आले होते. नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी अल्पमतातील सरकार पाच र्वष चालवले होते. त्या काळात प्रचंड उलथापालथ झाली होती. आर्थिक घोटाळे झाले होते, बाबरी मशिदीचे पतन झाले होते. हे सगळे मुद्दे काँग्रेसच्या विरोधात गेले होते. काँग्रेसचा नेहमीचा आधार असणारे गांधी कुटुंब तेव्हा लांब होते. राजीव गांधींच्या हत्येनंतर सोनिया गांधी राजकारणापासून दूर गेल्या होत्या. त्या काळात काँग्रेसचे महत्त्वपूर्ण नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिले जात होते; परंतु भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य वाढत होते, अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा उंचावत होती. १३ दिवसांत सरकार सोडावे लागल्याची देशभरात पसरलेली भावना, या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत भाजप पुढे जाणार हे चित्र पवारांना अस्वस्थ करत होते. अशावेळी त्यांनी आता काँग्रेसला वाचवण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, हे लक्षात घेऊन ‘सोनिया लाओ देश बचाओ’ अशी घोषणा दिली होती. वास्तविक देश वाचवायचा प्रश्न नव्हताच, तर काँग्रेस वाचवण्याचा प्रश्न होता. ही दिलेली हाक काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचे भांडवल केले. विदेशात असलेल्या, राजकारणापासून दूर गेलेल्या सोनिया गांधींना राजकारणात आणण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी शक्ती पणाला लावली.सोनिया गांधींचे विशेष फोटोसेशन करून त्यांनी इंदिरा गांधींप्रमाणे खादीच्या, इरकली साडीतील, डोक्यावर पदर घेतलेले फोटो काढले गेले. काही फोटो इंदिरा गांधींप्रमाणे त्या भासतील, अशा तऱ्हेच्या वेशभूषेतील होते. ही भावनिक लाट निर्माण करून सोनिया लाओ, देश बचाओ अशी हाक देणारे शरद पवारच होते. महाराष्ट्राचा सगळा अभिमान, स्वाभिमान शरद पवारांनी सोनिया गांधींच्या पायाशी वाहिला आणि लाचारी पत्करण्याचे धोरण आखले. यामागचे कारण काँग्रेसला कोणी स्टार प्रचारक नव्हता. त्यामुळे काँग्रेसला मॉडेलिंग करण्यासाठी, प्रचारासाठी आणि मते मिळवण्यासाठी सोनिया गांधींना आणले गेले. त्या काळात त्यांना चांगली हिंदीही येत नव्हती. उत्स्फूर्तपणे भाषणे येत नव्हती. कोणीतरी इंग्रजीतून हिंदी भाषण लिहून दिले जायचे. त्याचे उच्चार करताना त्यांची कसरत व्हायची. अशा परिस्थितीत १९९८ च्या निवडणुकीत शरद पवारांच्या कृपेने सोनिया लाओ, देश बचाओ नावाने हाक दिली गेली. काँग्रेस वाचवण्यासाठी हा सगळा आटापिटा होता; परंतु बचाओ -बचाओ ही घोषणा त्यावेळी शरद पवारांनी दिली. त्यामुळे शरद पवारांकडे विरोधी पक्षनेतेपदही आले होते. म्हणजे जर पुन्हा काँग्रेस सत्तेत आली असती, तर पंतप्रधानपदाचे ते उमेदवार होते. पण, सोनिया लाओ देश बचाओच्या हाकेने काँग्रेस एवढी प्रभावित झाली की, सोनिया गांधी किंवा गांधी हे नाव नसेल, तर काँग्रेस अपूर्ण आहे हे बिंबवले गेले. पण, जेव्हा सोनिया गांधीच शरद पवारांना डोईजड झाल्या, तेव्हा त्यांनी वाचवा-वाचवा करत काँग्रेसमधून पळ काढला आणि राष्ट्रवादीची स्थापना केली. यामागे केवळ काँग्रेस सत्तेत येऊ नये, हाच उद्देश होता. त्यावेळी काँग्रेस सत्तेत आली असती. १९९९ च्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाने काँग्रेसचा तुकडा पाडला नसता, तर १९९९ ला अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार आलेही नसते. पण, काँग्रेस सत्तेत आल्यावर सोनिया गांधी पंतप्रधान होतील, या भीतीने त्यांनी पळ काढला आणि सत्तेपासून काँग्रेसला रोखले. शरद पवारांना वाचवा-वाचवा म्हणायची वेळ येते, तेव्हा ते देश बचाओ, लोकशाही बचाओ अशी हाक देतात. आज नेमके त्यांनी तेच केलेले आहे.आज राष्ट्रवादी काँग्रेसला वाचवण्यासाठीही त्यांची धडपड असू शकते. न्यायालयाने काहीच दिवसांपूर्वी जलसंपदा खात्यासंदर्भातील सगळी माहिती मागवली आहे. अजित पवारांचा त्याच्याशी काही संबंध आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता आहे. यासाठी भाजप विरोधाची मोट बांधण्याचा घाट घातला आहे. हे करताना शरद पवारांना इतकी कसरत करावी लागत आहे की, काँग्रेस तर विरोधात मोठी झाली नाही पाहिजे, राहुल गांधींना तर संधी मिळाली नाही पाहिजे, आपले वर्चस्व राहिले पाहिजे, पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून आपल्या नावाची शिफारस झाली पाहिजे आणि हे करण्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे. ही सगळी स्वत:ला वाचवण्यासाठी धडपड चालवली आहे. म्हणूनच लोकशाही वाचवायची की देश वाचवायचा, की शरद पवारांना वाचवायचे असे प्रश्न नागरिकांना पडत आहेत.
शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८
बचाओ.. पण कोणाला?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा